शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 जानेवारी 2023 (15:15 IST)

आधी गुजरातने पळवलेले उद्योग परत आणा-संजय राऊत

sanjay raut
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र दौऱ्याला गेले नाहीत. यावरुन प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, दावोसवरुन काय येईल, हे आम्हाला माहीत नाही. पण तुमच्या नाकासमोरुन जे उद्योग पळवून नेले. ते आधी परत आणा. मिहान आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून एअरबस, वेदांता फॉक्सकॉन असे दोन लाख कोटींच्या वरची गुंतवणूक गुजरात आणि इतर राज्यात गेली आहे. ती आधी घेऊन आलात तर दावोसला जाण्यात अर्थ आहे.
 
“दावोसमध्ये जगभरातून राज्यकर्ते येत असतात. करार करुन फक्त आकडे सांगितले जातात. अमूक लाख कोटी, तमूक लाख कोटींचे करार झाले. पण प्रत्यक्षात दावोसमध्ये जेवढे करार झाले, त्यापैकी नक्की किती कंपन्या देशात आल्या, हे कुणीही सिद्ध करु शकलेले नाही. पण आमच्या डोळ्यासमोरुन एअरबस, वेदांता फॉक्सकॉन, ड्रग्स पार्क असे अनेक प्रकल्प राज्यात आले होते, येत होते. पण ते कुणीतरी खेचून घेऊन गेले. त्यामुळे दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा”, असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला.
 
करोना काळातील निर्णयांची चौकशी होणार असल्याबाबतही राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, “केंद्रीय तपास यंत्रणा आणि सत्ता हातात असल्यामुळे खोटी प्रकरणे निर्माण करुन बदनामीची मोहीम राबविली जात आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात उत्तर प्रदेशप्रमाणे गंगेत प्रेतं तरंगली नाहीत. प्रत्येकाला आम्ही उपचार देऊ शकलो, प्राण वाचवू शकलो. हे उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचे यश होते. मुंबई महानगरपालिका, प्रशासन यांच्या सर्वांचे हे यश होते. नाहीतर मुंबईच्या मिठी नदीतही प्रेतं तरंगताना दिसली असती. ज्या कायद्यानुसार तातडीने निर्णय घेण्याची गरज होती, त्यानुसारच निर्णय घेण्यात आले आहेत. मी खात्रीशीर सांगतो, अत्यंत पारदर्शक असे व्यवहार झाले होते”
Edited By - Ratnadeep Ranshoor