शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गडचिरोली , बुधवार, 1 मे 2019 (14:12 IST)

नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत घडवला भूसुरुंगाचा स्फोट, 15 जवान शहीद झाल्याची भीती

राज्यभरात महाराष्ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली आहे. जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात 15 जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कुरखेड्यापासून 6 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. नक्षलवाद्यांच्या जाळपोळीनंतर बंदोबस्तासाठी कुरखेडा येथून टाटा एस या मालवाहू वाहनाने जवानांचं पथक जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम)चे 15 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे.
 
तसेच या हल्ल्यात खासगी वाहनाचा चालकही ठार झाला. कुरखेडा ते कोरची मार्गावर 6 किमी अंतरावर जांभुळखेडा गावाजवळ एका ठिकाणी हा स्फोट घडवून आणला, यात वाहनाच्या चिंधड्या उडाल्या. पहाटे वाहनांची जाळपोळ होण्याच्या घटनास्थळी एसडीपीओ शैलेश काळे गेले होते. तेथून त्यांनी या पथकाला तातडीने तिकडे पाचारण केले होते. पण पोलिसांचे वाहन उपलब्ध नसल्याने खासगी मालवाहू वाहनाने हे पथक निघाले होते.
सशस्त्र नक्षलवाद्यांनी तब्बल ३६ वाहने जाळल्याची घटना घडली. कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे घडली असून रस्त्याच्या कामासाठी या वाहनांचा वापर केला जात होता.
 
या आधी पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३६ चे काम सुरु असून, हे काम दुर्ग येथील अमर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीद्वारे करण्यात येत आहे. या कंपनीचा दादापूर येथे गावाशेजारीच डांबर प्लांट असून, दोन कार्यालयेही आहेत. तेथे अनेक वाहने होती. मंगळवारी रात्री दीडशेहून अधिक सशस्त्र नक्षली दादापूर येथे गेले. त्यांनी संपूर्ण गावभर शासनाविरोधात बॅनर लावले आणि नंतर वाहने व अन्य यंत्रसामग्रीला आग लावली. या आगीत ११ टिप्पर, डांबर पसरविणारी मशिन, डिझेल व पेट्रोल टँकर, मोठे रोलर अशी तब्बल ३६ वाहने, मोठे जनरेटर व दोन कार्यालये जळाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.