शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (13:25 IST)

अकोला मध्ये लॉकडाउन जाहीर

महाराष्ट्रात सतत वाढत असलेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे आता विदर्भातील अकोला येथे 12 मार्च म्हणजे आज शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजेपासून सकाळी 8 वाजेपर्यंत लॉकडाउन लावण्याची घोषणा केली गेली आहे. तसेच पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळत असल्यामुळे पुण्यात कडक निर्बंध आणले जाणार आहेत. पुण्यात देखील शुक्रवारी 12 मार्च 2021 म्हणजेच आज रात्रीपासून हे कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत.
 
नागपूर, अकोला व्यतिरिक्त पुण्यात नाइट कर्फ्यू लावण्यात येत आहे. पुण्यात रात्री 11 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेर्पंत नाइट कर्फ्यू लावण्यात येत आहे. पुण्यात 31 मार्चपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. मात्र दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना यातून सवलत देण्यात आली आहे. याशिवाय सर्वेक्षण आणि कॉन्टेक्ट ट्रेसिंग देखील सुरू करण्यात येणार आहेत. 
 
हे असतील निर्बंध 
हॉटेल्स आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजता बंद करण्यात येतील. 
येथे क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच सेवा देता येईल.
याठिकाणाहून पार्सल सेवा 11 पर्यंत सुरू राहणार आहे. 
 
राज्यात ‘कोरोना’चा धोका वाढला, 14317 नवीन रुग्ण, 57 जणांचा मृत्यू
राज्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होत असल्याने केंद्र सरकारने देखील चिंता व्यक्त केली आहे. देशात आढळून येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. राज्यात दिवसेंदिवस रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 14 हजार 317 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
 
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 22 लाख 66 हजार 374 इतकी झाली असून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.17 टक्के इतके झाले आहे. राज्यात रुग्ण वाढत असताना राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. सध्या राज्यात 1 लाख 6 हजार 070 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण काही प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाला दिलासा मिळात आहे. गेल्या 24 तासात राज्यात 7 हजार 193 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 21 लाख 6 हजार 400 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.94 टक्के इतके आहे.
 
राज्यात गेल्या 24 तासात 57 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या 52 हजार 667 एवढी झाली आहे. राज्यात मृत्यू होण्याचे प्रमाण 2.32 टक्के इतके आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या 1 कोटी 72 लाख 13 हजार 312 प्रयोगशाळा तपासण्यामध्ये 22 लाख 66 हजार 374 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या 4 लाख 80 हजार 083 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 719 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.