बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (08:01 IST)

नाशिकमध्ये महिलांसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र बनणार

सैनिक भरतीमध्ये एनडीएमध्ये महिलांना प्राधान्य दिले गेले आहे. तशीच प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद येथे कार्यरत आहे. त्याच धर्तीवर नाशिक येथे महिलांसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीने याबाबतचा अहवाल 15 दिवसात सादर करावा, असे निर्देश माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
 
नाशिक येथे महिलांसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याबाबत व 14 जानेवारी 2021 रोजी सैनिक दिन साजरा करण्याबाबत मंत्रालयीन दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 
 
माजी सैनिक कल्याण मंत्री भुसे म्हणाले की, यासंदर्भात विभागीय आयुक्त नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये जिल्हाधिकारी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने 15 दिवसाच्या आत सविस्तर अहवाल सादर करावा. उच्च व तंत्र शिक्षण विभागाची मान्यता घेऊन त्याठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात यावे. वसतीगृहाची सोय भोजन खर्च, पोलीस प्रशिक्षण केंद्र यांचेशी संवाद साधून त्यांना पीटी खेळासाठी मैदानाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच त्यांच्या निवड प्रकियेची व्यवस्था तयार करण्यात यावी. यासाठी समांतर जागेची मागणीच्या माध्यमातून महिलांसाठी 30 जागा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. याबाबतचा प्रस्ताव समितीने तातडीने सादर करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. एनडीएमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना नोकरीसह भारताचा नागरिक म्हणून त्यांच्या व्यक्तीगत जीवनात या प्रशिक्षणाचा लाभ होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
शौर्य पुरस्कारप्राप्त सैनिकांचा सन्मान
पुणे येथे दरवर्षी दिनाक १४ जानेवारी रोजी Army Veterans Day हा कार्यक्रम सैन्य दलामार्फत माजी सैनिकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धास या वर्षी ५० वर्ष पूर्ण होत असल्याने १४ जानेवारी (Army Veterans Day) या दिनाचे औचित्य साधुन सैन्यदला मार्फत आयोजित केलेल्या मेळाव्यातच १९७१ च्या भारत पाकिस्तान युध्दातील शहीद सैनिकांचे अवलंबित आणि या युद्धातील गौरव पुरस्कार प्राप्त लाभार्थी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
 
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाचे निमित्ताने हे वर्ष अमृत महोत्सवी वर्षे म्हणून साजरे केले जात आहे. तसेच १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धास ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने महाराष्ट्रातील १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात सक्रिय सहभाग घेऊन शहिद झालेल्या सैनिकांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वारसांचा तसेच १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांचा गौरव करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
 
शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांचा गौरव करण्याचा कार्यक्रम विविध राज्यामधुन दिनांक १६ डिसेंबर रोजी (भारत पाकिस्तान – युद्धाचा विजयी दिवस) साजरा होत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातूनही हा कार्यक्रम १६ डिसेंबर रोजी व्हावे अशी अपेक्षा माजी सैनिक यांनी व्यक्त केली आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत दिनांक १४ जानेवारी २०२२ (Army Veteran Day) रोजी आयोजित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
 
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातून संबंधित उपस्थित होणार आहेत. त्या अनुषंगाने पुणे हे ठिकाण राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने व एक दिवस अगोदर येणाऱ्या सर्व वयस्क सन्मानार्थ्यांची राहण्याची व्यवस्था माजी सैनिक, विश्रामगृह, पुणे येथे करणे सोईचे असल्याने पुणे या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
 
माजी सैनिकांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यासाठी कौशल्य विकास विभागाशी संवाद साधून विविध कौशल्य आधारित शिक्षण अवगत करावे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व कौशल्य विकास विभागांतर्गत काही विशेष कोर्स करुन घ्यावे. तसेच माजी सैनिकांना विभागाकडून विविध सुविधा देण्याच्या दृष्टीने यावेळी आढावा घेण्यात आला.