मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाची हजेरी
महाराष्ट्रात हवामानाची दोन टोकाची रूपे पाहायला मिळत आहे. कोकणात उष्णतेची लाट असताना, दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाने हजेरी लावली आहे.
मराठवाडामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाने सुरुवात केली आहे. काही ठिकाणी हलकी गारपीट झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे.
तसेच विदर्भात गोंदिया मध्ये व जिल्ह्याच्या आसपासच्या भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागली आहे.
हा पाऊस उकाड्यापासून दिलासा देणारा असला, तरी शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे: आंबा, लिंबू आणि संत्रा बागांना या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर काढणीला आलेल्या उन्हाळी मूग, बाजरी आणि भुईमुगाच्या पिकांचे नुकसान होऊ शकते.
हवामान खात्यानुसार, पुढील २४ ते ४८ तास मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत हीच स्थिती कायम राहू शकते.
Edited By- Dhanashri Naik