बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

काही अप्रिय घटना घडू नये : हायकोर्ट

शपथविधी कार्यक्रमाबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही. आमची प्रार्थना इतकीच आहे की काही अप्रिय घटना घडू नये अशी चिंता मुंबई हायकोर्टाने व्यक्त केली आहे. पण हायकोर्ट हा शपथविधी सोहळा थांबवू शकत नाही. मात्र, संबंधित यंत्रणांना सुरक्षेची खातरजमा करण्यास सांगू शकते, असेही खंडपीठाने म्हटले आहे.
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा गुरुवारी शिवाजी पार्कवर होत आहे. २०१० मध्ये मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टाने ही काळजी व्यक्त केली आहे. २०१०मध्ये शिवाजी पार्कला शांतता क्षेत्र घोषित करण्यात यावे म्हणून वीकम ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने कोर्टात याचिका दाखल केली होती.
 
त्यानंतर शिवाजी पार्क परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती आर. आय. छागला यांच्या खंडपीठाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक मैदानांवर अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा पायंडा पडू नये. नाहीतर जो तो उठेल आणि अशाप्रकारच्या कार्यक्रमांसाठी सार्वजनिक मैदानांचा वापर करेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.अजूनही काहीजण मैदानाचा अशा प्रकारे मैदानाचा वापर करण्यास मागणी करू शकतात, असे खंडपीठाने नमूद केले आहे.