संबंधित माहिती
- LIVE: महाराष्ट्रात MSRTC चे NCMC स्मार्ट कार्ड सुरू झाले
- महाराष्ट्रात MSRTC कडून प्रवाशांच्या सोयीसाठी NCMC स्मार्ट कार्ड सादर
- जळगाव नंतर आता रायगडमध्ये एसटी बसचा अपघात: ब्रेक निकामी झाल्याने दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावली, प्रवासी गंभीर जखमी
- एसटी महामंडळाने 'तयार गणवेश' देण्याचा निर्णय घेतला; मात्र, कर्मचाऱ्यांनी याला विरोध दर्शवत 'शिलाई भत्ता' मिळावा यासाठी आंदोलनाचा इशारा दिला
- लालपरीचे ब्रँड ॲम्बेसिडर: अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची 'एसटी' (MSRTC) चे नवीन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली
ST चा प्रवास महागणार? मागील १० दिवसांत ४ वेळा डिझेल दरवाढीमुळे लालपरी संकटात; ३१० कोटींचा बोजा!
देशात सातत्याने वाढत असलेल्या डिझेलच्या किमतींमुळे महाराष्ट्र राज्य मार्गपेटी महामंडळाची (एसटी) 'लालपरी' मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या तब्बल ४ वेळच्या डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर वार्षिक ३१० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडला आहे. यामुळे भविष्यात एसटी प्रवासाचे भाडे वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वपूर्ण माहिती दिली.
इंधन दरवाढीचा असा बसला फटका
परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाचा डिझेलवरील वार्षिक खर्च पूर्वी ३,३०० कोटी रुपये होता, तो आता दरवाढीमुळे ३,६१० कोटी रुपयांवर गेला आहे.
पहिली दरवाढ (१५ मे): डिझेल ३ रुपये १० पैशांनी महागल्याने १२४ कोटी रुपयांचा बोजा वाढला.
दुसरी दरवाढ: ९३ पैशांच्या वाढीमुळे ३७.२० कोटी रुपयांचा खर्च वाढला.
तिसरी दरवाढ: ९१ पैशांच्या वाढीमुळे ३६.४० कोटी रुपयांचा बोजा पडला.
चौथी दरवाढ: २ रुपये ८१ पैशांच्या वाढीमुळे ११२.४० कोटी रुपयांची अतिरिक्त वाढ झाली.
सध्या डिझेलचे दर ९१ रुपयांच्या पार गेले आहेत. महामंडळाला आधीच एप्रिल २०२६ या एकाच महिन्यात जवळपास ७६ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने करांमध्ये कपात करून मदत केली नाही, तर एसटी टिकवण्यासाठी आगामी काळात काही प्रमाणात भाडेवाढ करणे अपरिहार्य ठरेल, असे संकेत मंत्री सरनाईक यांनी दिले.
सध्या तातडीने भाडेवाढ नाही; प्रवाशांना दिलासा
तथापि, प्रवाशांना दिलासा देताना त्यांनी स्पष्ट केले की, सध्या तरी तातडीने कोणतीही तिकीट किंवा भाडेवाढ लागू केली जाणार नाही. मे महिन्यानंतर सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा आढावा घेऊनच पुढील पाऊल उचलले जाईल. महिलांना एसटी प्रवासात दिलेली ५० टक्के सूट, दिव्यांगांना आणि इतर घटकांना दिली जाणारी मोफत प्रवासाची सवलत यांचे पैसे राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला नियमित मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
डिझेल बचतीसाठी 'थ्री-आर' आणि बक्षीस योजना
एसटी महामंडळाला रोज १० लाख ८७ हजार लीटर डिझेल लागते. हा तोटा आणि खर्च कमी करण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी प्रत्येक आगाराला (डेपो) रोज किमान ५ लीटर डिझेल वाचवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यामुळे राज्यात रोज जवळपास १,००० लीटर डिझेलची बचत होईल
डिझेलची अधिक बचत करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन भत्ता दिला जाईल आणि त्यांचा गौरव केला जाईल.
जी आगारे सर्वाधिक डिझेल वाचवतील, त्यांना विशेष बक्षीस देऊन प्रोत्साहित केले जाईल.
चालकांचे योग्य समुपदेशन (Counselling) करणे आणि गाड्यांची योग्य देखभाल राखण्याच्या सूचना आगार प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.
इलेक्ट्रिक बसेसवर भर
भविष्यातील इंधन संकट टाळण्यासाठी एसटी महामंडळात आगामी काळात इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील प्रमुख २०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठीची निविदा (Tender) प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहितीही परिवहन मंत्र्यांनी दिली.
