1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जुलै 2023 (21:08 IST)

दुर्दैवी : वीज पडून काका-पुतण्याचा मृत्यू, आठ जण जखमी

death
राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. यामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी घरं पाण्याखाली गेली आहेत. तर, दरड कोसळणे आणि भूस्खलनाच्या घटनाही समोर आल्या आहे. दरम्यान
अमरावती मध्येही धुवाधार पाऊस सुरु आहे. मेळघाटात एक दु्र्दैवी घटना समोर आली आहे. मेळघाटात वीज पडून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
 
या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार , मेळघाटात वीज पडून काका पुतण्याचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथील दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.
 
नक्की काय घडलं?
मुसळधार पावसात झाडाच्या आश्रयाला गेलेल्यांवर वीज पडून ही दुर्देवी घटना घडली आहे. चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथील एका शेतात शेतकरी आणि शेतमजुर शेतीचे काम करत होते. यावेळी विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरु झाला. पाऊस सुरु झाल्यामुळे पावसात काम करणं थांबवून शेतकरी आणि शेतमजूर बाजूलाच असलेल्या लिंबाच्या झाडाच्या आश्रयाला थांबले. मात्र, यावेळी दुर्दैवाने झाडावर वीज पडून यामध्ये काका आणि पुतण्या अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. मोरगड येथील शेतकरी सुनिल मोती भास्कर (वय 32), निलेश बजरंग भास्कर (वय 20) असं मृत काका-पुतण्याचं नाव आहे.
 
शेतात काम करत असताना अचानक पाऊस सुरु झाल्याने शेतातील मजूर शेतातच असलेल्या लिंबाच्या झाडाचा आश्रय घेण्याकरीता गेले असता, अचानक वीज पडल्याने सुनिल मोती भास्कर यांचा जागेवरच मृत्यू झाला तर, निलेश बजरंग भास्कर याला उपचारासाठी टेम्बुरसोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान निलेशचा मृत्यू झाला आहे. तसेच या शेतातच काम करणारे इतर आठ जण जखमी झाले आहेत.