1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. विठ्ठल
Written By वेबदुनिया|

स्वामी माझा कृपानिधी

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

स्वामी माझा कृपानिधी
MHNEWS
हा पांडुरंग, हा विठोबा मोठा नाटकी आहे. अगदी लीलानाटकसूत्रधार आहे. तो सगळ्यांना कळसूत्री बाहूल्यांना नाचवावे तसे नाचवीत असतो. तो तर्‍हेतर्‍हेची नाटके करतो. तो प्राणिमात्रांना उपजवतो, म्हणजे उत्पत्ती करतो, त्यांना पाळतो म्हणजे स्थिती प्रदान करतो आणि त्यांचा संहार करतो म्हणजे त्यांचा लयही करतो. उत्पत्ती, स्थितीआणि लय या तिन्ही गोष्टी हा पांडुरंग मोठय़ा लीलेने सांभाळतो. हा सगळ्या विश्वात सामावलेला आहे आणि विश्वात सामावूनसुद्धा तो पुन्हा पंढरपुरात उरला आहेच. म्हणजे विश्वात आहेच, पण अखिल विश्व पादाक्रांत करुन, अखिल विश्वात सर्वत्र आपले अस्तित्व राखून तो पुन्हा पंढरपुरात आहे तो आहेच, आणि दोन्ही हात कमरेवर घेऊन स्वत: आपला गुपचूप, शांत उभा आहे. उभाच आहे. बसण्याचे नाव नाही. हा कसा आहे ? आम्ही याला पांडुरंग म्हणतो. पण ते आमच्या प्रेमाचे नाव आहे. तो तसा काळाच, पण काळा म्हणावा तर तेवढासा काळा नाही, आपल्या लाडक्याला कोणी काळा म्हणेल काय ? म्हणून आम्ही त्याला सांवळा म्हणतो. सांवळे विठाई असे म्हणतो आणि तेवढे म्हणूनही आमचे समाधान होत नाही म्हणून आम्ही त्याला पांडुरंग, पांढर्‍या रंगाचा, गोर्‍या वर्णाचा असेही म्हणतो. हा स्वभावाने तसा कठोर नाही. भक्तांची अनेक प्रकाराने कसोटी घेऊन मग तो त्यांना पावतो हे खरे. पण उशिर का होईना, खूप तर्‍हेने परीक्षा घेऊन का होईना, पण शेवटी पावतो. भक्तांना धन्य धन्य करतो, हे काय कमी आहे ? कारण तसा तो अंत:करणाचा मृदू- मऊच. आता खूप काळ भक्ती करुनसुध्दा तो पावला नाही की भक्त त्याला कठोर ह्द्यी , पाषाणह्द्यी असे काहीबाही बेलतात. पण तो ते तेवढे काही मनावर घेत नाही. त्याच्या मनात कृपेचा झरा सतत पाझरत असतो. तो सत्व-रज -तम या तिन्ही गुणांच्या पलीकडचा आहे. त्याला नीटपणे मोजता येईल, असे मोजमापाचे साधन आपल्यापाशी नाही. त्याला आदि नाही, अंतही नाही. तो अनादि आहे, अनंत आहे. एखादी गोष्ट आपल्या मनाला पटते, आपल्याला पटते, आपल्या प्रज्ञेला भावते, ती आपण अंगिकारतो. पण आमचे हे विठोबाराव मन आणि बुद्धी या दोघांच्याही पलीकडचे आहेत. ते मनाला कळत नाही, आणि बुद्धीला सापडत नाहीत. तो मुळीच कुठल्या चौकटीत बसणाराच नाही. आपण आता त्याचे एवढे वर्णन करीत आहोत ना, पण हे वर्णन करायला लावणाराही तोच.

तो म्हणजे तोच. आपल्या या सगळ्या बोलण्या, लिहिण्या, वाचण्यामागचा सूत्रधार तो एकच आहे. फक्त एवढेच की तो कृपेचा सागर आहे.

त्यामुळे होते काय की काही झाले करी शेवटी आपल्याला त्याचाच आधार आहे, ही आमच्या मनातील श्रद्धा आणखी दृढावते आणि अशा त्या आमच्या स्वामीरायाला, आमच्या मालकाला, आमच्या सूत्रधाराला आम्ही श्रीविठ्ठल म्हणून गौरवितो. त्याच्या नावाचा जयजयकार करतो. जयहरी विठ्ठल असे म्हणतो.