गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

रोहित शर्मा: हिटमॅनचं लक टीम इंडियाला वर्ल्डकप मिळवून देणार का?

हिटमॅन रोहित शर्माला जीवदान देणं किती महागात पडू शकतं याचा प्रत्यय बांगलादेशच्या तमीम इक्बालला आला असेल.
 
जीवदानविरहित शतकी खेळी करण्यासाठी रोहित नक्कीच उत्सुक असेल. रोहित शर्माने बांगलादेशविरुध्द यंदाच्या वर्ल्डकपमधलं चौथं शतक झळकावलं.
 
एका वर्ल्डकपमध्ये चार किंवा त्यापेक्षा जास्त शतकं झळकावणारा रोहित हा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
 
याआधी असा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराने केला होता.
 
कोणत्याही संघाला वर्ल्डकप जिंकायचा असेल तर एखाद्या खेळाडूने जबाबदारी स्वीकारून संघासमोर उदाहरण सादर करणं आवश्यक असतं.
 
सचिन तेंडुलकरने 2003 मध्ये अफलातून प्रदर्शनासह मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार पटकावला होता. टीम इंडियाने तेव्हा अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. 2011 मध्ये युवराज सिंगने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये जबरदस्त प्रदर्शन करत मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार पटकावला होता.
 
2015 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने 22 विकेट्ससह संघाला वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
 
यंदाच्या वर्ल्ड कपमधे रोहित शर्मा भन्नाट फॉर्मात आहे. चार शतकांसह रोहित सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. वर्ल्ड कपमधे रोहितला नशिबाने मजबूत साथ दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्द एकवर असताना रोहितला जीवदान मिळालं आणि त्याने 122 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाविरुध्द रोहितला दोनवर असताना जीवदान मिळालं, त्याने 57 धावांची खेळी केली.
 
कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुध्द रोहित 32वर रन आऊट मिस झाला आणि त्याने 140 धावांची मॅरेथॉन खेळी केली. इंग्लंडविरुध्द चारवर असताना रोहितचा झेल सुटला आणि त्याने 102 धावांची खेळी केली. बांगलादेशविरुध्द रोहितला नऊवर असताना तमीम इक्बालने त्याचा झेल सोडला आणि त्याने 104 धावांची खेळी केली.
 
कोशिश करनेवालोंकी हार नही होती ही उक्ती रोहितला यंदाच्या वर्ल्डकपमधे चपखल लागू ठरते आहे. खेळपट्टीवर नूर ओळखून, मैदानाचा आकार समजून घेत, संघाची गरज काय हे उमगून रोहित खेळतो आहे.
 
शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने रोहितवरची जबाबदारी वाढली आहे. नवीन सहकारी लोकेश राहुलच्या बरोबरीने मोठ्या धावसंख्येचा पाया रचण्याचं काम रोहित नेटाने करतो आहे. श्रीलंकेविरुध्दच्या मॅचनंतर टीम इंडियासमोर सेमी फायनलचं आव्हान असणार आहे.
 
जीवदानांवर विसंबून न राहता निखळ, खणखणीत खेळी करण्यासाठी रोहित आतूर आहे.
 
वनडेत तीन द्विशतकं नावावर असणाऱ्या या हिटमॅनला स्वबळावर संघाला वर्ल्डकप जिंकून देण्याची ताकद आहे.