शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (13:20 IST)

उद्धव ठाकरे: भाजपला सावरकरांचं गाईबद्दलच मत मान्य आहे का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच विधिमंडळात बोलले. यावेळी ते म्हणाले की आमच्या सरकारला हिणवलं गेलं. हे त्रिशंकू सरकार आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही हे सरकार म्हणजे तीन चाकी रिक्षा. देवेंद्रजी बरोबर आहे तुमचं.
 
राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर दिलं, त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली आणि सरकारचं पुढील धोरण काय राहील यावर भाष्य केलं.
 
आमचं सरकार हे गोरगरीबांचं सरकार आहे. त्यामुळे त्यांना बुलेट ट्रेन परवडत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
कालच्या भाषणात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धवा अजब सरकार अशा ओळी म्हटल्या होत्या. त्यांना उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. "सुधीर, नका होऊ अधीर झालात तुम्ही बेकार, म्हणून अजब वाटते आमचे सरकार."
 
सावरकर जर मानत असू तर त्यांचा आक्रोश तुम्हाला दिसत नाही का? कर्नाटकमधलं सरकारही हिंदूंचं सरकार आहे मग बेळगावच्या मराठी माणसांवर अत्याचार का होत आहेत असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
 
जसं पाकव्याप्त काश्मीर शब्द आहे तसा नवीन शब्दप्रयोग मी आज करत आहे. बेळगाव हे कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रात आहे असं उद्धव ठाकरे. आधी सांगा सावरकर तुम्हाला कळले आहेत का? सावरकरांचं गाईबद्दलचं मत भाजपला मान्य आहे का? आपल्या राज्यात गाय म्हणजे माता आणि इतर राज्यात खाता असं उद्धव ठाकरे म्हणाले.
 
'आम्ही जनादेशाचा अपमान केला नाही'
आम्ही जनादेशाचा अपमान केला असं तुम्ही म्हणता पण तुम्ही जेव्हा मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर युती केली होती ते विसरलात का? असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारलं की शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं?
 
मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्कवरचं भाषण केलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात शेतकऱ्यांचा उल्लेखही केला नाही. एकाही नव्या पैशाची मदत आज मुख्यमंत्र्यांनी दिली नाही. हे शेतकरी विरोधी सरकार आहेत. मुख्यमंत्री खुर्ची टिकवण्याची कवायत करतायेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.