शनिवार, 27 डिसेंबर 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

आषाढ महिना माहिती

Ashadh Month Information Marathi
भारतीय पंचागांनुसार आणि मराठी कॅलेंडरनुसार आषाढ हा चौथा महिना आहे. सूर्य ज्यावेळी कर्क राशीत प्रवेश करतो त्यावेळी हिंदू पंचांगातील आषाढ हा महिना सुरु होतो. आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दरम्यान पूर्वाषाढ आणि उत्तराषाढ येते म्हणून याला ‘आषाढ’ असे नाव पडल्याचे सांगितले जाते. 
 
आषाढ महिन्यात काय करावे?
आषाढ महिन्यात सर्वात विशेष दिवस म्हणजे आषाढी एकादशी येते. या निमित्ताने उपवास केला जातो आणि देवाची आराधना केली जाते. धार्मिक ग्रंथानुसार आषाढ महिन्यात संत आणि ब्राह्मणांना खटाळ, छत्री, मीठ आणि आवळ्याचे दान करावे. हे दान केल्याने भगवान वामन प्रसन्न होतात. ते भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. या महिन्यात त्यांची विशेष पूजा करावी.
 
आषाढ महिन्यात सूर्यदेवाची पूजा करण्याचाही नियम आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य अशुभ आहे त्यांनी या महिन्यात गहू, लाल चंदन, गूळ आणि तांब्याचे भांडे लाल कपड्यात ब्राह्मणांना दान करावे. यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात. या महिन्याच्या प्रत्येक रविवारी जेवणात मीठ वापरू नये.
 
आषाढ महिना यज्ञ आणि धार्मिक विधी करण्यासाठी शुभ आहे. वर्षातील 12 महिन्यांमध्ये आषाढ महिना हा एकमेव महिना आहे, ज्यामध्ये यज्ञ केल्याने त्याचे फळ लवकर प्राप्त होते. एवढेच नाही तर यासोबतच जीवनात सुख-समृद्धीचे आगमन होते.
 
आषाढात येणारे सण
आषाढ महिन्यात अनेक मराठी सण साजरे केले जातात. या काळात देवशयनी आषाढी एकादशी येते. वारकऱ्यांसाठी हे दिवस अत्यंत पवित्र असल्याचे मानले जाते. या काळात अनेक ठिकाणांहून पंढरपूर कडे वारी निघते. 
 
आषाढ महिन्यात दुसरा महत्वाचा सण म्हणजे गुरु पौर्णिमा. या दिवशी गुरुंची पूजा केली जाते. हा दिवस महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून देखील ओळखला जातो.
 
आषाढ महिन्यात इतर अनेक उपवास आणि सण साजरे केले जातात, त्यामुळे हा महिना पूजेसाठी आणखीनच खास आहे. कांदे नवमी, आषाढी एकादशी, वासुदेव द्वादशी, गुरु पौर्णिमा, मौना पंचमी, कामिका एकादशी, दिव्याची आवस सण येत असून या दरम्यान विधीपूर्वक पूजा-व्रत- पाठ केल्यास देव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.
 
आषाढ महिन्यात स्नानासोबतच दानधर्मालाही विशेष महत्त्व आहे. आपल्या क्षमतेनुसार आषाढ महिन्यात गरजूंना दान आणि दक्षिणा द्या. आषाढ महिन्यात छत्री, आवळा, चप्पल आणि मीठ इत्यादी दान करणे श्रेष्ठ मानले जाते. असे केल्याने भगवान विष्णूची कृपा राहते आणि साधकही भाग्यवान होतो असे म्हणतात.