1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. हिंदू धर्माविषयी

ज्ञानें हित करा रे ।

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

PR
श्री समर्थ रामदासस्वामींना नादमधुर शब्द वापरण्याची आवड होती किंवा काही वेळा तेच तेच शब्द पुन : पुन्हा घेऊन एखादा विषय मांडण्याची हातोटी अवगत होती. हा मुद्दा स्पष्ट करणारी समर्थांची एक रचना आपण पाहू. नाहीं नाहीं नाहीं भव नाहीं रे । निर्भय सज्जनसंग पाही रे ।। आहे आहे आहे गति आहे रे । सारासार विचारुनि पाहे रे । जातें जातें जातें वय जातें रे । नेणतां अनहित बहु होते रे ।। धरा धरा धरा धरा संग धरा रे ।। दास म्हणे ज्ञानें हित करा रे । इथे समर्थांनी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितली आहे. सज्जन हा निरंतर निर्भय असतो. कर नाही त्याला डर नाही, हे सज्जनांच्या विषयात नेहमीच खरे असते. म्हणून सज्जनांच्या संगतीत आपण असलो की आपल्याली भयभीतीचा वासवारा लागत नाही. भय, भीती बाळगू नका आणि निरंतर सज्जनांच्या संगतीत राहा, असे समर्थ सांगतात.

सारासार विचार करुन प्रत्येक पाऊल पुढे टाका, मग अंगीकृत कार्याला हवी तशी गती मिळेल, प्रगतीच्या मार्गावर तुम्ही चालू शकाल, असे समर्थ पुढे सांगतात. जाते घडी ही आपुली साधा । असेच जणू समर्थांना सांगावयाचे आहे. जातें जातें जातें वय जातें रें । असे समर्थ म्हणतात आणि आपण केवळ वेळच्या वेळी जे जाणावयाचे ते जाणून घेतले नाही म्हणून आपले अनहित होते, आपले हित होण्याचे राहून जाते, या मुद्दयाकडे समर्थ आपले लक्ष वेधू इच्छितात. सज्जनांची संगत धरा. योग्य सारासार विचार करा. अजाणता होणारे अनहित टाळा, एवढे सगळे सांगून झाल्यावर समर्थ म्हणतात, ज्ञानें हित करा रे । ज्ञान कशाला पाहिजे ? ज्ञान हित होण्यासाठी पाहिजे. कोणत्या सिनेमात नटाला एका चित्रपटाचे किती पैसे मिळतात आणि कोणत्या नटीचे काय प्रकरण आहे ? असल्या फालतू चर्चेच्या गोष्टींपासून कसले कर्माचे ज्ञान होणार आहे ? ज्यामुळे आपले हित होईल ते ज्ञान मिळविणे महत्त्वाचे. ते ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करा आणि सज्जनांच्या संगतीत राहून भयमुक्त व्हा, असा समर्थांचा तुम्हा - आम्हा सर्वांना संदेश आहे. हाच मुद्दा समर्थांनी अधिक स्पष्ट करुन सांगितला आहे. नाही रे नाहीं रे नाहीं राहणे रें । आपुले आपण हित पाहणें रे ।। गेले रे गेले रे वय गेले रे ।। दिवसेंदिवस काळें नेले रे ।। देवासी नेणतां केला शीण रे । अंतकाळी होईल कठिण रें ।। सांवरासांवरी आतां करावी रे अ दास म्हणे भक्ती भावें धरावी रे ।। आपण काही येथे म्हणजे या पृथ्वीवर चिरकाल राहण्यासाठी आलेला नाही.

जेवढा वेळ राहावयाचे असेल तेवढा वेळ आत्महिताची चिंता वाहाणे हे अधिक श्रेयस्कर. घटका गेली पळे गेली तास वाजे झणाणा, ह्यांची आठवण ठेवून समर्थ सांगतात, प्रत्येक दिवस हा भविष्य वर्तमान - भूत या प्रकाराने मागे टाकीत आपण चाललो आहोत. प्रत्येक दिवस काळाच्या उदारत गडप होत आहे. अशा वेळी आपण जर आपले हित जाणले नाहीतर आपणच चुकलो असे होईल. म्हणून काय करावे ? समर्थ सांगतात, आतातरी सावरुन घ्या. झाले गेले ते गंगेला मिळाले. यापुढे तरी आपल्या हिताची आणि कल्याणाची योग्य काळजी घ्या.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा