1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
  4. Ashtavinayak Fourth Ganapati temple Shri Varadvinayak at Mahad

वरदान देणारा करुणामय देव श्री वरदविनायक, महड

Shri-Varadvinayak-mahad
Maharashtra Tourism : श्री वरदविनायक मंदिर हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महाड गावात वसलेले आहे. श्री वरदविनायक हे अष्टविनायकांपैकी चौथे गणपती मानले जाते. अष्टविनायक यात्रेत या मंदिराला विशेष स्थान आहे. हा गणपती "वरदविनायक" (इच्छापूर्ती करणारा) म्हणून ओळखला जातो, कारण येथे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. तसेच मंदिरातील गणपतीची मूर्ती स्वयंभू  स्वतः प्रगट झालेली आहे आणि मंदिराला मठ असेही संबोधले जाते.
मंदिराची रचना-
मंदिर साधे आणि कौलारू आहे, त्याला 25 फूट उंचीचा घुमट आणि सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. तसेच मंदिराच्या चारही बाजूंना चार हत्तींच्या मूर्ती कोरलेल्या आहे. तसेच मंदिरात दोन मूर्ती असून एक शेंदूर माखलेली (डाव्या सोंडेची) आणि दुसरी शुभ्र संगमरवरी (उजव्या सोंडेची) आहे. 1690 मध्ये धोंडू पौडकर यांना तलावात सापडलेली मूर्ती गाभाऱ्याबाहेर ठेवली आहे, तर नवीन मूर्ती गाभाऱ्यात आहे.
मंदिराच्या उत्तरेला गौमुख आहे, जिथून पवित्र तीर्थ प्रवाहित होते, आणि पश्चिमेला पवित्र तलाव आहे. मंदिरात नंददीप नावाचा दिवा 1892 पासून सतत प्रज्वलित आहे.
 
वैशिष्ट्ये-
भक्तांना गणपतीच्या मूर्तीला स्पर्श करून स्वतः पूजा आणि अभिषेक करण्याची परवानगी आहे, ही इतर मंदिरांपेक्षा अनोखी परंपरा आहे. तसेच मंदिरात रिद्धी-सिद्धी, मुषिका, नवग्रह आणि शिवलिंग यांच्या मूर्तीही आहे.
 
पौराणिक कथा-
फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. त्याला मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता. तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. मग राजाने उग्र तपश्चर्या सुरु केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला. ''तुलालवकरचपुत्रप्राप्ती होईल'' असा त्याने राजाला वर दिला.काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला. त्याचे नाव रुक्मांगद. रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपविला व त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले.एकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात भटकत असता तो वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात गेला. त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरुक्त झाली, पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे कामविव्हल झालेल्या मुकुंदेने 'तू कुष्ठरोगी होशील' असा रुक्मांगदाला शाप दिला. शाप मिळता क्षणीच सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला नारदमुनी भेटले. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला.इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. त्याच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला. त्याचे नव गृत्समद. हाच तो ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा करता. गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहित झाली होती. त्यामुळे त्याचा पदोपदी पाणउतारा होऊ लागला. मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृत्समदाला हीन लेखू लागले. तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला. मग तो पापक्षालनार्थ पुष्पक (भद्रक) वनात तप करू लागला. त्याने विनायकाची आराधना केली. त्यामुळे विनायक प्रसन्न झाला. विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ''तू याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर.'' विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला. ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे महाड क्षेत्र. या ठिकाणी गृत्समदाला वर मिळाला म्हणून येथील विनायकाला 'वरद विनायक' म्हणतात. गृत्समद हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो. पुरातन काळात महडचे नांव मणिपूर वा मणिभद्र होते
 
उत्सव-
गणेश चतुर्थी आणि माघ प्रतिपदा ते पंचमी येथे विशेष उत्सव साजरे होतात. माघी चतुर्थीला पुत्रप्राप्तीसाठी भक्त मोठ्या संख्येने येतात, कारण येथील प्रसादरूपी नारळ सेवनाने पुत्रप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे.
 
आसपासची ठिकाणे-
खंडाळा आणि लोणावळा 
कार्ला 
देहू  
श्री वरदविनायक महड जावे कसे? 
रस्ता मार्ग-श्री वरदविनायक मंदिर पुणे-मुंबई महामार्गापासून ३-४ किमी अंतरावर आहे. खोपोलीपासून ६ किमी, लोणावळ्यापासून २१ किमी, आणि कर्जतपासून २५ किमी अंतरावर आहे. 
विमान मार्ग-मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ असून 90 किमी अंतरावर आहे.