शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018 (14:49 IST)

या एकमेव शिवमंदिरात फडकविला जातो तिरंगा

भारत हा मंदिरांचा देश आहे. येथे हजारो मंदिरे आहेत तसेच त्यांची वास्तुरचना, इतिहास, पूजा नियम, स्थाने ही वेगवेगळी आहेत. मात्र देवाच्या भक्तीबरोबरच देशाच्या स्वातंत्र्याचा मानही जेथे राखला जातो असे एकमेव मंदिर आहे ते रांचीमधील पहाडी शिवमंदिर.
 
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रत्येक स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनाला मंदिराच्या ध्वजाबरोबरच तिरंगा फडकविला जातो. या मंदिराची कहाणी मोठी रोचक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात यावर ब्रिटिशांचा ताबा होता व येथे ब्रिटिश, स्वातंत्र्यसैनिकांना फाशी देत असत. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या स्वातंत्र्यदिनाला येथे भारताचा तिरंगा फडकावला गेला. रांचीत फडकलेला हा पहिला तिरंगा होता.
 
स्वातंत्र्यसैनिक कृष्णचंद्र दास यांनी तो फडकावला होता व शहिदांची आठवण व त्यांना सन्मान देण्यासाठी नंतर प्रतिवर्षी येथे ध्वजारोहण केले जाऊ लागले. येथे एक शिला आहे त्यावर 14 व 15 ऑगस्ट 1947 चा मध्यरात्रीचा स्वातंत्र्याचा संदेश कोरला आहे. रेल्वे स्टेशनपासून 7 किमी वर असलेल्या या मंदिराचे जुने नांव होते टिरीबुरू. ब्रिटिश आल्यानंतर त्यांचे नांव पडले फांसी गरी. कारण येथे स्वातंत्र्यसैनिकांना फासावर लटकविले जात होते.
 
समुद्रसपाटीपासून 2140 फूट व जमिनीपासून 350 फूट उंचीच्या लहानशा टेकडीवर हे शिवमंदिर आहे. 468 पायर्‍या चढून महादेवाचे दर्शन घेता येते. मंदिराच्या टेकडीवर चढून गेल्यानंतर संपूर्ण रांचीचे मनोहारी दर्शन घडते.