गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : बुधवार, 23 जून 2021 (07:50 IST)

शिवराज्याभिषेक दिन विशेष: जय भवानी .. जय शिवाजी.... (तिथीप्रमाणे)

शिवरायांनी तक्तारूढ व्हावे म्हणून सुवर्णाचे तक्त, बत्तीस मणांचे, राजकोषात जेवढी अमूल्य रत्ने होती त्यामधून मोठी मौल्यवान रत्ने तक्तास जडावीत केले. रायरीचे नाव बदलून ''रायगड'' ठेविले आणि सिहांसनास ते गड नेमले. सप्त महानद्यांची उदक, समुद्राची उदक, तीर्थक्षेत्रातील तीर्थोदक आणले. आठ सुवर्ण कलश, आठ तांब्यांनी अभिषेक अष्टप्रधानांनी करावे त्यासाठी सुदिन मुहूर्त "शालिवाहन शके 1596, ज्येष्ठमासी शुद्ध 13 स मुहूर्त काढला. साढेचार हजार राजांना निमंत्रणे पाठवले गेले. रायगडावर साढेचार हजार राजे अभिषेकासाठी जमले होते.गागाभट्टांनी पवित्र सप्त नद्यांचे जल आणले.
 
राजे ब्राह्म मुहूर्तावर उठले, स्नान करून शिवाईमातेला अभिषेक केला आणि माता जिजाऊंचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. कवड्यांची माळ घातली, जिरेटोप डोक्यावर ठेवून भवानीमातेची तलवार कंबरेस जोडून गड फिरावयास गेले. राजे दरबारात येताच त्याक्षणी साढेचार हजार राजांनी मानवंदना देऊन त्यांचे स्वागत केले. ज्या ठिकाणी बत्तीस मण्यांचे सुवर्ण, मौल्यवान रत्नजडित सिंहासन ठेवले होते त्याला तीन पायऱ्या होत्या.
 
पहिल्या पायरीवर पाऊल ठेवताच राजेंचे हृदय हेलावले. त्यांचे डोळे पाणावले त्यांना आठवले "राजे लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा मारता कामा न ये, शिवा न्हावी कितीही जन्माला येतील शिवा काशीद जन्माला येतील पण राजगडाचा शिवाजी राजा पुन्हा जन्मास येणार नाही राजे" आणि त्यांचा डोळ्यातून अश्रू गळू लागले.
 
राजेंनी दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला आणि त्यांना आठवले "राजे आपण सुखरूप विशाल गडावर जावा आणि 5 तोफ्याची गर्जना द्यावी.जो पर्यंत हे कान 5 तोफ्याची सलामी ऐकत नाही तो पर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे आपला देह ठेवणार नाही. राजेंच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले.
 
तिसऱ्या पायरीवर पाऊल ठेवताच त्यांना आठवले "राजे आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचं. जगून वाचून आलो तर राजे लेकराचे लगीन करीन नाही तर माय-बाप समजून आपणच लगीन लावून द्या" राजे ढसढसा रडू लागले.
 
आलेल्या साढेचार हजार राजांना काही कळेनासे झाले. आज तर आनंदाचा दिवस आहे, अनाथ झालेला हिंदूंना बाप भेटणार, शिवाजी राजा होणार आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू...? त्याच क्षणी तिथे उभे असलेल्या वडिलधाऱ्या व्यक्तींना राजेंनी हाक दिली. त्यांनी जवळ येऊन राजेंना विचारले राजे आजतर आनंदाचा दिवस आहे आणि आपण रडत आहात. त्यावर राजे म्हणाले काका ज्यांच्यामुळे आज मला हे सिंहासन मिळत आहे तेच बघण्यासाठी राहिले नाही. कुठल्या तोंडाने मी या सिंहासनावर बसू. हे सिंहासन मला टोचेल. या सिंहासनावर मला बसवले जाणार नाही. यातून उतराई होण्यासाठी काही मार्ग सुचवा. गेलेल्यांचे पाईक म्हणून आज आपण माझ्याकडून काही मागून घ्या.
 
ते मदारी काका म्हणून होते. ते म्हणे- "राजे जे गेले त्यांनी काही मागितले नाही तर मी काय मागावे ? " राजे म्हणाले काका आपण काहीही मागावे म्हणजे माझी उतराई होईल. यावर काका म्हणाले ठीक आहे राजे आपण एवढे म्हणत आहेत तर माझी एक इच्छा आहे, या सुवर्ण बत्तीस मणक्याचे रत्नजडित सिंहासनाची चादर बदलण्याचे कार्य या गरिबाला द्यावे या परी माझी काही मागणी नाही. यावर राजेंनी त्यांना ते कार्य सोपविण्याची हमी देऊन सिंहासन आरूढ झाले आणि पुढील कार्य पार पाडले आणि त्यांनी सत्ता सांभाळली. सगळ्यांनी शिवाजींचा जयघोष केला-
 
प्रौढप्रताप पुरंदर,
क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधीश्वर,
गो ब्राह्मण प्रतिपालक
भोसले कुलदीपक,
हिन्दवी साम्राज्य संस्थापक
मुघल जन संघारक
श्रीमान योगी,
योगिराज
बुद्धिवंत,
कीर्तिवंत
कुलवंत,
नीतिवंत
धनवंत,
सामर्थ्यवंत,
धर्मधुरंधर,
श्रीमंत श्रीमंत श्रीमंत
महाराजाधिराज
छत्रपती शिवाजी महाराजांची जय
जय भवानी .. जय शिवाजी....
हर हर महादेव