गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (18:34 IST)

महाशिवरात्री व्रतकथा

एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले, ''असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत-पूजन आहे, ज्यामुळे मृत्यू-लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल?''
उत्तरादाखल शंकराने पार्वतीला 'शिवरात्री'च्या व्रताची कथा सांगितली. 
 
'एका गावात एक शिकारी राहत होता. मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर  चुकविले नव्हते. त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनविले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती.
 
शिकारी ध्यानमग्न होऊन शिवा संबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली. सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज  फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसर्‍या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला.
 
आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला. पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान-भुकेने व्याकूळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या  बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला. बेल-वृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते. शिकार्‍याला मात्र हे माहीत नव्हते. मचाण बनविताना त्याने ज्या फांद्या  तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या. याप्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकार्‍याचे व्रतही झाले आणि त्याच्याकरवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले.
 
एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहचली. शिकार्‍याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरिणी बोलली, मी गर्भिणी  आहे, तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील. हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल. तेव्हा तू मला मार.' शिकार्‍याने धनुष्य बाजूला  ठेवले आणि हरिणी झाडांआड लुप्त झाली.
 
काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली. शिकार्‍याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले, की 'हे पारधी! मी  एक कामातूर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल.'
 
शिकारीने तिलाही जाऊ दिले. दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली. शिकार्‍याला जणू सुवर्णसंधीच  मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली, हे पारधी! मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते, यावेळी तू मला  मारू नकोस.'
 
शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे. माझी मुले तहान-भुकेने व्याकूळ झाले  असतील.
 
उत्तरादाखल हरिणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे.  माझ्यावर विश्वास ठेव. मी लगेच परत येईल.
 
हरिणीचा तो व्याकूळ स्वर ऐकून शिकार्‍याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता.  काही वेळाने एक धष्ट-पुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला.
 
पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दीनवाण्या स्वरात म्हणाला, 'हे पारधी! जर तू माझ्या आधी तीन हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस, म्हणजे  त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दु:ख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणांसाठी जीवनदान  देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल.
 
मृगाचे बोलणे ऐकून शिकार्‍याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटना-चक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकविली. तेव्हा मृगाने सांगितले, ' माझ्या तीनही पत्नी येथून  वचनबध्द होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे, मी त्यांच्यासमवेत तुझ्यासमोर हजर  होतो.
 
उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवाने  त्याच्या ह्रदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चात्ताप झाला.
 
थोड्याच वेळात मृग सपरिवार शिकार्‍यासमोर आला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकार्‍याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. शिकार्‍याने त्यांना न मारता आपणही मुक्या  प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले.
 
देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणती झाल्याबरोबर देवी-देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली.