शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. नक्षलवाद
Written By वेबदुनिया|

जखमेवर कापड बांधून लढले जवान

ND
ND
छत्तीसगडमधील दंतेवाडात झालेल्या नक्षलवादी हल्ल्याची भयाण परिस्थिती आता पत्रकार तिथे पोहोचल्यानंतर स्पष्ट होत आहे. सीआरपीएफच्या जवानांनी शेवटच्या श्वासापर्यंत नक्षलवाद्यांशी संघर्ष केला. जखमी झाल्यानंतरही त्यावर कापड बांधून तीन तास हे जवान लढत होते. विशेष म्हणजे हे सारे घडले त्यापासून सीआरपीएफचा कॅम्प चार किलोमीटवर होता. परंतु, तेथील कसलीही मदत या दरम्यान आली नाही.

घटनास्थळी भेट दिल्यानंतर सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला दिसला. जवानांचे बूट, टोपी, मॅगझीन, बेल्ट, पाण्याच्या बाटल्या आणि इतर सामान इतस्ततः विखुरलेले होते.

सीआरपीएफच्या जवानांनीही किती धैर्याने या घटनेचा मुकाबला केला हेही कळून येत होते. या जवानांच्या मदतीला धावले ते स्थानिक गावकरी. त्यांनी सांगितले, की अनेक जवान जखमांवर कापड बांधून नक्षलवाद्यांना प्रत्त्युत्तर देत होते.

घटनास्थळाजवळ असलेल्या चिंतलनार गावात निर्मम शांतता होती. अधूनमधून येणारा हेलिकॉप्टरचा गडगडाट तेवढा या शांततेवर ओरखडा उमटवत होता.

नेमकी घटना कशी नि काय घडली ते गावातील गणेश सिंह आणि लल्लू यांनी सांगितले. सीआरपीएफचे हे जवान रात्री दीडपर्यंत गावात गस्त घालत होते. सकाळी पावणे सहा वाजता उजाडत असतानाच ताडमेटलाच्या जंगलात गोळीबाराचा आणि स्फोटाचा आवाज ऐकू येऊ लागला. तिकडे असलेल्या जवानांनी बेस कॅम्पशी बोलून पाणी पाठवावे असे कळवले. सकाळी सात वाजता चिंतलनारहून संरक्षण दिलेली गाडी पाणी घेऊन रवाना झाली. ही गाडी घटनास्थळी पोहोचताच, मुख्य मार्गावरच आयईडी स्फोट घडविण्यात आला आणि हे वाहन उडवून देण्यात आले.

गाडीत फक्त चालक होता. तो मारला गेला. या घटनेनंतर चिंतलनारहून अतिरिक्त जवान पाठविण्यात आले. नक्षलवादी चिंतलनार आणि चिंतागुफा या दोन्ही ठिकाणी दबा धरून बसले होते. हे अतिरिक्त पाठवलेले जवान या दोन्ही ठिकाणी लपलेल्या नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडले. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झाली. रस्त्यापासून जेमतेम अर्धा किलोमीटरवर हा रक्तरंजित सडा पडला.

दरम्यान, घटनास्थळी चीनी बनावटीच्या बॉम्बची खोकी सापडली आहेत. नक्षलवाद्यांनी त्यांचा वापर केला असावा असे अनुमान आहे.

१४ राज्यांचे शहिद : ताडमेटलाच्या जंगलात नक्षलवाद्यांशी शहिद झालेल्या ७६ जवानांत देशाच्या चौदा राज्यातील जवान आहेत. उत्तर प्रदेशातील ४३ जवान शहिद झाले, तर उत्तराखंड व बिहारचे प्रत्येकी सहा जवान आहेत.

नक्षलवाद्यांचा 'रेड कॉरीडॉर' : आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओरीसा, उत्तर प्रदेश, उत्तरांचल व पश्चिम बंगाल, महाराष्ट्र. याशिवायही इतर अनेक राज्यांत किरकोळ नक्षली कारवाया सुरू असतात.

केरळ व गुजरातवर नजर : नक्षलवाद्यांनी आता अविकसित राज्यांबरोबरच विकसित राज्यातील अविकसित भागालाही आपल्या कब्जात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गुजरात व केरळमध्ये हात पाय पसरण्याचे त्यांचे इरादे आहेत. दक्षिण गुजरातच्या डांग व तापी नदीशी जोडलेल्या भागातून मध्यंतरी तीन जणांना अटक करण्यात आली. जनशक्ती मोर्चा या नावाच्या संस्थेचे कार्यकर्ते असलेली ही मंडळी नक्षलवादी कारवायांसाठी जमीन तयार करत होती.