गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated : शुक्रवार, 28 मे 2021 (16:14 IST)

किती आणि कधी

किती प्रामाणिक असावे,
आणि कधी आभासी राहावे?
किती खोटे हसावे,
आणि कधी खरे रडावे ?
किती वर्तनात निरागस राहावे,
आणि कधी चेहऱ्यावर कृत्रिम रंग लावावे ?
किती बागेच्या फुलासारखे उमलावे,
आणि कधी रानाच्या वृक्षासारखे वाढावे ?
किती नात्यांनी घरं भरावे,
आणि कधी जगात एकटे वावरावे?
किती मनसोक्त बोलावे,
आणि कधी समाजात चूप राहावे ?
किती प्रसन्नतेने फुलावे,
आणि कधी दुःखाने झुरावे ?
किती सर्व ताब्यात घ्यावे?
आणि कधी सर्वावर पाणी सोडावे ?
किती नियमानुसार चालावे,
आणि कधी नियमाचे विरोध करावे ?
किती मुलांवर सक्ती करावे,
आणि कधी त्यांचे मित्र बनावे?
किती खाण्याचा आग्रह करावे,
आणि कधी मनरोखून खावे ?
किती उन्मुक्त फिरावे,
आणि कधी सांभाळून पुढचं पाऊल टाकावे ?
किती सर्व सोयी वापरावे ?
आणि कधी जीवनासाठी कष्ट भोगावे ?
किती दारावर तोरण लावावे,
आणि कधी कडुलिंबाची पानं खावे ?
किती आनंदात नाचावे ?
आणि कधी अश्रू ढाळावे ?
किती जुन्या गोष्टी आठवावे,
आणि कधी झालं गेलं विसरून जावे ?
किती देवाला जपावे,
आणि कधी भाग्याला रडावे ?
किती संबंधात जीव गुंतवावे,
आणि कधी मनाला आवरावे ?
किती जगण्याचे उपाय करावे,
आणि कधी कशाला पर्याय नसावे ?
किती सर्वांशी प्रेमाने वागावे,
आणि कधी कोणाशी भांडावे ?
किती प्रश्नांच्या सागरात उतरावे,
कधी आणि कसे या प्रश्नांना सोडवावे ?
किती शब्दांना जोडावे,
आणि कधी ह्यांचे उत्तर मिळावे ?
 
अंजना माणके