गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 4 जुलै 2020 (09:32 IST)

मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा,रेड अलर्ट जारी

आज सकाळपासूनच पावसाने चांगला जोर धरला असून मुंबई आणि उपनगरांना झोडपून काढलं आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्यानं शनिवारीही मुंबई शहर आणि उपनगरातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला असून सकाळी ११ वाजून ३६ मिनिटांनी समुद्रात ४.४ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार शनिवारी मुंबईसह रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतही रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय नाशिक, पुणे येथे घाट विभागांमध्येही रेड अॅलर्ट आहे. सध्या गुजरात आणि जवळच्या परिसरामध्ये चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवस ही स्थिती कायम राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीलाच निसर्ग चक्रीवादाळामुळे महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी झाली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने सुरुवातीपासूनच जोर धरला होता, मात्र मुंबईसह अनेक शहरांत जून महिना कोरडाच गेला. त्यामुळे मुंबईत कालपासून बरसणारा हा पाऊस शनिवारीही कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच, मुंबई महानगरपालिकेनंही २४ विभाग कार्यालयातील सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई पालिकेने काय घेतली खबरदारी?
  • रेड अलर्ट जारी केल्यामुळे पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे सुसज्ज असून २९९ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आलेले पाण्याचा उपसा करणारे संच कार्यान्वित राहतील, याचीही खातरजमा करण्यात आली आहे. या अनुषंगाने आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • मुंबई अग्निशमन दलाने त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवावीत, असे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.
  • राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्यांना आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिकाऱ्यांना त्वरीत मदतीकरिता तत्पर रहाण्यास सांगण्यात आले आहे.
  • बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात विद्युत पुरवठा करणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमासह इतर विद्युत वितरण कंपन्यांना त्यांच्या पथकांसह सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • संभाव्य अतिवृष्टी आणि त्याच वेळी असणारी मोठी भरती याबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून सर्व भ्रमणध्वनी कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना सतर्क करणारे संदेश पाठविण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.
मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व पर्यायी बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ कार्यरत ठेवण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले असून त्यानुसार नियोजनात्मक अंमलबजावणी करण्यात आली आहे.
आणीबाणी मदत यंत्रणांपैकी मुंबई पोलीस दल, महापालिकेचे मुंबई अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बीईएसटी (वाहतूक व विद्युत), शिक्षण खाते, आरोग्य खाते, पर्जन्य जलवाहिन्या यासारख्या विविध यंत्रणाचे समन्वय अधिकारी, मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित असणार आहेत.
मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यकतेनुसार क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था ‘एल’ विभागाच्या ‘एल’ विभागा मार्फत करण्यात येणार आहे.
यापूर्वीच निर्धारीत करण्यात आल्यानुसार महापालिकेच्या २४ विभागांमधील तात्पुरते निवारे म्हणून निश्चित करण्यात आलेल्या मनपा शाळा त्वरीत मदतीकरिता सुसज्ज आहेत.