शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मुंबई कुणाची?
Written By वेबदुनिया|

राज ठाकरे यांना अटक

राज्यात तणाव, शेकडो मनसे कार्यकर्त्‍यांची धरपकड

पोलिसांना सातत्याने आव्हान देणा-या राज ठाकरे यांना अखेर रत्नागिरी ग्रामीण आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी पहाटे अटक केली. अटकेपूर्वी राज्या‍तील ठिकठिकाणच्या शेकडो मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच 'उचलले' आहे. तरीदेखील तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थितीवर नियंत्रणासाठी सुमारे आठ हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्‍यात आला आहे. दरम्यान, राज यांना आज रत्नागिरीहून मुंबईत आणण्यात येणार असून बांद्रा कोर्टासमोर उभे करण्यात येण्याचे सांगण्यात आले.

उत्तर भारतीयांच्या छटपूजेबाबत राज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे झारखंडच्या एका वकिलाने जमशेदपूर न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. सुनावणीच्यावेळी गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने राज यांच्या विरोधात अजामीनपात्र अटकवॉरंट काढले होते. हे वॉरंट मुंबई पोलिसांकडे दिले होते. मात्र, 'मला अटक करून दाखवा' असे गरजणा-या राज ठाकरे यांना लागलीच अटक केल्यास तणाव निर्माण होणार असल्याने रात्री उशीरापर्यत बैठका सुरू असल्याचे समजते.

दरम्यान, त्यांना झालेली अटक ही जमशेदपूर प्रकरणी नसून मुंबईत रेल्‍वे भरतीच्‍या वेळी उत्तर भारतीय विद्यार्थ्‍यांना झालेल्‍या मारहाण प्रकरणी असल्‍याची माहिती समोर आली आहे. दंगलीस प्रोत्‍साहन देणे, दंगल भडकाविणे, सरकारी अधिका-यांवर हल्‍ला करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे हे गुन्‍हे त्‍यांच्‍यावर दाखल करण्‍यात आले आहेत.

राज यांना अटक करण्यापूर्वी नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली येथील त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांची पोलिसांनी रात्रीत धरपकड सुरू करून शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर पहाटे राज यांना रत्नागिरीत अटक केली.