ममताजी तुम्ही कितीही रडा, आम्ही देशातून घुसखोरांना हाकलून देऊ; अमित शाह
अमित शाह म्हणाले की, आसाममध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर घुसखोरी संपली आहे. आता बंगाल हा एकमेव मार्ग उरला आहे, जिथून घुसखोर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहे.
२०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. कोलकाता येथे एका पत्रकार परिषदेदरम्यान, शाह यांनी जाहीर आरोपपत्र जारी करत, टीएमसीच्या १५ वर्षांच्या राजवटीला अराजकतेचा काळा अध्याय म्हटले. शाह यांनी स्पष्ट केले की, ६ मे रोजी बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन होताच घुसखोरी आणि भ्रष्टाचाराचे दिवस संपतील.
घुसखोरीच्या मुद्द्यावरून अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान देत म्हटले, "मला ममताजींना सांगायचे आहे, तुम्हाला पाहिजे तितके रडा... आम्ही प्रत्येक घुसखोराला केवळ मतदार यादीतूनच नाही, तर देशाबाहेरही हाकलून देऊ."
"घुसखोर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहेत."
आसाम मॉडेलचा दाखला देत ते म्हणाले की, भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर तेथे घुसखोरी संपली आहे. आता बंगाल हा एकमेव मार्ग उरला आहे, जिथून घुसखोर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहेत. शाह यांनी आश्वासन दिले की, भाजप सरकार स्थापन झाल्याच्या ४५ दिवसांच्या आत सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली जाईल आणि सीमा पूर्णपणे सील केली जाईल. शाह यांनी या निवडणुकीचे वर्णन जनतेसाठी मुक्तीची निवडणूक असे केले.
त्यांनी दोन स्पष्ट पर्याय दिले
भीतीपासून मुक्ती: जीव गमावण्याची भीती, मालमत्ता लुटली जाण्याची भीती, नोकरी गमावण्याची भीती आणि महिलांच्या असुरक्षिततेपासून मुक्ती.
विश्वासाची हमी: शांतता, सन्मानजनक जीवन, मोफत वैद्यकीय उपचार, कायमस्वरूपी घरे, मोफत वीज आणि तरुणांसाठी उज्ज्वल भविष्य.
शाह म्हणाले, "विकास आणि उद्योगधंद्यांच्या अभावामुळे बंगाल आज कारखान्यांची स्मशानभूमी बनले आहे. 'सोनार बांगला'चे स्वप्न दाखवून टीएमसीने सिंडिकेट राजवट स्थापन केली आणि लोकांचे शोषण केले. बंगाल भ्रष्टाचाराची प्रयोगशाळा बनले आहे, जिथे वरपासून खालपर्यंत केवळ खंडणीचाच खेळ चालतो."
Edited By- Dhanashri Naik