1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 मार्च 2018 (10:46 IST)

भारतात बालविवाहाचे प्रमाण घटले, युनिसेफचा अहवाल

भारतात बालविवाहाचे प्रमाण झपाट्याने कमी होत असून गेल्या दशकात 27 टक्क्यांवर आले आहे, असे संयुक्त नेशन्स चिल्ड्रन्स एजन्सी युनिसेफने म्हटले आहे. याआधी हेच प्रमाण देशात 47 टक्के होते. भारतात बालविवाहाचे प्रमाण घटल्याने जगभरातही बालविवाहात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे यासंदर्भातील अहवालात म्हटले आहे.

गेल्या दशकभरात मुलींचे लहान वयात लग्न होण्याचे प्रमाण15 टक्क्यांनी घटले आहे. चारपैकी एकवरुन ते पाचपैकी एकवर असे हे प्रमाण झाले. याबाबत युनिसेफने जारी केलेल्या विधानानुसार, जगभरात गेल्या 10 वर्षात (2005 - 06 ते 2015-2016)25 दशलक्ष बालविवाह रोखण्यात आले. यात दक्षिण आशिया विशेषत: भारतातील बालविवाहांचे प्रमाण जास्त आहे. भारतात वेगाने होत असलेल्या विकासाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दशकात मुलींचा 18 वर्षाच्या आत विवाह लावून देण्याचे प्रमाण 50 टक्क्यांवरुन 30 टक्क्यांवर आले. मुलींच्या शिक्षणाचे वाढते प्रमाण, किशोरवयीन मुलींसाठी सरकारतर्फे उत्स्फूर्तपणे करण्यात आलेली गुंतवणूक तसेच बालविवाह बेकायदेशीर आहे याबद्दल सर्वसामान्यांमध्ये झालेली मोठ्या प्रमाणात जनजागृती यामुळे बालविवाहाचे प्रमाण घटल्याचे युनिसेफने म्हटले आहे.