गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (20:59 IST)

नाशिकमध्ये १९ ते २५ सप्टेंबर जमाव बंदी लागू

देशात घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे.  शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी १९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर असे १५ दिवस मनाई आदेश लागू असणार आहेत. शहरात मोर्चे, निदर्शन, धरणे, बंद पुकारणे, उपोषण, आंदोलन याला बंदी असणार आहे.
 
आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार, कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड, अथवा शस्त्र, सोडवायची असते किंवा फेकायची हत्यारे किंवा अशी साधने बरोबर बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. शरीराला इजा पोहोचेल अशा वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही व्यक्तीचे चित्र, प्रतिमात्मक प्रेताचे किंवा पुढार्‍यांची चित्राच्या प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करणे. मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे. वाद्य वाजवणे, शहराची सुरक्षितता धोक्यात पोहोचेल असे भाष्य करणे किंवा कृत्य करणे, सार्वजनिकरीत्या एकत्र जमवून महाआरती करणे, वाहरांवर झेंडे लावून शहरात फिरणे, पेढे वाटणे, फटाके वाजवणे, घंटानात करणे, धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी करणे, पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे, त्याशिवाय पूर्वपरवानगीशिवाय सभा घेणे मिरवणूक काढणे. या सर्व कृत्यांना मनाई आदेश लागू केले आहे. आदेशांचे उल्लंघन करणारे महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र राहतील, असा इशारा पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी दिला आहे.
 
बिलकिस बानो प्रकरणावरून मुस्लिम समाजाकडून उमटणाऱ्या प्रतिक्रिया, अग्निपथ सैन्य भरतीविरोधाच्या अनुषंगाने आंदोलन आणि निदर्शने, राजकीय पक्षात सत्ता स्थापनेवरून पक्षात फूट पडल्याचे कारणावरून एकमेकांविषयी होत असलेले आरोप आणि प्रत्यारोप. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मनाई आदेश लागू केले जात असल्याचं पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी त्यासोबतच आगामी काळातील धार्मिक सण- उत्सव यासह विविध संघटनांकडून होणारी निदर्शने, आंदोलनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी १९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर यादरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार मनाई आदेश लागू केले आहेत.