1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 एप्रिल 2022 (16:20 IST)

खासदार संजय राऊत नाशकात; राज ठाकरे यांना लगावला हा जोरदार टोला

sanjay raut
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी पंचवटीत श्री काळारामाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे देतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.राऊत म्हणाले की, नाशिक ही रामाची पवित्र भूमी आहे. पण काही लोक हनुमान चालीसा पठण करायला पुण्यात पोहचलेत. राज ठाकरे हे आज पुण्यात हनुमान चालिसा पठण करणार असल्याने राऊत यांनी हा टोला लगावला. तसेच,  ज्यांनी भाड्याने हिंदुत्व घेतलंय, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. भोंगे आणि हनुमान चालीसाच्या मुद्द्यावर तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नव हिंदू ओवेसी यांच्या मार्फत राज्यात दंगली घडवण्याचं कारस्थान रचलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कोर्टाच्या निर्देशानुसार जे अनधिकृत भोंगे उतरवले पाहिजेत, ही सुरुवातीपासून आमची भूमिका आहे. जातीय तणाव निर्माण करून निवडणूका जिंकणं हा पॅटर्न आणि पॅकेज आहे. मात्र राज्यात, देशात दुफळी माजेल असं कुणी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
 
कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निकालावर राऊत म्हणाले की, कोल्हापूरच्या जनतेने भाजपचे भोंगे खाली उतरवले आहेत. यातून त्यांनी यो्य तो धडा घ्यावा. आता निकाल लागल्याने हिमालयात कोण जातंय हे पाहूया. भोंग्याचं राजकारण आजच संपलंय हे मात्र नक्की. यंदा रामनवमीला १० राज्यात दंगली घडल्या. हे सुद्धा आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची सुरुवात केली हे सांगण्याची गरज नाही. हिजाबचा मुद्दा उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर संपला आहे. तो केवळ निवडणुकीपुरताच होता.  ज्या राज्यात निवडणुका त्या राज्यात अशा मुद्द्यांवर दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातो. याचा अर्थ काय आहे. कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न सांगून राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जातो.  महाराष्ट्रात सत्ता येत नाही, म्हणून भाजप नैराश्याने ग्रासला आहे. महाराष्ट्रात कोणाच्याही जीवाला धोका नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येला जाणार आहेत. नाशिक शिवसेनेकडून अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर कार्यक्रमाचं नियोजन सुरू आहे. मे च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा कार्यक्रम होईल. नाशिक शिवसेना हा कार्यक्रम करणार आहे. राज्यात रामराज्य आणण्याचा उद्धव ठाकरेंचा संकल्प त्यासाठीच आम्ही अयोध्येत कार्यक्रम घेत आहोत. भाजपने तपास यंत्रणांच्या माध्यमातून माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न, पण माझा आवाज बंद होणार नाही. गुंडांकरवी आम्हाला गोळ्याही घातल्या जातील, असेही ते म्हणाले.