मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 जानेवारी 2023 (20:56 IST)

नाना पटोले यांनी भुजबळांना सुनावले, तांबेचाही घेतला समाचार

nana patole
‘आपलं कुटूंब मजबूत असेल तर घर फुटत नाही. असे वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीवर केले होते. यावर नाना पटोले यांनी भुजबळांना टोचणे दिले आहे. ‘हा आमचा घरचा मामला, बाहेरच्या लोकांचा आम्हाला सल्ला नको. आपण 1 बोट दुसऱ्याकडे दाखवतो मात्र 4 बोटं आपल्याकडे आहेत असे नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोले नाशिक दौऱ्यावर असून महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या समर्थनार्थ त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
ते म्हणाले, हा आमचा घरचा मामला, बाहेरच्या लोकांचा आम्हाला सल्ला नको. आपण 1 बोट दुसऱ्याकडे दाखवतो मात्र 4 बोटं आपल्याकडे आहेत. प्रत्येकाला सगळ्या अडचणी आहेत. प्रत्येकाला सगळ्या अडचणी आहेत, काय काय भीती आहे हे सगळ्यांना माहिती आहे. असे नाना यांनी भुजबळ यांना सुनावलं आहे.
 
फडणवीस यांच्यावर बोलतांना सांगितले की, आमचे मित्र देवेंद्र फडणवीस हे आता उपमुख्यमंत्री आहेत. एवढया कालावधीनंतर फडणवीसांना हे का सुचले हा जनतेच्या प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न आहे. राज्यात १०५ आमदार निवडून आले. खासदार दिले. मी संपूर्ण मुलाखत बघत होतो. यात फडणवीस जनतेच्या प्रश्नावर काहीच का बोलले नाही. ७५ हजार रोजगार निर्माण करू हे गाजर २०१९ मध्ये दाखवण्यात आले. आता सत्तेत आले तेव्हाही दाखवण्यात येतेय. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर का बोलत नाही. त्यांची मुलाखत ऐकतांना असे वाटत होते की, ते बेरोजगारी, महागाई याबाबत बोलतील पण तसे काही झाले नाही ते स्वतः बददलच बोलत होते. सत्ताधीशांनी स्वतःपेक्षा जनतेची काळजी करावी अशी आमची अपेक्षा आहे. राजभवनात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहेत त्याचे पुरावे आम्ही दिले. राज्यपालांकडून महापुषांचा अवमान केला जातो त्यावर फडणवीस बोलतील असे वाटत होते. जनतेच्या मुळ प्रश्नांना बगल देण्याचा फडणवीस यांचा हा प्रयत्न दिसून आला असे ते म्हणाले.
 
आमच्यासाठी तांबेचा विषय क्लोझ 
राष्ट्रीय अध्यक्षांनी पाठवलेल्या एबी  फॉर्म ला तुम्ही कचऱ्याच्या पेटीत टाकलं त्याच उत्तर का देत नाही असा सवाल तांबे पिता पुत्राला  नाना पटोले यांनी केला आहे. मला त्यात जास्त जाऊ देऊ नका असा माझा त्यांनाही तुमच्या माध्यमातून (पत्रकारांच्या) सल्ला आहे, मी खोलात गेलो तर फार अडचण होईल असा इशारा त्यांना नाना पटोले यांनी दिला आहे. आमच्यासाठी तांबेचा विषय क्लोझ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
नाना पटोले म्हणाले, ‘महाराष्ट्रात मविआ म्हणून काम सुरू आहे. भाजपच्या विरोधातला आमचा जाहीर समझोता आहे. नाशिक ही आमची काँग्रेसची जागा होती, त्या बदल्यात आम्ही नागपूरची जागा त्यांना दिली. नाशिकला दोन कोरे एबी  फॉर्म पाठवले होते. अस असताना अशी धोखाधडी होईल असं आम्हाला पण वाटलं नव्हतं अशी खंत नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केली. धोखाधडी झाली म्हणून आम्ही मविआ म्हणून सेनेला पाठिंबा दिलाय असे ते म्हणाले.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, सत्यजितच्या उमेदवारीला विरोध असता तर मी कोरा फॉर्म नसता पाठवला, आम्ही जेव्हा सुधीर तांबेच्या नावाची घोषणा केली तेव्हा ही सत्यजित बाबत सांगता आलं असत. डॉ तांबे यांच्याशी बोलणं झालं तेव्हा तरी त्यांनी सांगायला हवं होतं असे नाना पटोले यांनी सुनावले आहे. असे असून मग असे खोटे आरोप कशाला करता असा सवाल त्यांनी केला आहे. वडिलांना तिकीट मिळालं तर पोराने बंडखोरी केली, पोराचा फॉर्म भरायला कोण गेलं, मग हा घरातला वाद ना! घरातला वाद काँग्रेसवर का लादता तुम्ही असे खडेबोल पटोले यांनी सुनावले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor