1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 डिसेंबर 2022 (10:02 IST)

नरेंद्र मोदी: आज समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, कसा आहे हा प्रकल्प?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (11 डिसेंबर 2022) मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणार आहे. आज पंतप्रधान मोदी हे नागपुरात दाखल झाले आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 4 डिसेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाची पाहणी केली.
 
शिंदे-फडणवीस यांनी घेतली ट्रायल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावरून नागपूर ते नाशिक प्रवास करून ट्रायल घेतली.
 
आज सकाळी अकराच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गाडी चालवत पाहणीस सुरुवात केली. यावेळी बाजूच्या सीटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते.
 
दोघांनी नागपूर ते शिर्डी असा प्रवास करून या महामार्गाचा आढावा घेतला.
समृद्धी महामार्ग नेमका कसा आहे?
मुंबई ते नागपूर 812 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 14 तास लागतात. समृद्धी हायवेमुळे हे अंतर पार करण्यासाठी 8 तास लागतील. 701 किलोमीटर या महामार्गाची लांबी आहे.
 
औरंगाबाद हे मध्यावर आहे. त्यामुळे औरंगाबाद ते नागपूर जाण्यासाठी 4 तास आणि औरंगाबाद ते मुंबई जाण्यासाठी 4 तास लागतील.
 
या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 55 हजार 477 कोटी रूपये आहे.
 
हा मार्ग राज्यातल्या 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांमधून जाणारा हा महामार्ग आहे.
 
20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र
50 हून अधिक उड्डाणपूल, 24 इंटरचेंजेस असतील. हे इंटरचेंजेस वाहनांसाठी एक्झिट पॉईंट असतील. दर पाच किलोमीटरवर अत्यावश्यक टेलिफोनची सुविधा असेल. फूड प्लाझा, रेस्टॉरंटस्, बस बे, ट्रक टर्मिनस, ट्रॉमा सेंटर या महामार्गावर असतील. समृद्धी महामार्गावर वायफायची सुविधा असेल. तसेच ट्राफिक कंट्रोलसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हा महामार्गावर 20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या महामार्गावर लँडस्केपींग, ब्रिज ब्युटीफीकेशनची सुविधा असेल.
हा महामार्ग वनक्षेत्रातून जात असल्यामुळे वन्यजीवन प्राण्यांच्या मुक्त वावरासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. या भुयारांमध्ये वाहनांचे आवाज रोखण्यासाठी ध्वनी विरोधक यंत्रणा य बसवण्यात येणार आहे. नागपूर ते शिर्डी 503 किलोमीटर रस्ता पूर्ण झालेला आहे. 1 मे ला त्याचं उद्घाटन होईल. 2022 पर्यंत हा महामार्ग पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं गेलय. सध्या 44% काम पूर्ण झाले आहे.

सुरुवातीला विरोध नंतर बाळासाहेबांचंच नाव
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात समृद्धी महामार्गाची घोषणा करण्यात आली. फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या प्रकल्पासाठी जमिन भूसंपादनाला अनेक ठिकाणी कडाडून विरोध झाला. पाच पट मोबदला देऊन जमिन भूसंपादीत करण्यात आली. सुरवातीला शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शिवसेनेने समृद्धी महामार्गाला विरोध केला पण नंतर पक्षाने आपली भूमिका बदलली. या महामार्गाला हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नावं देण्याची मागणी 2014 च्या युती सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली होती. पण भाजपकडून अटलबिहारी वाजपेयींचं नाव देण्याचा आग्रह होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पेच निर्माण झाला. नोव्हेंबर 2019 ला महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी हे नावं बदलून हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग ठेवलं.
Published By- Priya Dixit