1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (22:01 IST)

डिसेंबर २०२३ पासून चार टप्प्यात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण

samruddhi-mahamarg
नागपूर ते शिर्डी टप्पा पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते सिन्नर असा ५६५ किमीचा महामार्ग फेब्रुवारीअखेरीस तर नागपूर ते भरवीर जंक्शन (सिन्नर-घोटी रस्ता) असा ६०० किमीचा टप्पा मार्चअखेरीस पूर्ण होईल. तसेच नागपूर ते इगतपुरी असा ६२३ किमीचा टप्पा मे अखेरीस पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ दिली. इगतपुरीपर्यंतचा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ७८ किमीचा टप्पा पूर्ण होण्यासाठी मात्र मे पासून पुढे सहा महिने लागणार आहेत. या टप्प्यात खर्डी येथे दोन किमीचा एक पूल असून तो अत्यंत आव्हानात्मक आहे. या पूलाचे खांब तब्बल ७४ मीटर उंच असणार असून एक टप्पा १४० मीटरचा आहे. हे काम पूर्ण करण्यास जास्त कालावधी लागणार आहे. त्यामुळे नागपूर ते ठाणे (मुंबई) असा ७०१ किमीचा टप्पा डिसेंबर २०२३ अखेरीस पूर्ण होईल असेही गायकवाड यांनी सांगितले. नागपूर येथून सुरू झालेला हा महामार्ग ठाण्यातील आमाणे गावात (शांगरीला रिसॉर्टपासून सहा किमी दूर) येथून येऊन संपणार आहे. त्यानुसार प्रवाशांना डिसेंबर २०२३ पासून ताशी १२० किमी वेगाने आठ तासात प्रवास करता येणार आहे.
 
लोकार्पणाचे चार टप्पे असे
टप्पा-अंतर (किमी)-लोकार्पण कधी
नागपूर ते शिर्डी-५२० किमी-११ डिसेंबर २०२२
नागपूर ते सिन्नर-५६५ किमी-फेब्रुवारी २०२३
नागपूर ते भरवीर जंक्शन-६००किमी-मार्च २०२३
नागपूर ते ठाणे (मुंबई)-७०१ किमी-डिसेंबर २०२३
Edited by : Ratnadeep Ranshoor