1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Prakash Ambedkar's statement that there are differences in taking us into Mahavikas Aghadi

महाविकास आघाडीत आम्हाला घ्यायला मतभेद आहेत प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

prakash ambedkar
‘राष्ट्रवादी हा श्रीमंत मराठ्यांचा पक्ष आहे, त्यांना गरीब मराठा चालत नाही’ असे म्हणत अॅड  प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादी कॉंग्रेस वर टीका केली आहे. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गरिबाला सत्तेत येऊच द्यायचं नाही. महाविकास आघाडीत आम्हाला घ्यायला मतभेद आहे’ असा खुलासा  त्यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत केला आहे. 
 
‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्हाला घ्यायला विरोध आहे. मात्र आम्हाला सोबत घेण्याबाबत उध्दव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा, उद्धव ठाकरे यांनी फक्त असं कळवले होते की, आम्ही वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा विचार करू. मात्र अजित पवार म्हणाले की, हा प्रश्न अजून विचाराधीन आहे, याचा अर्थ नाही असाच होतो’ अशी प्रतिक्रिया देत त्यांनी राष्ट्रवादीला गरिबांना सत्तेत येऊ द्यायचे नाही अशी टीका केली आहे.
 
प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईत इंदू मिल मध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या पुतळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण मुख्यमंत्री यांना भेटल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. त्याचवेळी इंदू मिलच्या नियोजित स्मारकात डॉ. आंबेडकर यांच्या नावाने एक इन्स्टिट्यूशन सुरू करावी, अशी मागणी ही मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. या भेटी मागे कोणतेही राजकारण नसल्याचा दावा त्यांनी केला होता. यावर नाशकात बोलताना ‘मी एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलो नाही तर तेच राजगृहावर भेटायला आले होते आणि एक कुटुंब म्हणून आम्ही स्वागत केलं, इंदू मिल संदर्भात विषयांवर चर्चा झाली’ अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
 
सध्या महाराष्ट्रात सुरु असलेले वादग्रस्त वक्तव्य आणि राजकारणावरही प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे. एक गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे. महापुरुषांनी आदर्श समाजात ठेवला आहे. त्यांच्याबाबत विधाने होत आहे असे ते म्हणाले . तर ‘भाजपचा सामाजिक आणि राजकीय लढ्यात सहभाग नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सिम्बॉल्स नाहीये. म्हणून जे सिम्बॉल्स आहे, त्याला काळे फासण्याचे काम सुरू आहे. जाता जाता चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, आरएसएस ने खोक्याच्या संस्कृतीतून संस्था उभ्या केल्या. त्यांनी जर वेळ दिला तर आम्ही जाहीर सत्कार करू.  भाजप वर मीच जास्त टीका करतो. मी चाळीस वर्षे राजकारणात आहे, पण डाग नाही, सगळे डागळलेले आहे असे सांगत भाजपसह कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor
पुढील लेख
हॉस्पिटलमध्ये आढळले अवैध सोनोग्राफी मशीन