गुरूवार, 16 एप्रिल 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Last Modified: गुरूवार, 16 एप्रिल 2026 (12:31 IST)

राज ठाकरेंचे खरात प्रकरणावर भाष्य: "शेताला पाणी नाही पण खरातला पाणी मिळतं", मनसे अध्यक्षांचा सरकारवर घणाघात

राज ठाकरेंचे खरात प्रकरणावर भाष्य
मुंबई : राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच गाजत आहे. अशामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच या प्रकरणात जाहीर भाष्य केले आहे. मुंबईतील प्रभादेवी येथे होणाऱ्या कै. काकासाहेब पुरंदरे सन्मान सोहळ्यात भाषण करताना राज ठाकरे म्हणाले की, “इथे शेताला पाणी मिळत नाही, पण खरातला मात्र पाणी मिळत आहे. अशी प्रकरणे ही कोणाची तरी वाट लावायची म्हणून योग्य वेळी बाहेर काढली जातात.” असे म्हणत त्यांनी आपले परखड मत मांडले.
 
काय म्हणाले राज ठाकरे?
आजच्या पत्रकारितेवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, “मला आजच्या तरुण पत्रकार मुला-मुलींची कीव येते. ऑफिस त्यांना ‘काहीतरी घेऊन या,’ सांगतात. आता काय घेऊन यावे? कोणाचे तरी कपडे फाडल्याशिवाय बातमी होत नाही. आजच्या पत्रकारितेचे अनेक पदर आहेत, ते उघडले तर सगळे नागडे होतील. अनेक पत्रकार आता मंत्र्यांकडे कामाला आहेत. जे स्वतः विकले गेले आहेत, त्यांच्या मतांना काय किंमत द्यायची?” असा सवाल त्यांनी य्पास्थित केला.
 
अशोक खरात प्रकरणावर काय म्हणाले?
“कोणतरी आला हा खरात, इकडे शेताला पाणी मिळत नाही, पण खरातला मात्र पाणी मिळत आहे. अशी जी काही प्रकरणे आहेत, ती कोणाची तरी वाट लावायची म्हणून योग्य वेळी बाहेर काढली जातात. सध्या जे काही सुरू आहे, त्यातून लोक सुधारतील अशी अपेक्षा आहे, जेणेकरून मला पुन्हा व्यंगचित्र काढण्याची संधी मिळेल.” असे म्हणत राज ठाकरेंनी अशोक खरात प्रकरणावर भाष्य केले आहे.
 
राज ठाकरेंनी स्वताचे वृत्तपत्र का काढले नाही?
राज ठाकरे यांनी यावेळी स्वतःचे वृत्तपत्र का काढले नाही? यावर भाष्य केले. “माझी वृत्तपत्र काढण्याची इच्छा होती, पण बरे झाले काढले नाही. कारण आजची वृत्तपत्रे जाहिरातींवर चालतात आणि त्यासाठी जे करावे लागते, ते मला जमले नसते. मी तर मेलेला कोंबडा आहे, ज्याला आता आगीची भीती नाही.”