गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (16:40 IST)

भाविकांचा कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये?’ राज यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

‘सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे. ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये?’, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यासंबंधी विचारणा केली आहे.
 
तसेच ‘अनलॉक क्रमांक अमुक तमुक अशा अनलॉक प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरु आहेत, मॉल्स उघडले जात आहेत. सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १०० करण्याची परवानगी दिली जात आहे आणि या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरुच आहे, असं का? या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?,’ असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.
 
‘करोनामुळे जेव्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. तेव्हा मंदिरं बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचं आम्ही देखील समर्थन केलं होतं. पण, आज जेव्हा दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असताना नेमकी महाराष्ट्रात देवळं का बंद ठेवली जात आहेत? जर मॉल आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सरकार निर्बंध शिथील करताना काही नियमांची चौकट आखून देऊ शकते तर तशीच गोष्ट मंदिर प्रवेशासाठी देखील असू द्या,’ असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तसेच सरकारच्या आदेशांचे अत्यंत समजूतदारपणाने पालन केले आहे. त्यामुळे उद्या मंदिर उघडली तर या या राज्यातील माझा हिंदू बांधव आखून दिलेले नियम काटेकोरपणे पाळेल याची मला खात्री आहे.
 
‘मंदिरं सुरु करणं म्हणजे निव्वळ काही भक्तांच्या पुरता हा विषय मर्यादित नाही. इथे त्यात देवाची सेवा करणारे पुजारी असोत, गुरव असोत की त्या मंदिरावर अवलंबून असणारी एक छोटीशी अर्थव्यवस्था असो यांचा सरकार विचार करणार आहे की नाही? एका मंदिरावर त्या गावाची, त्या शहराची अर्थव्यवस्था अवलंबून असते. ती अर्थव्यवस्थाच जर कोलमडणार असेल तर त्यांना साकडं घालायचं कोणाकडे?,’ अशी विचारणा राज ठाकरेंनी केली आहे.