1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (21:29 IST)

संजय राऊत यांना काहीही कारण नसताना अटक केली गेली, पीएमएलएचा निर्णय

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. संजय राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी मिळून हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यांच्या घरात छापेमारी करून ईडीने त्यांना ताब्यात घेतलं. संपूर्ण चौकशीअंती ईडीने त्यांना अटक केली. मात्र, ईडीने केलेली अटक बेकायदेशीर होती, असा महत्त्वाचा निर्वाळा पीएमएलए कोर्टाने दिला. यावरून पीएमएलए कोर्टाने ईडीला झापलं आहे.
 
पीएमएलए कोर्टाने १२२ पानी आदेशपत्र जारी केले आहेत. संजय राऊतांना झालेली अटक बेकायदेशीर होती. या प्रकरणात ईडीने आपल्या मर्जीने आरोपी निवडले. राकेश आणि सारंग वाधवान हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना अवैधरित्या पकडलं, असं पीएमएलए कोर्टाने त्यांच्या आदेशात म्हटले आहे. तसंच, संजय राऊत आरोपी आहेत, याचे पुरावे द्या असंही कोर्टाने ईडीला म्हटलं आहे.
 
दिवाणी खटले हे मनी लाँड्रिंग किंवा आर्थिक गुन्हे अशा नावाखाली आणून निर्दोष लोकांना त्यात ओढून आणि अटक करून अशा परिस्थितीत आणणं हे न्यायालय मान्य करू शकत नाही. प्रवीण राऊत यांना फक्त दिवाणी खटल्यात अटक करण्यात आली तर संजय राऊत यांना काहीही कारण नसताना अटक केली गेली असल्याची महत्त्वाची टिप्पणीही पीएमएलए कोर्टाने केली.

Edited by- Ratnadeep Ranshoor