बुधवार, 11 फेब्रुवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे पुण्यात निधन

ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे पुण्यात निधन
पुणे : भारतातील पर्यावरण चळवळीचे प्रमुख स्तंभ आणि पश्चिम घाटांच्या संरक्षणासाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ (वय ८३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ७ जानेवारी २०२६ रोजी रात्री उशिरा पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मुलाने सिद्धार्थ गाडगीळ यांनी ही दु:खद बातमी जाहीर केली.
 
डॉ. गाडगीळ हे पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समितीचे (गाडगीळ समिती) अध्यक्ष होते. त्यांच्या २०११ च्या अहवालाने पश्चिम घाटांच्या संरक्षणासाठी कठोर शिफारसी केल्या होत्या, ज्यामुळे मोठी चर्चा आणि वाद निर्माण झाला होता. तरीही, केरळ आणि महाराष्ट्रातील पूर व भूस्खलनासारख्या आपत्तींनंतर त्यांच्या शिफारसींचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.
 
त्यांनी भारताचा पहिला बायोस्फियर रिझर्व्ह (निलगिरी बायोस्फियर रिझर्व्ह) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जैवविविधता कायदा २००२ आणि वन अधिकार कायदा २००६ च्या मसुद्यातही त्यांचा मोठा वाटा होता. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) बेंगळुरू येथे त्यांनी सेंटर फॉर इकोलॉजिकल सायन्सेसची स्थापना केली.
 
डॉ. गाडगीळ यांना पद्मश्री (१९८१), पद्मभूषण (२००६) आणि २०२४ मध्ये संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या निधनाने पर्यावरण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जयराम रमेश, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला.