शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 26 मे 2023 (09:05 IST)

मुंबईहुन ‘या’ शहरादरम्यान सुरु होणार वंदे भारत एक्सप्रेस !

भारतीय रेल्वेचा चेहरा-मोहरा गेल्या काही वर्षात संपूर्णपणे बदलून गेला आहे. आता भारतीय रेल्वे इतर विकसित देशातील रेल्वेला टक्कर देत आहे. विशेषता जेव्हापासून भारतीय रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारत एक्सप्रेस दाखल झाली आहे तेव्हापासून इंडियन रेल्वे (indian railway) चे चित्र झपाट्याने बदलत आहे.

या ट्रेनमुळे रेल्वे प्रवास अधिक गतिमान आणि सुरक्षित झाला आहे. 180 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यास सक्षम असलेल्या या संपूर्ण भारतीय बनावटीच्या ट्रेनमुळे रेल्वे प्रवास गतिमान झाला असून लोक आता रेल्वेच्या प्रवासाला पसंती दाखवत आहेत. या पार्श्वभूमीवर आता शासनाच्या माध्यमातून देशातील महत्त्वाच्या मार्गावर ही हायस्पीड ट्रेन चालवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान राजकीय नेत्यांनी देखील ही ट्रेन विविध मार्गावर चालवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. यातच आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्याची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे या मागणीचे पत्र चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना नुकतेच पाठवले आहे. या पत्रात पाटील यांनी मुंबई- कोल्हापूर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करावी. त्यामुळे या दोन शहरांच्या प्रवासातील वेळ कमी होईल. सोबतच या मार्गावरील प्रवाशांना यामुळे सुविधा उपलब्ध होईल असं नमूद केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मुंबई कोल्हापूर हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग असून देशातील सर्वच महत्त्वाचे रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत असल्याने याही मार्गावरील ट्रेन सुरू होणे जरुरीचे असल्याचे पत्रात सांगितले आहे. कोल्हापूर हे औद्योगिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे.
शिवाय कोल्हापूर शहर पर्यटनात्मक दृष्ट्या अति महत्त्वाचे आहे. एवढेच नाही तर कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाई मातेचे मंदिर आहे. जे की एक शक्ती पीठ असून या मंदिरात दर्शनासाठी मुंबईहून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.

तसेच कोल्हापूरहून रोजाना कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे. एकंदरीत कोल्हापूर मुंबई रेल्वे मार्ग हा रहदारीचा रेल्वे मार्ग आहे. मात्र या रेल्वे मार्गावर फक्त दोनच ट्रेन सध्या सुरू असून यामुळे रेल्वे प्रवाशांना या दोन शहरात दरम्यांचा प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी प्रवासी रस्ते मार्गे प्रामुख्याने वाहतूक करत आहेत.

वाहतुकीत खाजगी वाहनांचा तसेच बसेसचा वापर सर्वाधिक आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल आणि मुंबई ते कोल्हापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्याकडे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे कोल्हापूर वासियांचे विशेष लक्ष लागून आहे.


Edited by -Ratnadeep Ranshoor