1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जून 2020 (17:02 IST)

उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, पुन्हा लॉकडाऊन नाही

काही समाज माध्यमांमध्ये व वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. अशा प्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही.
 
अशा बातम्या जनमाणसांत संभ्रम निर्माण करतात त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत. अशा गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे. आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. आपले व्यवहार हळूहळू सुरु करीत आहोत. पण लॉकडाऊन उठवतो आहोत याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही.
 
बाहेर पडल्यावर कायम चेहऱ्याला मास्क लावणे, साबणाने, जंतूनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल पण ही जीवन पद्धती सर्वांनी स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीच अंगिकारावी लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
 
तत्पुर्वी लोकांनी अजूनही एकमेकांपासून अंतर ठेवून राहिलं पाहिजे. सरकारने दिलेली उघडीप जीवघेणी ठरू शकते, असं वाटल्यास नाईलाजाने पुन्हा लॉकडाऊन जाहीर करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत वादळाचा फटका बसलेल्या कोकणाला दिलेल्या मदतीची माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेदेखील यावेळी उपस्थित होते.
 
पत्रकारांनी यावेळी लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात दिलेल्या सवलतींबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना उद्धव यांनी म्हटलं, की आपल्याला खूप सावध राहून पुढे जगावं लागणार आहे. त्यामुळे सरकार जपून पावलं टाकत आहे.
 
कुठेही घाईगडबड न करता लॉकडाऊमध्ये शिथीलता टप्प्याटप्प्यानं आणली जाईल. अजूनही संकट टळलेलं नाही. पण कोरोनासोबत लढत असताना आपल्याला अर्थचक्रही बंद करून चालणार नाही, असंही उद्धव यांनी स्पष्ट केलं.
 
अनलॉकच्या पहिल्याच दिवशी मैदानावर व्यायाम करायला जी झुंबड उडालेली पाहिली, ते पाहून भीती वाटली. सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेत आहे, उघडीप ही जीवघेणी ठरत आहे, असं वाटलं तर नाईलाजानं पुन्हा लॉकडाऊन जाहीर करावा लागेल, असं ठाकरेंनी म्हटलं. .
 
उद्धव यांनी म्हटलं, की अत्यावश्यक सेवेसाठी लोकलची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. पण ही मागणी जीवनावश्यक वस्तू पुरवणारे जे कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी करत आहोत.
 
कोकणातील वादळग्रस्तांना किती आणि कोणती मदत?
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. नुकसान भरपाई, पंचनामे सुरु आहेत. रायगडला तात्काळ मदत केलीआहे.
कोकणात वादळामुळे वीजेचे खांब उखडले गेले आहेत. त्यांच्या दुरूस्तीसाठी एक पथक पाठवण्यात येणार आहे.
गरीबांना प्रति झोपडी 15 हजार, काजू, द्राक्ष, फणस यांच्यासारख्या बागांना हेक्टरी 50 हजारांपर्यंत मदत देण्यात येणार आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता वाढीव मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकणातील नुकसानग्रस्त नागरिकांना मदत म्हणून प्रतिकुटुंब कपड्यांसाठी आणि भांड्यांसाठी 5 हजार रुपये दिले जातील.
उद्धवस्त झालेल्या झोपड्यांसाठी 15 हजार रुपये दिले जाणार आहेत. .
प्रतिकुटुंब पाच लीटर रॉकेल दिलं जाईल तसंच भिजलेले धान्य बदलून देणार आहेत.
कोकणात मुख्यतः पत्र्यांच्या घरांचं नुकसान झालं आहे. त्यांना स्लॅबची घरं देता येतील का याबाबत विचार करण्यात येत आहे, असं पवार म्हणाले.