गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (17:12 IST)

दिवाळीत किल्ला का बनवतात, त्याचे महत्त्व आणि त्यामागील इतिहास काय आहे जाणून घ्या

दिवाळीचा सण काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. लहानांपासून ते मोठ्यानं पर्यंत सर्व या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. हा सर्वात मोठा सण आहे. दसऱ्याच्या 20 दिवसांनंतर दिवाळी येते. हा सण संपूर्ण देशात आनंदानं आणि उत्साहानं साजरा केला जातो. या सणासाठी प्रत्येक भागात काही विशिष्ट परंपरा आहेत. दिवाळीत महाराष्ट्रात किल्ले बनवतात. किल्ला बनववण्यासाठी जय्य्त तयारी केली जाते. घराच्या बाहेर किल्ले बनवले जातात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत किल्ला बनवण्यासाठी विशेष उत्साही असतात. महाराष्ट्रात किल्ले बनवण्याच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. पण हे किल्ले का बनवतात याचे महत्त्व काय आहे जाणून घेऊ या. 
 
किल्ला बांधणे म्हणजे स्वत:च्या मन आणि बुद्धी यांवर ईश्वराच्या शक्तीचे तेज निर्माण होणे. म्हणूनच किल्ला बांधणे या माध्यमातून आपण ईश्वराचे तेज प्राप्त करू शकतो.
 
इतिहास -
महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या मागील इतिहास आहे. महाराष्ट्रातील किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा योद्धा आणि  राजा असे. हे किल्ले दगडी असून अभेद्य असायचे.
 
किल्ल्ला लहान मुलेच का बनवतात -
लहान मुलंमध्ये निरागसता असते. लहान मुले ही ‘ईश्वराचे रूप असतात’, असे म्हटले जाते; कारण लहान मुलांच्या मनावर जास्त संस्कार झालेले नसतात.ते मानाने खूप निर्मळ असतात. 11 वर्षापर्यंतची मुले ही निरागस असतात. त्यानंतर मात्र मूल बुद्धीने एखादी कृती करतो. मुलांमध्ये ईश्वराकडून आलेली ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता असते.
 
घर हे समृद्ध‍ि-दर्शकतेचे प्रतीक असते. घरासमोर किल्ल्याची निर्मिती केल्यामुळे घराचे रक्षण करण्यासाठी, म्हणजेच घरात असलेल्या धनसमृद्धीला टिकवून ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या क्षात्रतेजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या, किल्ल्याचे नेतृत्व असलेल्या धर्माचरणी राजाशी अभेदता निर्माण करते.
 
महाराष्ट्रात अनेक दशकांपासून मातीचे किल्ले बनवणे लोकप्रिय आहेत.मुलांना किल्ल्यांच्या इतिहासाची माहिती शाळेत पूर्ण मिळत नाही पण या किल्ला बनवण्याच्या प्रक्रियेतून त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीबद्दल आणि वारशाबद्दल खूप काही शिकायला मिळते. किल्ला बनवण्याच्या प्रक्रियेशी संबंधित अनेक कथा आणि परंपरा आहेत, ज्या मुलं लक्षपूर्वक ऐकतात. किल्ल्याच्या बांधकामासाठी आवश्यक माती आणि पाण्याचे गुणोत्तर, मिश्रणाची सुसंगतता, इतर सहाय्यक सामग्रीची आवश्यकता या दृष्टीनेही बरीच तयारी आवश्यक आहे. एवढेच नाही तर तपशील आणि सौंदर्यशास्त्राच्या भावना लक्षात घेणं आवश्यक आहे. या गोष्टी मुलांना घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
 
किल्ला बांधणे हे छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली देणे असे मानले जाते. मुघलांशी युद्धात त्यांनी अनेक किल्ले काबीज केले. इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण, अनेक मोहिमी, आनंदाचे दुःखाचे क्षण, पराभव- विजय, पराक्रम, आक्रमण यांचे हे किल्ले साक्षीदार आहे.या च्या इतिहासामुळे मुलांमध्ये सकारात्मकतेचं बीज रोवले जाते.  
 
आता जरी फ्लॅट संस्कृती असली तरी ही आजही मुलं आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात किंवा गॅलरीत किल्ला बनवतात. गावात आज ही माती, शेण, दगड, पोतं, चिकट धान्याचं पीठ एकत्र करून किल्ला बनवतात. किल्ल्याची बांधणी झाल्यावर त्यावर डागडुजी केली जाते. गेरू चुनाचा वापर करून धान्यांनी नक्षीकाम केले जाते. किल्ल्यावर ध्वज लावतात. झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. किल्यावर रोषणाई केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या मुर्त्या ठेवल्या जातात.  किल्ला पूर्णपणे बांधल्यानंतर, मुले मातीपासून बनवलेल्या योद्धांच्या पुतळ्यांनी सजवतात. त्यांना मावळे म्हणतात. दिवाळीत हे मावळे बाजारात सहज उपलब्ध होतात.मुले त्यांच्या किल्ल्यांना जंगलाचे स्वरूप देण्यासाठी गवत देखील वाढवतात.
 
अनेक मुलं एकत्र येऊन केला बांधतात. किल्ला तयार केल्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. या शिवाय मुलांना इतिहासाची माहिती समजते. त्यांना किल्ल्यातील ऐतिहासिक आणि भौगोलिक बांधकामाची ओळख होते.  किल्ला बनवण्यासाठी दिवाळीच्या काही दिवसांपूर्वी पासून किल्ला बनवण्याच्या तयारीला लागतात. सपाटीवरील किल्ला, पाण्यातला किल्ला, डोंगराचा किल्ला चे प्रतिरूप तयार केले जाते. किल्ल्यावर इतिहासाची माहिती देणारे फलक लावतात. जेणे करून इतिहासाची माहिती प्रेक्षकांना मिळू शकेल. नंतर अनेक ठिकाणी किल्ल्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. आणि उत्कृष्ट किल्ला बनवणाऱ्यांना बक्षिसे दिले जातात. किल्ला बांधणीच्या माध्यमातून किल्ल्यांच्या प्रति आदर निर्माण होतोच तसेच इतिहासाची उजळणी देखील होते. 
 
 
Edited By - Priya Dixit