निर्माता : रमेश एस. तौरानी दिग्दर्शक : केदार शिंदे संगीत : प्रीतम कलाकार : तब्बू, शरमन जोशी, वत्सल सेठ, युविका चौधरी, अयूब खान
'तो बात पक्की'च्या निमित्ताने केदार शिंदे हिंदीत पदार्पण करतो आहे. याशिवाय तब्बू बर्याच दिवसांनी रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. तीही कॉमेडी भूमिकेत.
राजेश्वरी (तब्बू) अतिशय फटकळ बाई आहे. मनात आलेल ते ती बोलून टाकते. लोकांना वाईट वाटेल की नाही याचा ती विचारही करत नाही. राजेश्वरीचा नवरा सुरींदर (अयूब खान) सरळमार्गी आहे. त्यांची दोन मुले आईच्या हुकुमशाहीखाली वाढत असतात.
राजेश्वरीला निशा (युविका) नावाची बहिण आहे. तिच्यासाठी राजेश्वरी वरसंशोधन करते आहे. पण तिच्या काही अटी आहेत. मुलगा सक्सेना हवा. त्याच्याकडे चांगली नोकरी हवी. शिवाय हुंडाविरोधी हवा.
इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षाला असलेला राहूल सक्सेना (शर्मन जोशी) त्यांच्या घरी भाडेकरू म्हणून रहायला येतो. राजेश्वरीला राहूल आवडतो. शिवाय त्याला लवकरच नोकरीही मिळणार असते. त्यामुळे राजेश्वरी निशा व राहूलला जवळ आणण्याचा प्रयत्न करते. त्यात तिला यशही मिळते. निशा व राहूल परस्परांच्या प्रेमात पडतात.
राजेश्वरीचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती त्यांच्या लग्नाची घोषणा करून टाकते. तयारी सुरू होते. त्याच काळात राजेश्वरीच्या घरी युवराज सक्सेना (वत्सल सेठ) हा तरूण येतो.
युवराज अविवाहित आहे. देखणा आहे. बड्या कंपनीत ज्युनियर मॅनेजर आहे. कंपनीने त्याला कारही दिली आहे. लवकरच घरही मिळणार असते. शिवाय तो सक्सेना आहे. राजेश्वरीला राहूलपेक्षा युवराज जास्त चांगला वाटू लागतो.
त्यानंतर मग राजेश्वरी राहूलला निशापासून दूर करण्याचा नि युवराजला जवळ आणण्याचा प्रयत्न करू लागते. त्यातून एकेक गमतीजमती घडत जातात. राहूलही तिच्या चालीला प्रतिचाल करून उत्तर देतो.
या सगळ्यांत विजय कोणाचा होतो नि निशा अखेर कोणाची बायको होते हे पहायला मजा येईल.