सोमवार, 2 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा
Written By वेबदुनिया|

भुलभुलैया

भूलभुलैया
निर्माता : भूषण कुमार, किशन कुमार
दिग्दर्शक : प्रियदर्शन
गीतकार : समीर
संगीतकार : प्रीतम
कलाकार : अक्षय कुमार, विद्या बालन, शायनी आहूजा, अमीषा पटेल, राजपाल यादव, असरानी

IFMIFM
दिग्दर्शक प्रियदर्शन व अक्षयकुमारची जोडी एकत्र आल्यानंतर प्रेक्षकांना विनोदी चित्रपटाची अपेक्षा असते मात्र भूलभुलैया निव्वळ विनोदी चित्रपट नाही. मूळ 'मणिचित्रा थाजू' ह्या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवितांना ‍हास्यासोबतच रहस्य, उत्कंठा व भीतीच्या छटांचीही त्याने सरमिसळ केली आहे. चित्रपटाच्या सुरूवातीच्या दृश्यातच चतुर्वेदी कुटुंबीयांची हवेली दाखविण्यात आली आहे.

हवेलीत भूताचा वावर असल्याचा पगडा गावातील लोकांच्या मनावर असतो. हवेलीत कुणाचेही वास्तव्य नसून पूजाविधी आटोपून ती बंद करण्यात आली आहे. अमेरिकेतून कुटुंबीयांच्या भेटीसाठी आपली पत्नी अवनीसह (विद्या बालन) गावात आलेला सिद्धार्थ (शायनी आहूजा) हवेलीत राहण्याचा हट्ट धरतो. सिद्धार्थ आधुनिक विचाराचा असून भूत-प्रेत या अंधश्रद्धांवर त्याचा विश्वास नाही.

याउलट त्याच्या कुटुंबीयांचा कर्मकांडांवर दृढ विश्वास आहे. हवेलीतील भुताच्या प्रश्नाचा छडा लावण्यासाठी तो आपल्या डॉक्टर मित्राची आदित्य (अक्षय कुमार) मदत घेण्याचे निश्चित करतो. आदित्य ह्या प्रकरणाचा कसा छडा लावतो ह्याचे नाट्य चित्रपटात मांडण्यात आले आहे. ‍चित्रपट कथानकाच्या बाबतीत वेगळेपणा जोपासत असला तरी बहुतेक घटनाक्रम विश्वास ठेवण्यापलीकडचे वाटतात.

मुख्य कथानक शेवटच्या अर्ध्या तासात उलगडते मात्
PRPR
तोपर्यंत प्रेक्षकांच्या सहनशीलतेची परिक्षा पाहिली जाते. दिग्दर्शक मध्यांतरापर्यंत रहस्यातच गुंतल्याने कथानक पुढे सरकायचे नाव घेत नाही. पहिल्या भागात शायनी आहूजा, मनोज जोशी व परेश रावल यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

मध्यांतराच्या काही मिनिटे अगोदर अक्षय कुमारची एंट्री होते. त्याच्या प्रवेशानंतर कथानकाला वेग येण्याची अपेक्षा पूर्णपणे फोल ठरते. त्याच्या एंट्रीनंतर इतर पात्रांना पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले आहे. मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या अक्षयच्या अंदाजानुसार ह्या घटनांमागे कुणा तरी मनोरूग्णाचा हात असावा. मात्र कामापेक्षा हुल्लडबाजी करण्यातच तो जास्त वेळ घालवतो.

रहस्यमय घटमांमागील व्यक्तीपर्यंत अक्षय सहजपणे पोहचल्याने सगळी मजा तिथेच संपते. दिग्दर्शक म्हणून प्रियदर्शनला कलाकारांकडून उत्तम अभिनय करून घेण्यात यश आले असले तरी प्रेक्षकांना शेवटपर्यंत बांधून ठेवण्याची किमया तो साधू शकलेला नाही. चित्रपटाची लांबीही अनावश्यक वाटते. 'हरे कृष्णा हरे राम' सारख्या हिट गाण्यालाही वाया घालण्यात आले आहे. हे गाणे चित्रपट संपल्यानंतर येणाऱ्या श्रेयनामावलीच्या वेळी वाजते.

अक्षयने विनोदी भूमिकेत चांगलाच जम बसवला आहे. चित्रपटातही तो आल्यानंतर मजा येते. विद्या बालनने आपली भूमिक चांगली केली आहे. पण शायनी आहूजाचा अभिनय पचनी पडत नाही. अमिषाच्या भूमिकेत काही दम नसल्याने तिला अभिनयाचा त्रास फारसा होऊ न देण्याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. परेश रावल नेहमीप्रमाणे प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी ठरला आहे.

IFMIFM
मनोज जोशी, राजपाल यादव, असरानीनेही आपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. प्रीतमचे संगीत झकास आहे. हरे कृष्णा हरे राम ह्या गाण्याव्यतिरिक्त जिंदगी का सफरही श्रवणीय झाले आहे. तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट भक्कम आहे. संपूर्ण चित्रपट एका हवेलीत चित्रीत करण्यात आला असून थिरूने आपले कौशल्य पणास लावले आहे.