गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Updated : बुधवार, 27 ऑगस्ट 2025 (07:54 IST)

गणपतीच्या पूजेत महत्त्वाची २१ पत्री

गणपतीच्या पूजेत महत्त्वाची २१ पत्री
गणपतीच्या पूजेत २१ पत्रींचा उपयोग विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. या पत्री गणपतीला अर्पण केल्या जातात, कारण प्रत्येक पत्री विशिष्ट देवता किंवा ऊर्जेशी संबंधित आहे आणि ती गणपतीच्या पूजेत शुभता, समृद्धी आणि विघ्ननाशक शक्ती प्रदान करते. या पत्रींची निवड आयुर्वेदिक, धार्मिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाची मानली जाते. खाली २१ पत्रींची यादी आणि त्यांचे महत्त्व दिले आहे:
 
भारतीय संस्कृतित पूजेत वाहण्यात येणारी फुले, पाने यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध देवतेनुसार पूजा साहित्यामध्ये बदल बघावयास मिळतो. काही दिवसांत गणेशाचे आगमन होणार आहे. गणपतीच्या पूजेत २१ पत्रीचा समावेश असतो. या पत्रींचे औषधी गुण आपण जाणून घेऊ यात.
 
पिपंळ - याला 'बोधीवृक्ष' म्हणतात. गौतम बुध्दांना याच झाडाखाली आत्मज्ञान प्राप्त झाले होत. हवा शुध्दकरण्यासाठी हे एकच झाड एअरकुलर सिस्टीमच्या पाचपट अधिक काम करते. याच्या पानांत औषधी गुणधर्म असतात म्हणून आदिवासी भागात या पानांवर मुलांना जेऊ घातले जाते. पिपंळाची लाख (राख) खडीसाखरेबरोबर दिल्यास चांगली झोप लागते. 
 
जाई - या वनस्पतीला जास्मीन देखील म्हणतात. ही वनस्पती शहरात मोठया प्रमाणात दिसते. तोंड आल्यावर जाईची पाने खातात, तसेच जुन्या जखमांवर जाईचा पाला लावला जातो. ही वेल सुगंधी फुलांची आहे.
 
अर्जुन - हाडे जोडणारी वनस्पती म्हणून आदिवासी पट्टयात हिला ओळखतात. या वृक्षाचा उल्लेख रामायणात देखील आढळतो. हृदयरोगावर ही वनस्पती उपयोगी ठरते. या वनस्पतीत कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.
 
रूई - रुई या वनस्पतीला 'मांदार' म्हणूनही ओळखतात. ओसाड जागेत ही वनस्पती मोठया प्रमाणात दिसते. हिला पांढर्‍या, जांभळया रंगाची फुले येतात. हत्तीरोगावर हे फार उत्तम औषध आहे. तसेच कुष्ठरोगावर देखील त्याचे औषध प्रभावी ठरते. पांढरी रूई गणेशाला अधिक प्रिय असते.
 
मारवा - ही सुवासिक वनस्पती असून विविध प्रकारच्या जखमा, भाजणे, किंवा कोणत्याही कारणांमुळे त्वचेवर आलेल्या डागांसाठी ही वनस्पती उपयुक्त ठरते. नवीन संशोधनात तर मारव्यापासून कर्करोगावर औषध तयार करण्यास यश आले आहे. ही वनस्पती घरात कुंडीतदेखील लावता येते.
 
कण्हेर - कण्हेरीची पाने व मुळाचा साठा औषधी आहे. परस बागेतही हमखास दिसणारी वनस्पती एक विषारी झुडूप आहे. याच्या फुलांना सुगंध असतो. वात विकारावरील महाविषारी तेलात हिचा वापर केला जातो.
 
देवदार - हा महाकाय वृक्ष पश्चिम घाट, हिमालयात आढळतो. या वृक्षाचे लाकूड अतिशय मजबूत असते. कफ, पडसे, संधिवात यासाठी याचा रस फायदेशीर ठरतो. याची झाडे महाराष्ट्रात नाशिकजवळ पेठ, हरसूल भागात देखील दिसतात.
 
डोरली - या रोपाला 'काटे रिंगणी' म्हणूनही ओळखतात. या वनस्पतीच्या पानवर देखील काटे असतात. त्वचारोग, पोटातील विकार, मूत्ररोगांवर हे झुडूप फायदेशीर ठरते. आदिवासी भागात हे झुडूप मोठ्या प्रमाणात आढळते.
 
डाळिंब - आपल्याकडे आरक्ता आणि गणेश अशा दोन जाती मोठयाप्रमाणात बघावयास मिळतात. देखणी फुले, काहीसे काटेरी झुडूप आहे. याचा उपयोग जंतावर गुणकारी आहे. काविळीसाठीही उपयोग केला जातो.
 
आघाडा - ऋषीपंचमीच्या दिवशी महिला मुखमार्जनासाठी त्याचा वापर करतात. आघाडा मुखरोग व दंतरोगावर उत्तम औषध आहे. ही वनस्पती पडिक जागेत माळरानांवर बघावयास मिळते.
 
विष्णुकांता - या वनस्पतीला आपल्याकडे 'शंखपुष्पी' म्हणतात. बुध्दीवर्धक म्हणून ही वनस्पती विद्यार्थी वर्गात लोकप्रिय आहेत. ब्रेन टॉनिक म्हणून अत्यंत उपयोगी आहे. निळसर फुले येणारी ही वनस्पती जमिनीलगत उगविणारी आहे. या वनस्पतीचा उपयोग मानसिक विकारावर औषध म्हणून केला जातो. नदीच्या बाजूला, डोंगर-टेकडया आदी ठिकाणी ही आपण बघू शकतो.
 
शमी - शमीला सुप्त 'अग्नीदेवता' असेही म्हणतात. त्यामुळे यज्ञाच्या ठिकाणी शमीची रवी ठेवतात. हा वृक्ष कोरडया हवामानात वाढणारा आहे. त्वचारोग, दमा, मूत्रपिंड या आजारांवर शमी प्रभावी ठरते.
 
दुर्वा - ही एक गवताच्या जातीची वनस्पती आहे. पांढरी (श्वेत) आणि निळा (नील) या दोन जाती आहेत. पांढ-या दुर्वा गणेशाला प्रिय असते. आपल्याकडे तिला 'हरळ' म्हणतात. नाकातून रक्त येणे, ताप, अंगातील दाह कमी करण्यासाठी दूर्वांचा रस अमृतासमान असतो. दूर्वा रस्त्याच्या बाजूला, बागेतही मिळतात.
 
तुळस - ही वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन देणारी आहे. डासांना पळवून लावणारी तुळस जवळपास प्रत्येक घरात बघावयास मिळते. तुळशीत राम, कृष्ण असे दोन प्रकार असले तरी आणखी तीन चार इतर प्रकारही आहेत. कफ, दम, सर्दी, कीटक दंश तसेच कॅन्सर सारख्या रोगांवर तुळशीचा रस औषध उपयोगी पडतो.
 
धोतरा - धोतर्‍याचा काळा, पांढरा, व राजधोतरा अशा तीन जाती आहेत. या वनस्पतीपासून अफ्रोपिन नावाचे औषध काढतात. वेदनाशक म्हणून त्याचा उपयोग केला जातो. ही वनस्पती पडिक जागेत उगविणारी विषारी वनस्पती आहे. काटेरी पांढर्‍या लांब नरसळ्यासारखे फूल दमा, कफ, संधिवात आदी रोगांवर उपयुक्त ठरते. या वनस्पतींची रोपे शहरात रस्त्याच्या कडेला हमखास दिसतात.
 
बेलपत्र - शंकराचे बेलपत्र सर्वांना परिचित आहे. या वनस्पतीचा उपयोग पोटातील जंतावर गुणकारी आहे. अतिसार, आव, धडधड, उष्णता आदींसाठी हिचा उपयोग होतो.
 
माका - पावसाळयात आढळणारी ही वनस्पती डोंगर - टेकडयांवर नजर लावून तिचा शोध घ्यावा लागतो. माका रसायन आहे. रसायन म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग होऊ न देणारे औषध. मूत्रपिंडाचा आजार, कावीळ, त्वचारोग, विंचूदंश आदी रोगांवर माक्याचे औषध प्रभावी ठरते.
 
मधुमालती - मधुमालती ही वेल तशी शहरात बंगल्यांमध्‍ये सहज बघावयास मिळते. ही एक काष्ट वेल आहे. गुलाबी, पांढर्‍या, पिवळया रंगाची फुले व सदाहरित पाने हे त्याचे वैशिष्टय. फुफ्फुसाचे विकार, त्वचारोग, सांधेदुखी, पोटातील कृमी कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो.
 
बोर - बोराच्या बियांचे चुर्ण चेहर्‍यांवर लावल्यास पुटकुळया जातात. मध्यम आकाराचा हा काटेरी वृक्ष डोळे जळणे, तापावरील दाह यासाठी उपयुक्त ठरतो.
 
हादगा - हादग्याला आपण 'अगस्ती' म्हणूनही ओळखतो. याच्या फुलांची भ्‍ाजी छान लागतात. या फुलात अनेक जीवनसत्वांचा खजिना आहे. हा वृक्ष मध्यम आकाराचा आहे.
 
केवडा - ही वनस्पती समुद्र किनार्‍यावर मोठया प्रमाणात आढळते. ही वनस्पती थायरॉईडच्या दोषावर गुणकारी ठरते.
 
या पत्रींचे महत्त्व:
प्रत्येक पत्री विशिष्ट देवतेशी निगडित आहे आणि गणपतीच्या पूजेत ती अर्पण केल्याने त्या देवतेचा आशीर्वाद मिळतो. उदाहरणार्थ, बिल्वपत्री शिवाशी संबंधित आहे, तर तुळस विष्णूशी.
 
या पत्रींमध्ये औषधी गुणधर्म असतात, जसे की अघाडा रोगनाशक आहे, तर तुळस रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. या पत्री स्थानिक वनस्पती असल्याने पर्यावरणाशी सुसंगत असतात आणि त्यांचा उपयोग पर्यावरण संतुलन राखण्यासही मदत होते. प्रत्येक पत्री जीवनातील विशिष्ट गुण किंवा शक्ती दर्शवते, जसे की पिंपळ ज्ञानाचे प्रतीक आहे, तर शमी विजयाचे. या पत्री अर्पण केल्याने मन, शरीर आणि वातावरण शुद्ध होते, ज्यामुळे पूजेचे फळ अधिक प्रभावी होते.
 
या पत्री गणपतीला अर्पण करताना प्रत्येक पत्रीचे नाव घेऊन मंत्र म्हणतात:ॐ [पत्रीचे नाव] नमः (उदा., ॐ दूर्वायै नमः).
या पत्री स्वच्छ धुऊन, गणपतीच्या मूर्तीसमोर किंवा पायाजवळ अर्पण केल्या जातात. काही ठिकाणी या पत्रींची माळ बनवून गणपतीला अर्पण केली जाते.
 
टीप:जर एखादी पत्री उपलब्ध नसेल, तर दूर्वा सर्वात महत्त्वाची मानली जाते, कारण ती गणपतीला विशेष प्रिय आहे.