शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (13:27 IST)

Shani Mahatmya शनी महात्म्य

अथ शनिमाहात्म्य प्रारंभ
 
श्रीगणेशाय नमः ॥ ॐ नमोजी गणनायका ॥ एकदंता वरदायका ॥ स्वरुपसुंदरा विनायका ॥ करी कृपा मजवरी ॥१॥
आता नमूं ब्रह्मकुमारी ॥ हंसारुढ वागीश्वरी ॥ वीणा शोभे दक्षिण करीं ॥ विजयमूर्ति सर्वदा ॥२॥
नमन माझें गुरुवार्या ॥ सुखमूर्ति करुणालया ॥ नमूं संतश्रोतयांच्या पायां ॥ अभेद भेदा करुनी ॥३॥
आता नमूं श्रीपांडुरंगा ॥ यावें तुवां कथेचिया प्रसंगा ॥ निरसूनि माझिया भवसंगा ॥ करी कृपा मजवरी ॥४॥
गुजराथ भाषेची कथा ॥ नवग्रहांची तत्त्वतां ॥ ही ऐकता एकचिता ॥ संकटा व्यथा न बाधती ॥५॥
आता उज्जनीनाम नगरीं ॥ राजा विक्रम राज्य करी ॥ तेथील चरित्राची परी ॥ ऐका चित्त देऊनियां ॥६॥
कोणी एके दिवशीं प्रातः काळी ॥ बैसली होती सभामंडळी ॥ तेथे महापंडित त्या काळीं ॥ लहान थोर बैसले ॥७॥
ऐसी सभा बैसली घनदाट ॥ तेथें चर्चा निघाली सुभट ॥ म्हणती नवग्रहांत कोण श्रेष्ठ ॥ सांगावे नीट निवडोनी ॥८॥
कोण्या ग्रहाची कैसी स्थिती ॥ कैसी पूजा कैसी मती ॥ कोण रूप कैसी गती । ऐसें यथार्थ सांगावे ॥९॥
ऐसें ऐकतांचि उत्तर ॥ पंडित सरसावले समोर ॥ काढोनि पुस्तकांचा संभार ॥ बोलती ते यथामतीनें ॥१०॥
 
प्रथम एक पंडित बोलिला ॥ रविग्रह तो असे भला । जो लागे त्याच्या उपासनेला ॥ त्यासी ग्रहपीडा न बाधे ॥११॥
रवि तो सूर्यनारायण ॥ जे नर झाले तप्तरायण ॥ त्यांची विघ्नें होती निरसन ॥ महासामर्थ्य रवीचे ॥१२॥
आधि व्याधि दरिद्र ॥ स्मरणमात्रेंचि होती दूर ॥ मग उपासना करी जो नर ॥ चिंतले अर्थ सर्व पुरती ॥१३॥
रवि तो मुख्य दैवत ॥ त्यावीण सर्वही जाणा व्यर्थ ॥ नवग्रह आज्ञा पाळीत ॥ ऐसा श्रेष्ठ ग्रह हा ॥१४॥
ऐकता रवीची वार्ता ॥ आणि इतर ग्रहांची कथा ॥ तेणे निवारे सर्व व्यथा ॥ ऐसे नवग्रहही समर्थ ॥१५॥
परी रवि असे महाबळी ॥ सर्वांमाजी अर्तुबळी ॥ प्रत्यक्ष दिसतो नेत्रकमळीं ॥ तो हा सूर्यनारायण ॥१६॥
तंव दुसरा पंडित बोलत ॥ सोमासी असे बळ अद्‍भुत ॥ तो माळी असे म्हणवीत ॥ वनस्पती पोषीतसे ॥१७॥
जयांचे आराध्य दैवत ॥ शिव सांब कैलासनाथ ॥ त्याच्या भाळी हा विलसत ॥ म्हणोनि श्रेष्ठ जाणावा ॥१८॥
चंद्र वर्षि अमृतास ॥ तृप्त करी सर्व देवांस ॥ निशिराज महारुपस ॥ षोडश कळा जयासी ॥१९॥
तो न गांजी कोणासी ॥ अति सौख्यदाता सर्वांसी ॥ सदासर्वदा निर्मळ मानसी ॥ धन्य जयाचें पूजन ॥२०॥
 
मग तिसरा पंडित बोलत ॥ ऐक राया सुनिश्चित ॥ मंगळ तो महासमर्थ ॥ कथा ऐक तयाची ॥२१॥
मंगळग्रह हा महाक्रूर ॥ जैसी कां ते खड्‍गाची धार । तयाचा न कळे पार ॥ सर्व ग्रहांमाजी वरिष्ठ हा ॥२२॥
मंगळग्रह हा सोनार ॥ क्रूरता जयाची अति थोर ॥ पोर तो पूजकासी कृपाकर ॥ मंगल करी सर्वदा ॥२३॥
गर्व धरुनि पूजा न करिती ॥ मग तो खवळे उग्रमूर्ती ॥ विलया जाय संतती संपत्ती ॥ शेवटी नाश करी जीवित्वाचा ॥२४॥
तोचि पूजकासी सदा प्रसन्न ॥ सर्व अर्थ करी पावन ॥ सर्व दुःख निरसुन ॥ अंतरबाह्य संरक्षी ॥२५॥
तंव बोले चौथा पंडीता ॥ बुध असे महाबळवंत ॥ बुधाचा प्रताप अद्‍भूत ॥ सर्व ग्रहांमाजी ॥२६॥
बुध जातीचा असे वाणी ॥ नवग्रहांत शिरोमणी ॥ विघ्ने नासती तयाच्या पूजनी ॥ सर्वानंद प्राप्त करी ॥२७॥
बुध ज्यावरी कृपा करी ॥ लक्ष्मीवंत त्यासी करी ॥ ऐसा तो महापरोपकारी ॥ बुधग्रह जाणिजे ॥२८॥
बुधग्रह आहे ज्यास नीट ॥ त्यास सर्व मार्ग सुचती सुभट ॥ कोणत्या कार्यासही तूट ॥ तो न करी कल्पांती ॥२९॥
बुधाची बुद्धी भारी ॥ कोणासी निष्ठुरता तो न करी ॥ संसारचिंता हरी ॥ प्राणिमात्राची ॥३०॥
 
मग बोले पाचवा पंडित ॥ गुरुचे सामर्थ्य असे अद्‍भूत ॥ गुरु ते श्रेष्ठ सर्वात ॥ इंद्रादिदेवां समस्तां ॥३१॥
गुरुज्ञानाचा न कळे पार ॥ भाविकांसी तो करुणाकार ॥ कर्माकर्मांचा करी चुर ॥ भवभयव्यथेसी ॥३२॥
दुःख आणि दरिद्र्य रोग ॥ स्मरणमात्रें होती भंग ॥ नवग्रहांत महायोग्य ॥ ऐसा जाणिजे ॥३३॥
गुरु जातिचा असे ब्राह्मण ॥ सर्वांत श्रेष्ठ असे वर्ण ॥ सर्व देव करिती मान्य ॥ गुरुवचनासी ॥३४॥
गुरु असे ज्ञानाचा पुरा ॥ तुयाच्या साम्यासी नसे दुसरा ॥ त्यापुढे नुरेचि थारा ॥ कल्पनेचा कदाही ॥३५॥
म्हणोने करितां गुरुसेवा ॥ मग ग्रहांचा कोण केवा ॥ गुरु सर्वभार्वे भजावा । तेणे संतोष सर्व ग्रहांसी ॥३६॥
शिव करी गुरुपुजनासी । तेथें पाड काय इतरांसी । ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी ॥ आगमागम ॥३७॥
तंव सहावा पंडित बोलिला ॥ शुक्रग्रह असे बहु भला ॥ जेणे राक्षसां उपकार केला ॥ संजीवनीमंत्रेकरोनी ॥३८॥
शुक्र गुरु तो दैत्यांचा ॥ त्रिभुवनीं धाक वाहती जयाचा ॥ पार न कळे सामर्थ्याचा ॥ म्हणोनि श्रेष्ठ तो ॥३९॥
शुक्राची शक्ती आहे फार ॥ तो करी कर्माकर्माचा चूर ॥ विघ्ने पळती दूरच्या दूर ॥ शुक्रांचे नाम घेतां ॥४०॥
 
शुक्रपूजनी जे तत्पर ॥ त्याच्या शौर्यासी नाही पारावार ॥ जो दिव्यदेही निरंतर ॥ एकाक्ष तो ॥४१॥
आधि व्याधि दुःख दरिद्र ॥ स्मरणमात्रेंचि होती दूर ॥ सर्वभीष्ट परिकर ॥ प्राप्त करी पूजका ॥४२॥
नवग्रहांत शिरोमणी ॥ ज्याचा महिमा वर्णिजे पुराणी ॥ मान्यता श्रेष्ठ सर्वांहुनी ॥ शुक्राची असे जाण पां ॥४३॥
ऐसे हे सहा ग्रह ऐकोनि राजा ॥ तर्जनी मस्तक डोलवी वोजा ॥ म्हणे उत्तम कथिले काजा ॥ अखंडीत यांते स्मरावे ॥४४॥
आणिक ग्रह राहिले कोण ॥ सांगा पंडीत हो निवडुन ॥ कैसी त्यांची नामें खूण ॥ त्या मूर्तीसी बोलिजे ॥४५॥
मग संकेत बोले पंडीत ॥ राहु आणि दुसरा केतु ॥ हे उभयंता अति अद्‍भूत ॥ दैत्यकूळीचें असती ॥४६॥
मातंग जातीचे दोन्ही ॥ दुष्ट क्रिया म्हणवोनी ॥ त्यांच्या दर्शनें चंद्रसूर्य गगनीं ॥ चळचळां कांपती ॥४७॥
राहु पीडी चंद्रासी । केतु तो सूर्यासी ॥ ग्रहण बोलिजे तयासी ॥ प्रत्यक्ष द्दष्टीसी दिसतसे ॥४८॥
प्रणिमात्र सर्व जन ॥ त्यांसी न सांडिती पीडेवीण ॥ परी केलिया पूजन स्मरण ॥ किचिंत पीडा करितासी ॥४९॥
राहु महापीडक अनिवार माया ॥ तद्रुपचि केतु जाण राया ॥ उभयतांची एक चर्या ॥ पूजनस्मरणें संतोषती ॥५०॥
 
सर्व ग्रहांपरीस अति क्रूर ॥ जनांसी पीडा करती फार ॥ म्हणोनि पूजन स्मरण निरंतर ॥ राहुकेतूचे करावे ॥५१॥
तवं नववा पंडित बोलत ॥ शनिग्रह श्रेष्ठ अवघ्यांत ॥ बलाढ्य होय अद्‍भुत ॥ नकळे कळा तयाची ॥५२॥
तो ज्यावरी करी कृपा ॥ त्यासी सर्व मार्ग असे सोपा ॥ ग्रहदिक्पाळावर छापा ॥ तया शनिग्रहाचा ॥५३॥
ज्यावरी तो कोपसी चढे ॥ तयावरी नाना विघ्नें ये रोकडे ॥ तयाचा संसार बिघडे ॥ न राहे कल्पांती ॥५४॥
शनिदेव महाकोपी ॥ ज्याचा पराजय नोहे युद्धीं ॥ देवदानवां त्रिशुद्धी ॥ दुःखदाता शनिदेव ॥५५॥
जो का भाविक सज्ञान नर ॥ या ग्रंथाचा करी आदर ॥ पूजन स्मरण निरंतर ॥ त्यावर कृपा करी शनिदेव ॥५६॥
शनैश्वराची मूर्ति काळी ॥ तो जातीचा होय तेली ॥ चरण पंगु सुरत चांगली ॥ पूजा करी काळभैरवाची ॥५७॥
त्याची द्दष्टी पडे जयावर ॥ करी तयाचा चकनाचूर ॥ अथवा कृपा करी जयावर ॥ तयासी सर्व आनंदच प्राप्त होय ॥५८॥
द्दष्टीचा ऐका चमत्कार ॥ जन्मला जेव्हा शनैश्चर ॥ तेव्हा द्दष्टी पडली पित्यावर ॥ तेणें कुष्ठ भरला सर्वांगी ॥५९॥
पित्याच्या रथीं होता जो सारथी ॥ तो पांगुळ झाला निश्चिती ॥ अश्वचिता नेत्रांप्रती ॥ अंधत्व आले तत्क्षणी ॥६०॥
 
तेव्हा त्यांनी उपाय केले फार ॥ तरी गूण न येचि अणुमात्र ॥ जव द्दष्टी फिरवी शनैश्चर ॥ तंव निघेही आरोग्य हाले ॥६१॥
ऐसे ऐकतां राजा विक्रम ॥ हांसुनि बोले सप्रेम ॥ म्हणजे पुत्र जन्मोनि काय काम ॥ ऐसा अपवित्र जो ॥ ६२॥
तो पुत्र नव्हे केवळ वैरी ॥ जो उपजतांच ऐसें करी ॥ पुढे तो काय न करी ॥ सांगा पंडीत हो ॥ ६३॥
ऐसें बोलिला हासोन ॥ करी टाळी वाजवी गर्जोन ॥ सभेसी विनोदवचन ॥ म्हणे हा पुत्र कैसा हो ॥६४॥
ऐसें बोलतां ते अवसरी ॥ कैसी वर्तली नवलपरी ॥ ती ऐकावी आतां चतुरीं ॥ चित्त देऊनियां ॥६५॥
त्या समयी शनिदेव विमानीं ॥ जात होते बैसोनि ॥ रायाचें वाक्य ऐकतां तत्क्षणी ॥ विमान खाली उतरलें ॥६६॥
अकस्मात येऊनियां सभेत ॥ बैसले तेव्हां विमानासहित ॥ तवं पहाते झाले सभापंडित ॥ म्हणती आले शनिदेव ॥६७॥
मग राव उठे झडकरोनी ॥ जाऊनि नमन करी चरणी ॥ तंव टाकिला झिडकरोनी ॥ शनिदेवांने ॥६८॥
म्हणे तू राजा ऐसा मस्त ॥ टवाळी करीसी अद्‍भूत ॥ याचा चमत्कार क्षणांत ॥ दावीन पाहें आतांचि ॥६९॥
तूं फार करितोसी टवाळी ॥ नसतीच चढवली कळी ॥ तरी कन्याराशीस मुळी ॥ तुजला ग्रह मी आलो ॥७०॥
 
आतां पाहें माझा चमत्कार ॥ तूं नको करुं गर्व फार ॥ ऐसें वदोनि अति सत्वर ॥ विमानरुढ पैं झाला ॥७१॥
तंव तो राव लागे चरणासी ॥ म्हणे कृपा करावी दीनासी ॥ अन्याय घाली पोटासी ॥ कृपाळुवा शनिदेवा ॥७२॥
तरी तो न मानीच शनिदेव ॥ म्हणे मी तुज दाखवीन अनुभव ॥ तेव्हा मनी खिन्न जाहला राव ॥ चिंता मानसीं फार करी ॥७३॥
मग म्हणतसे पंडितांला ॥ आम्ही महाग्रह उगाचि छळिला । तो आतां कष्टवील आम्हांला ॥ तरी कैसे आतां करावे ॥७४॥
जें जें पुढें होणार ॥ म्हणोनि बुद्धि सुचे तदनुसार ॥ तरी जे असेल लिखिताक्षर ॥ तैसे आतां होईल ॥७५॥
राव दिलगीर जाहला मानसीं ॥ वसर्जन करी सभेसी ॥ जाता जाहला मंदीरासी ॥ कांही अंतरी सुचेना ॥७६॥
करुनिया संध्यास्नान ॥ मग करितसे भोजन ॥ तदनंतर करित झाला शयन ॥ नावेक पलंगावरी ॥७७॥
ऐसें करितां एक मास ॥ जाहला राया विक्रमास ॥ मग काय वर्तलें त्या कथेस ॥ तेंचि आता ऐकिजे ॥७८॥
राया विक्रमासी आला शनी ॥ बारावा अति क्रुर स्थानीं ॥ जेणे त्रासिले बहुत प्राणी ॥ अभाविकां पीडीतसे ॥७९॥
तेव्हा पंडीत बोलती वाचे ॥ राया पूजन करी शनिग्रहाचें ॥ साडेसात वर्ष नेमाचे ॥ सामर्थ्य आहे जाणिजे ॥८०॥
 
तुम्हीं विनोदें हांसला शनीसी ॥ तरी तो कष्टवील तुम्हांसी ॥ जो कां गांजितो त्रैलोक्यासी ॥ तोचि हा महाग्रह जाणिजे ॥८१॥
चित्त करोनियां एकाग्र ॥ ऐकावा पुजेचा प्रकार ॥ जेणें करोनि शनैश्र्चर ॥ कृपा करील तुम्हांवरी ॥८२॥
प्रथम करोनि औषधी स्नान ॥ मग करावे प्रतिमेचें पूजन ॥ अश्वाचा नाल घेऊन ॥ त्याची प्रतिमा करावी ॥८३॥
शास्त्र विधिपूजा निर्धार ॥ मग तैलअभिषेक कर ॥ मृत्तिकेच्या कुंभावर ॥ त्याची स्थापना करावी ॥८४॥
स्थापना झालिया जाण । पूगीफल ब्राह्माणासी देऊन ॥ तेवीस सहस्त्र जप संपूर्ण ॥ यथासांग करावा ॥८५॥
जपसंख्या जाहलियावरी । चतुर्थाश हवन करी ॥ हवन झालियाउपरी ॥ दानें करावी शनीचीं ॥८६॥
मग जपकर्त्या ब्राह्मणासी ॥ शनैश्र्वरुप मानूनि त्यासी ॥ दक्षिणा देऊनि पूजेसी ॥ प्रसन्नचि करावे ॥८७॥
मग करावें ब्राह्मणभोजन ॥ यथाशक्ति द्यावें दान ॥ ब्राह्मण तृप्त होतां पूर्ण ॥ संतोष पावे शनिदेव ॥८८॥
जेवीं रक्षी बाळकासी माता ॥ तैसें पडिताला ॥ तैसें रक्षी निजभक्त ॥ पंडित म्हणती राया समर्था ॥ गोष्ट एवढी ऐकावी ॥८९॥
राजा म्हणे पंडीताला ॥ शनि न मानीच आम्हांला ॥ तोचि मातापिता वाहिला ॥ रक्षा तोचि पै जाणा ॥९०॥
 
मग बोले विक्रम पंडितासी ॥ तुम्ही जावें आपुल्या गृहासी ॥ जें होणार असेल ते निश्चयेंसी ॥ घडुनि येईल न टळेचि ॥९१॥
ऐसें बोलोनियां उत्तर ॥ काय जाहला चमत्कार ॥ चित्त करोनिया स्थिर ॥ श्रवण करावें सर्वांही ॥९२॥
असे मग कोण एके दिवशी ॥ दोन प्रहरांच्या समयासी ॥ कारवानवेषें उज्जनीसी ॥ घोडे विकावया आला शनिदेव ॥९३॥
रुप पालटोनि आपुलें ॥ वारु विकावया आणलें ॥ तवं तेथं गिर्‍हाईक पातले ॥ रावही आला त्या स्थानी ॥९४॥
तेव्हा किंमत पुसतसे रावो ॥ तयासी म्हणे शनिदेवो ॥ वारु फिरवूनि पाहा हो ॥ मग कळेल मोल तयाचें ॥९५॥
तेव्हा सांरगा वारु राव आणवीत ॥ चाबुकस्वरासी वरी बैसवीत ॥ तेणें घोडा फिरविला चौगनांत ॥ अति उत्तम फिरतसे ॥९६॥
तंव दुसरा घोडा अबलख ॥ त्यांचे मोल रुपये लक्ष एका ॥ तो सोडूनि ताक्ताळीक ॥ आणिला विक्रमपासी ॥९७॥
तंव त्या सौदागरें काय केलें ॥ राया विक्रमासीच बैसविलें ॥ घोडा फिरवितां राव बोले ॥ अति उत्तम फिरतसे ॥९८॥
तंव त्या घोड्यासी कोरडा मारितां ॥ घोडा उडाला गगनपंथा ॥ पवनवेगें वारु जातां ॥ महावनांत ते समयीं ॥९९॥
अधिक कोरडा मारितां ॥ तो तो अधिक जाय पंथा ॥ थोर अवस्था हाये चित्ता । केवीं वर्तले म्हणवोनी ॥१००॥
 
दुरदेशी अतिउजाडी । जेथे घोर वन महाझाडी ॥ तेथें नदीच्या पैलथडी ॥ घोडा जाऊनि उतरला ॥१०१॥
तेथे राव उतरला खाली ॥ तंव नवलपरी वर्तली । वारु नाहीं नदी गुप्त झाली ॥ झाडाझुडांसहित ॥१०२॥
तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी म्हणे ईश्वरी गति न कळे कोणासी ॥ वारु आणि वनासी काय विचार पै जाहला ॥१०३॥
तंव अस्तासी पावला वासरमणी ॥ अंधाकार प्रवर्तला रजनी ॥ पुढे मार्ग न दिसे नयनी ॥ मार्ग न दिसे नयनी ॥ मग तेथेंचि पहुडला ॥१०४॥
चार प्रहार गेलियावरी ॥ उद्यासी आला तमारी ॥ मग तो एक नगराचा मार्ग धरी ॥ राजा विक्रम आपण ॥१०५॥
तंव तेथोनि चार योजने दुर ॥ तामलिंगा नाम नगरी ॥ तेथें जाता झाला ते अवसरीं ॥ हळु हळु पोहोंचला ॥१०६॥
इकडे उज्जनीची कथा राहिली ॥ आतां पाहिजे श्रवण केली ॥ नगरजनें वाट पाहिली ॥ चार प्रहर रायाची ॥१०७॥
तेव्हा सौदागार म्हणे प्रधानासी ॥ वारु द्यावा आमुचा आम्हांसी ॥ कोणीकडे नेलें वारुसी ॥ राया विक्रमानें ॥१०८॥
तंव पाहते झाले नगराबाहेर ॥ कोसीं दो कोसी कोस चार ॥ परी कोठें न दिसे राजेश्र्वर ॥ मग चिंता प्रवर्तली ॥१०९॥
तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी ॥ सत्वर शोधोनि आणा रायासी ॥ नाहीं तरी आम्हांसी ॥ पैका द्यावा वारुचा ॥११०॥
 
तेव्हा प्रधानासी पडली चिंता ॥ मनी म्हणे कैसे करावे आतां ॥ रायाचा शोध न लागे तत्त्वतां ॥ सौदागरें अडविलें ॥१११॥
मग प्रधानें काय केले ॥ सौदागरासी बोलाविले ॥ म्हणे वारुचे मोल काय वाहिलें ॥ ते सांगा ॥ आम्हांसी ॥११२॥
तयानें मोल सांगतांचि झडकरी ॥ मग पैका घातला तयाचे पदरीं ॥ तेव्हा प्रधानासी पुसोनि सत्वरी ॥ जाता झाला शनिदेव ॥११३॥
सौदागर गेलियापाठी ॥ मागे काय वर्तली गोष्टी ॥ नगरजन सर्व होती कष्टी ॥ देश पट्टणॆं धुंडिली ॥११४॥
नगरी झाली ऐसी परी ॥ इकडे राजा विक्रम काय करी ॥ तया तामलिंदापुरा नगरीं ॥ ग्रामामाजी प्रवेशला ॥११५॥
तंव तेथे व्यवहारी सावकार ॥ जातीचा वैश्‍व धनाढ्या थोर ॥ तेव्हां तयाचे दुकानावर ॥ राजा नावेक स्थिरावला ॥११६॥
सावकाराचे दुकानी ॥ विक्री होतसे द्विगुणी ॥ त्याणे भला माणूस जाणोनी ॥ आदर केला तयाचा ॥११७॥
मग व्यवहारी बोल भावें ॥ तुम्ही आतां मुखमार्जन करावे ॥ जातीचें कोण आम्हां सांगावे ॥ नाम ग्राम तुमचे पैं ॥११८॥
राजा म्हणे तया वैश्यासी ॥ आम्ही क्षत्रिय असो परियेसी ॥ आमुचा मुलुख दूर देशी ॥ क्षणी एक येथे उतरलों ॥११९॥
मग सावकारें करविला पाक ॥ अति उत्तम षड्रसादिक ॥ भात पुरया सांडगे देख ॥ करविले बहुत प्रकार ॥१२०॥
 
मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया ॥ उठा वेगीं जेवावया ॥ भोजन करोनि लवलाह्या ॥ मग जावें सुखरुप ॥१२१॥
मग राव करी संध्यास्नान ॥ सत्त्वर सारिता झाला भोजन ॥ उत्तम प्रकारचें पक्कान्न ॥ सेवूनि तृप्ति पावला ॥१२२॥
तेव्हा वैश्य क्षत्रियासी । सत्य सांगावे आम्हांसी ॥ मग विक्रमे यथार्थ कथिलें तयासी ॥ तेव्हा तो निज अंतरी समजला ॥१२३॥
आतां त्या सावकाराची कन्यका ॥ नाम तिचें अलोलिका ॥ तिचा पण हाचि देखा ॥ इच्छिला वर वरावा ॥१२४॥
परी तिसी न मिळे इच्छावर ॥ वैश्‍व शोध करी निरंतर ॥ तंव हा विक्रम राजा परिकर ॥ म्हणे यासी द्यावी कुमारीक ॥१२५॥
तेव्हां न बोले कुमारिकेसी ॥ बाई उत्तम वर आणिला तुजसी ॥ आतां तूं माळ घाली यासी ॥ न करी अनमान ॥१२६॥
हा स्वरुपें आहे सुंदर ॥ बत्तीसी लक्षणीं परिकर ॥ हा भाग्यवंत जाण वर ॥ यासी वरी कुमारीके ॥१२७॥
तेव्हां कुमारी बोले पित्यासी ॥ तुम्ही बुत वर्णितां यासी ॥ परि न भरतां मम मानसीं ॥ तंववरी न वरी त्यासी निर्धारीं ॥१२८॥
आज पाहीन याचें लक्षण ॥ कैसें चातुर्य काय ज्ञान ॥ भाषणावरुनि प्रमाण ॥ सर्व कळों येईल ॥१२९॥
ऐसें वदतां झाली सांज ॥ तंव अस्तासी गेला भानुराज ॥ पित्यासी म्हणे महाराज ॥ पांथिकासी पाठवावे ॥१३०॥
 
मग वैश्य म्हणे क्षत्रियासी ॥ जावें निद्रा करावयसी ॥ अति रम्य चित्रशाळेसी ॥ तेथे सर्व विदित होईल ॥१३१॥
मग तो विक्रम उठोनि चालिला ॥ जेथे होती चित्रशाळा ॥ तेथे हंस मयूर कोकीळा ॥ नाना प्रकारचे लेपिले ॥१३२॥
चित्रें रेखिली बहुकुशलता ॥ वारु आणि गजरथा ॥ चित्रकारें चित्र रेखितां ॥ आळस कांही न केला ॥१३३॥
पुढें पाहे राजा नयनी तंव अपूर्व मंचक देखिला तत्क्षणीं ॥ त्यावर पासोडा लेप दोन्ही ॥ अंथरुण घातलेसे ॥१३४॥
रत्‍नखचित सुरंग पलंग ॥ त्यावरी नाना परिचे रंग ॥ जाई जुई पुष्प सुरंग ॥ सेज केली अति निगुतीं ॥१३५॥
वरती लोंबती मोतियांचे घड ॥ चांदवा करीतसे फडफड ॥ समया जळती धडधड ॥ चतुष्कोणी चार पैं ॥१३६॥
ऐसें पाहुनि राव झाला चकित ॥ म्हणे न कळे काय आहे वृत्तांत ॥ हा कोण देश कोणती गत ॥ होईल ती कळेना ॥१३७॥
कर्माच्या गति असती गहना ॥ जें जें होणार तें कदा चुकेना ॥ तें तें भोगल्याविना सुटेना ॥ देवांदिका सर्वांसी ॥१३८॥
तरी हे शनिदेवाचे छळण ॥ तेणें ही माया रचिली जाण ॥ आतां होणार ते होय आपण ॥ जो सर्वांसी पीडीतसे ॥१३९॥
ऐसा मनी करोनी विचार ॥ मग निद्रा करी राजेश्वर ॥ तया पलंगी साचार ॥ सावधान निजे अंतरी ॥१४०॥
 
नाना परींचे करी विचार ॥ बुद्धिचे तरंग अपार ॥ म्हणोनि निद्रा न ये साचार ॥ परि मुख‍आच्छादन केलेंसे ॥१४१॥
रायें केली ऐसी परी ॥ मग वैश्यकन्या काय करी ॥ पंचारती घेऊनि करीं ॥ आली रंगमहालाकारणें ॥१४२॥
तिनें केला सर्व शृंगार । गळां शोभती मोतियाचे हार ॥ केशर कस्तुरी कर्पूर ॥ सुगंधद्रव्ये आणिली पैं ॥१४३॥
पायी पैंजण नेपुरें तीं झणत्कार करिती गरजें ॥ पदकांसी जडिले दिव्य हिरे ॥ त्यांचे तेज फाकतसे ॥१४४॥
ती जैसी पुतळीच केवळ ॥ बत्तीस लक्षणी वेल्हाळ ॥ मृगनयना विशाळभाळा ॥ येऊनि उभी ठाकली ॥१४५॥
राव निद्रेचें मिष करुन ॥ पलंगी पहुडलासे जाण ॥ तो न उठे ऐसें जाणोन ॥ मग कुमारी काय करी ॥१४६॥
चंदनपात्र घेऊनि हातीं ॥ अलोलिका होय शिंपती ॥ तरी जागा न होय नृपती ॥ कोणही प्रकारेंकरोनी ॥१४७॥
ऐसी एक प्रहर झाली कष्टी ॥ जागा न होय मग झाली हिंपुटी ॥ मुक्तहार ठेवूनि खुंटी ॥ निद्रा करी संचित ॥१४८॥
तंव निद्रा आली कामिनीसी ॥ मग राव उघडितां मुखासी ॥ विचार करी निजमानसी ॥ मी सत्त्वधीर म्हणवितो ॥१४९॥
परोपकरी माझे मन ॥ पापास भितों रात्रंदिन ॥ ही तंव कन्या असे जाण ॥ कैसें भाषण करावें ॥१५०॥
 
ऐसा विचार करी निजमानसी ॥ तवं तो निद्राभर कामिनीसी ॥ मग पाहता झाला चित्रांसी ॥ तेथे अपूर्व वर्तलें ॥१५१॥
चित्रीचा हंस निर्जीव ॥ परी तो काय करिता झाला लाघव ॥ खाली उतरोनि सावयव ॥ हाराचीं मोत्यें भक्षीतसे ॥१५२॥
राव पाहुनि झाला चकित ॥ मनी म्हणे हे आश्चर्यमाता ॥ परी ही गोष्ट अनुचिता ॥ दुःखदायक आपणासी ॥१५३॥
जरी हार घ्यावा काढूनि ॥ तरी बिरुद निरसुनी ॥ परासी दुःख न द्यावे म्हणुनी ॥ बिरुद असें माझे हें ॥१५४॥
परंतु गोष्टी ही अघटित ॥ आपणासी दुःख होईल प्राप्त ॥ ग्रहदर्शचें मान सत्य ॥ परी हार न काढावा ॥१५५॥
ऐसा निश्चय रायें केला ॥ इकडे सर्व हार हंसे गिळिला ॥ तें पाहुन राव निजला ॥ कुमारिकेशेजारी ॥१५६॥
तंव उगवला असे दिन ॥ कुमारी उठली खडबडोन ॥ म्हणे हा पित्यानें वर आणिला जाण ॥ अतिमूर्ख नपुंसक ॥१५७॥
मनी क्रोध आला भारी ॥ हार न देखे कुमारिका ॥ ती म्हणे पांथिका अविवेका ॥ हार घेवोनि महाटका ॥ निद्रा केली सुखरुप ॥१५९॥
तरी हार देई माझा झडकरी ॥ तुज पचणार नाहीं चोरी ॥ ऐसिया गोष्टीनें तुझी थोरी ॥ राहणार नाहीं तत्त्वतां ॥१६०॥
 
तरी हार दे माझा मजप्रती ॥ मग त्वां जावें आपुल्या पंथी ॥ याची चर्चा झालिया निश्चितीं ॥ नाश होईल शरिराचा ॥१६१॥
तंव पांथस्थ म्हणॆ कुमारिका ॥ हार नाही आम्हांसी ठाउका ॥ येथें निद्रा केली म्हणोनि देखा ॥ आळ घालिसी आम्हांवरी ॥१६२॥
तंव ती कुमारी संतप्त मनी ॥ पित्यासी सांगे तत्क्षणीं ॥ म्हणे इच्छावर आणिला मजलागुनी ॥ त्याचें लक्षण अति उत्तम ॥१६३॥
तुम्ही ठक चोर आणिक घरा ॥ तो तस्कर विद्येमाजी पुरा ॥ तेणें चोरिलें माझिया हारा ॥ तरी तो मागूनि घेईंचे ॥१६४॥
तेव्हा वैश्य म्हणे पांथकासी ॥ तुज विश्राम दिधला कासयसी ॥ तरी तूं कां हार घेऊनि बैसलासी ॥ बरा झालासा उतराई ॥१६५॥
उत्तम भोजन दिधंले देखा ॥ आणि ही अर्पिली निजकन्यका । ऐसें असतां महामूर्खा ॥ हें काय आचरलासी ॥१६६॥
बराच फेडीला उपकार ॥ देई माझे कन्येचा हार ॥ मग त्वां जावे सत्वर ॥ आलिया पंथे ॥१६७॥
तंव राव म्हणॆ सावकरासी ॥ तुमचा हार नाहीं मजपाशी ॥ हा कर्मभोग ओढवला सायासी ॥ नसतसें विघ्ने हें ॥१६८॥
तेव्हा सावकारासी क्रोध आला ॥ तेणे सेवकांसी हुकूम केला ॥ बंधन करावे या तस्कराला ॥ मार द्यावा निष्ठुरपणे ॥१६९॥
यासी मारिल्यावांचून ॥ हार हस्तगत न होय जाण ॥ हा पक्का चोर म्हणोन ॥ ऐसें लक्षण पै याचें ॥१७०॥
 
मग त्या सेवकीं धावून सत्वर ॥ बांधिला तो मुशाफर ॥ अतिशयें दिधला मार ॥ दया नाहीं अंतरी ॥१७१॥
ते मारिती निष्ठुर होऊनी ॥ दया नाहीं अंतःकरणीं ॥ मारा मारा ऎशा वचनीं ॥ वैश्य तेव्हां बोलत ॥१७२॥
मार मारुनि केला जर्जर ॥ म्हणती हार देई गा सत्वर ॥ महानिर्दय निष्ठुर ॥ दया न ये कोणासी ॥१७३॥
मग राव म्हणे वैश्‍वासी ॥ हार नाहीं गा आम्हापाशी ॥ कष्टवितोसी शरीरासी ॥ वृथाची जाण कासया ॥१७४॥
तै वैश्य म्हणे सेवकांला ॥ हा पक्का तस्कर नव्हे भला ॥ अद्यापि नाही कबुल आला ॥ मार खातो निःशंक ॥१७५॥
मग तो व्यवहारी काय करी ॥ जाऊनि रायाचे दरबारी ॥ राया चंद्रसेना श्रुत करी ॥ सांगे सकळ वर्तमान ॥१७६॥
तें ऐकोनि राजेश्र्वर ॥ म्हणे आणावा तो तस्कर । ऐसे वचन ऎकोनि सत्वर ॥ सेवकांची मांदी धावली ॥१७७॥
त्यांनी बंधन करोनि विक्रमासी ॥ आणिते जाहले रायापाशी ॥ मग प्रणिपात केला वेगेंसीं ॥ सन्मुख उभा राहिला ॥१७८॥
मग राव बोले पांथिकासी ॥ हार आहे कीं तुजपाशी । तो देई आता सावकारासी ॥ प्राण वांचणी आपुला ॥१७९॥
तंव विक्रम बोले वचना ॥ ऐक राया चंद्रसेना ॥ हार घेतला नाहीं जाणा ॥ असत्य न बोलें कदाही ॥१८०॥
 
हारांचा सांगावा विचार ॥ तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्व । न घडे तोचि विचार ॥ घडला असे समर्था ॥१८१॥
आम्हासी ग्रह नाहीं सानुकूल ॥ नसती उप्तन्न होते कळ ॥ त्याची काय करुन हळहळा ॥ होणार ते होतसे ॥१८२॥
बरे चोरी न करवी परंतु केली ॥ परी आता पाहिजे क्षमा केली ॥ सर्व अपराध पोटीं घालीं ॥ कृपा करीं महाराजा ॥ १८३॥
ऐसें वचन ऐकता राजेश्वर क्रोधे संतप्त जैसा खंदिरांगार ॥ गर्जना करोनि सत्त्वर ॥ काय बोलता जाहला ॥१८४॥
सेवकासी म्हणे उठा सत्वर ॥ तोडी याचे चरण कर ॥ टाकून द्या नगराबाहेर ॥ अन्न उदक न द्यावें ॥१८५॥
ऐसा रायाचा अविवेक ॥ मूढमती ते सकळीक ॥ नाहीं कोणी भाविक ॥ यथा राजा तथा प्रजा ॥१८६॥
तरी रायाचे मुखी शनैश्चर ॥ सुचुं न दे कांही विचार ॥ तोचि पीडा करी वारंवार ॥ दुःख देत रायातें ॥१८७॥
ऐसें चंद्रसेनाचे उत्तर ऐकोनि ॥ सेवक उठले झडकरोनी ॥ राया विक्रमासी चालिले घेऊनी ॥ तया नगराबाहेर ॥१८८॥
नेऊनियां नगरप्रदेशीं । तोडिते झाले करचरणांसी ॥ अश्रु येती जनांच्या नयनांसी ॥ महासंकट ओढविले ॥१८९॥
तेव्हां हात पाय चारी ॥ तोडिले त्याचे निष्ठुरीं ॥ टाकोनि ग्रामाबाहेरी ॥ सेवक गेले सांगावया ॥१९०॥
 
मग राजा पुसे सेवकाला । तो मेला किंवा वांचला ॥ त्याचा प्राण कोटे उरला ॥ ऐसें बोल उत्तर ॥१९१॥
मग सेवक म्हणती महाराज ॥ सत्वरचि प्राण जाईल सहज । करचरणांवीण आत्मराज ॥ कैसें सुख पावेल ॥१९२॥
खाण्यावीण हैराण ॥ शरीरीं पीडा अतिदारुण ॥ तळमळ करी रात्रंदिन ॥ महादुःख होतसे ॥१९३॥
इकडे राजा विक्रम काय करी ॥ हातापायांचे दुःख भारी । जैसा मत्स्य तळमळ करी ॥ उदकावीण जाण पां ॥१९४॥
कोणी येताती वाटसरु ॥ त्यासी पाहतां येत गहिंवरु ॥ ते म्हणती हे परमेश्वरु ॥ कोण कष्ट या प्राणियासी ॥१९५॥
जरी अन्न उदक कोणी द्यावें ॥ तरी रायें त्यासी दंडावे ॥ ताडन बंधन करावे ॥ ऐसा धाक जनांसी ॥१९६॥
ऐसें असता जाहला एक मास ॥ अति दुःख होतसे विक्रमास ॥ परी द्‍या न ये कोणास ॥ ग्रहदशा म्हणवोनी ॥१९७॥
राव विक्रम शोक करी ॥ म्हणे ग्रहा समर्था कृपा करीं ॥ निष्ठुर न व्हावें निजांतरी ॥ दया करी दीनास ॥१९८॥
ऐसी करुणा भाकितां तये वेळीं ॥ मग शनैश्चरासी कृपा आली ॥ म्हणॆ याच्या सत्वाची न कळे खोली ॥ सीमा झाली तत्त्वतां ॥१९९॥
तरी आता पीडूं नये तत्त्वतां ॥ केली रायाच्या मनीं प्रेरकता ॥ चंद्रसेन द्रवला चित्ता ॥ म्हणॆ अन्न‍उदक देत जावें ॥२००॥
 
अन्नउदकाची आज्ञा जाहली ॥ नगरजनांसी दया आली ॥ ते आणोनि देती नित्यकाळीं ॥ कनवाळू कृपाळू जन ॥२०१॥
अन्न‍उदकाचा होतसे सुकाळ ॥ परंतु करचरणांवीण पांगुळ ॥ त्या अति दुःखे होतसे विकळ ॥ चैन न पडे क्षणभरी ॥२०२॥
ऐशीं क्रमिलीं वर्षे दोन ॥ तोंवरी दुःख सोशिलें अति दारुण ॥ ऐसें कर्माचे विंदान ॥ भोगिल्यावीण सुटेना ॥२०३॥
तंव कोण एके दिवशीं ॥ तेलीण बैसोनि शिबिकेसी ॥ जात होती सासर्‍याची तया मार्गानें ॥२०४॥
त्या तेलिणीचें माहेर ॥ होते पै उज्जनीनगर ॥ सासरें तामलिदापुर नगर ॥ ऐसें श्रोती जाणावें ॥२०५॥
तेथील तेलियाने उज्जीनहूनी ॥ स्नुषा आणिली मूळ करोनी ॥ तंव ती त्या मार्गावरोनी ॥ येत होती उभयतां ॥२०६॥
तेव्हा त्या तेलिणीनें ॥ पाहिलें विक्रमाकारणें ॥ मनी म्हणॆ राजा केणें ॥ आणिलासे या स्थानीं ॥२०७॥
मग ती खाली उतरोनी कामिनी ॥ लागली विक्रमाच्या चरणी ॥ म्हणे हातांपायावांचोनी ॥ कोण अवस्था शरीराची ॥२०८॥
राजा अवलोकी तेलिणीकडे ॥ बाई विजयी असोत तुझे चुडे ॥ काय वृत्तांत ग्रामाकडे ॥ तो सर्व सांग मज ॥२०९॥
मग कामिनी म्हणॆ अहो राया ॥ सर्व सुखी आहेत करुणालय ॥ परी हे अवस्था तुमच्या देहा ॥ काय म्हणोनी जाहली ॥२१०॥
 
राव म्हणॆ ऐक पतिव्रते ॥ हा कर्मभोग जाण निरुतें ॥ ग्रहदशा फिरली मातें ॥ हें कर्तृत्व देवाचें ॥२११॥
मग सर्व सांगितलें तियेसी ॥ जें जें वर्तले ज्या समयासी ॥ ते ऐकोनि म्हणे विक्रमासी ॥ धन्य रे विधातिया ॥२१२॥
मग ती तेलीण काय करीत ॥ रायासी शिबिकेमाजी बसवीत ॥ आपुल्या गृहासी घेऊनि जात ॥ अत्यादरें करोनिया ॥२१३॥
तंव तो तेली कांपे थरथरा । म्हणे हे विघ्न आणिलें घरा ॥ जरी श्रुत होईल राजेश्र्वरा । मग कैसें करावें आपण ॥२१४॥
तेव्हा सून म्हणे श्र्वशुरासी ॥ हा विक्रमादित्य निश्‍चयसी ॥ धर्मनीती राज्य करी उज्जनीसी ॥ परी हे दशा ग्रहाची ॥२१५॥
हा मावळा देशीचा धनी ॥ जैसा उकिरड्‍यांत पडला चिंतामणी ॥ दैवें लाधला आपणालगूनी ॥ म्हणोनि आला गृहातें ॥२१६॥
मग तो तेली काय करी ॥ राया चंद्रसेना श्रुत करी ॥ आपण तस्कर टाकिला जो बाहेरी ॥ हस्तपाद खंडोनी ॥२१७॥
जरी आज्ञा होईल राजेश्वरा ॥ तरी आणीन तया तस्कारा ॥ दया उपजली मम अंतरा ॥ दीन अनाथ म्हणवोनी ॥२१८॥
मग राव म्हणे भला रे भला ॥ आणावें तया तस्कराला ॥ प्रतिपाळ करी वहिला ॥ अन्नवस्त्र देउनी ॥२१९॥
ऐसा हुकुम केला रायानें ॥ मग तेली आला घराकारणें ॥ तेव्हा तेलीयासी विक्रम म्हणॆ ॥ गोष्ट सांगतो ऐका ते ॥२२०॥
 
मग राव म्हणे मेहतरासी ॥ तुम्ही श्रुत न करावें कोणासी ॥ विक्रम आहे मम गृहासी ॥ ऐसें कोठें न वदावें ॥२२१॥
मग तो तेली म्हणे राजेश्वरा ॥ घाणा हांकावा माझिया घरा ॥ देईन मी अन्न आणि वस्त्रा । ऐसा नेम पैं माझा ॥२२२॥
मग विक्रम म्हणे तेलियासी ॥ धन्य तुझी बुद्धि ऐसी ॥ तुझ्या उपकार न फिटे आम्हांसी ॥ महासंकटी रक्षिलें ॥२२३॥
ऐसे करितां काहीएक दिवस ॥ होती झाले विक्रमास ॥ तया तेलियाचे घरी रात्रंदिवस ॥ घाणा हाकीतसे ॥२२४॥
तंव सात वर्ष परिपूर्ण झाली ॥ पुढे कथा कैसी वर्तली ॥ ते पाहिजे श्रवण केली ॥ एकाग्रचित्ते करोनियां ॥२२५॥
मग कोणे एके दिवशी ॥ सांयकाळ झाली निशी ॥ घाण्यावर असतां विक्रमासी ॥ बुद्धि कैसी आठवली ॥२२६॥
तो दीपरागाचा अवसर ॥ ध्यानांत आणी राजेश्वर ॥ राग आळवितो मधुर ॥ सुस्वर कंठेकरोनी ॥२२७॥
राग‍उद्धार करिता प्रत्यक्ष ॥ दीप लागले लक्षानुलक्ष ॥ जैसी दीपवाळीच देख ॥ प्रकाशमान नगरांत ॥२२८॥
तंव एकस्तंभाच्या मांडीत ॥ राजकन्या अतिरुपवंत ॥ नामें पद्मसेना निश्चित ॥ बैसलीसे आनंदे ॥२२९॥
तेव्हा तिने अवलोकिला प्रकाश ॥ मग पाचारिलें पारिचारिकेस ॥ म्हणे कोणी केलें दीपोत्सवास ॥ शोध करोनी मज सांगा ॥२३०॥
 
दीपवाळी तों आज नाहीं ॥ आणि लग्न ही नसे कोठेंही ॥ तरी हे आश्चर्य दिसतें काहीं ॥ पाहुनि यावें सत्वर ॥२३१॥
इकडे दीपराग झाला संपूर्ण ॥ तेव्हा मावळले मुळींहुन ॥ मग दुसरा श्रीरागनामेंकारुन ॥ तेथे राग आळवीतसे ॥२३२॥
पद्मसेना पुसे परिचारिकेसी ॥ हा पुरुष रागज्ञानी विशेषीं ॥ राग आळवितो अति सुरसीं ॥ कोण्या स्थळीं पहा गे ॥२३३॥
याचा आणावा समाचार ॥ धुंडाळावे सकळ नगर ॥ जेथे असेल तो नर । एथे आणा वेगेंसी ॥२३४॥
तेव्हा परिचारिका चौघीजणी ॥ नगरीं शोध करिती तत्क्षणीं ॥ तवं तो तेलियाच्या घरीं घाणी ॥ हांकीतसे चौरंग ॥२३५॥
त्या परतोनि राजकन्येसी सांगती ॥ कीं चौरंग केला जो निश्चितीं ॥ तो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती ॥ घाणा हांकीत बैसला ॥२३६॥
तोचि करित आहे रागरंग ॥ परी स्वरुप दिसताहे बेढंग ॥ जैसे का शिमग्याचें सोंग ॥ ऐसियापरी दिसताहे ॥२३७॥
मग पद्मसेना म्हणे साचार ॥ तरी घेऊन