गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जून 2021 (22:40 IST)

महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणी पावसाळ्यात नक्की भेट द्या

सध्या पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे.त्यामुळे लोकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.लोक पावसाळ्यात सहलीला जाण्याचे बेत आखत आहे. महाराष्ट्रातील काही मनमोहक अशी पर्यटन स्थळे आहेत ज्या ठिकाणी पावसाळ्यात हजेरी लावायलाच पाहिजे.चला तर मग जाणून घेऊ या.कोणती आहे ही स्थळे.
 
1 लोणावळा / खंडाळा-पुणे - मुंबई महामार्गावर सह्याद्रीच्या  घाटमाथ्यावर हे थंड हवेचं ठिकाण आहे. इथे असलेली हिरवीगार वन्य शोभा,डोंगरमाथे, दऱ्या, पावसाळ्यात डोंगरातून वाहणारे धबधबे हे मनाला मोहून टाकणारे आहेत. इथे ढगांच्या धुकट वातावरणात हरवून जावेसे वाटते.पावसाळ्यात इथे सौंदर्य बहरून जाते.लोणावळा आणि खंडाळा हे दोन्ही ठिकाण जवळ आहे.याच्या जवळपास राजमाची पॉईंट,वळवण धरण,भुशी धरण,टायगर्स लीप, ड्युक्स अँड डचेस नोज, कार्ला भाजा,लेणी,लोहगड,विसापूर ही बघण्यासारखी स्थळे आहेत.लोणावळच्या परिसरात बरेच सॅनेटोरियम्स आहे.लोणावळाची चिक्की जगभरात प्रसिद्ध आहे.
 
 
2 ताम्हिणी घाट-गोवा महामार्गावर मुंबईपासून सुमारे 140 किमी अंतरावर असणारे हे ताम्हिणी घाट पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे.साहस आणि पर्यटनाचे सम्मिश्रण असलेले हे ठिकाण आहे.जर आपल्याला धाडस करण्याची आवड आहे तर आपण नक्की या ठिकाणी भेट द्या.हिरवेगार सौंदर्य,खोल दऱ्या,मुळशी धरण, डोंगरा वरून पडणारे धबधबे हे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. येथे जवळच 30 किमी च्या अंतरावर सिंहगड किल्ला देखील प्रेक्षणीय आहे.
 
 
3 भीमाशंकर- हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असून हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत अतिशय घनदाट अरण्याने वेढलेले आहे.घनदाट जंगल आणि तीर्थक्षेत्र असल्यामुळे हे प्रमुख पर्यटन स्थळ बनत आहे.भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.तसेच भीमा नदीचे उगम स्थान इथेच आहे.इथे अभयारण्यात रानडुक्कर, सांबर, भेकर,रानमांजर,रानससा,उदमांजर,बिबट्या सारखे प्राणी आणि इतर पक्षी आढळतात.इथे उडणारी खार वैशिष्टयपूर्ण आहे.इथे कोकणकडा,सीताराम बाबा आश्रम,नागफणी सारखी ठिकाण बघण्या सारखी आहे.
 
 
4 सापुतारा-महाराष्ट्र -गुजरात सीमेवर नाशिक शहरापासून सुमारे 80 किमी अंतरावर असलेले हे ठिकाण थंड हवेचे असून सातपुडा पर्वतराजेत वसलेले आहे.हथगढ किल्ला,आर्टीस्टस् व्हिलेज,मध संकलन केंद्र,गीरा धबधबा, रोप-वे, बोटींग क्लब, म्युझियम (संग्रहालय), सनराइज पॉईंट,सनसेट पॉईंट, इको पॉईंट, अ‍ॅक्वारियम इथे बघण्यासारखे प्रेक्षणीय स्थळ आहे.
 
 
5 इगतपुरी-हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याचे गाव मुंबई-आग्रा महामार्गावरआहे.हे थंड हव्याचे ठिकाण असून इथे महिंद्रा आणि महिंद्राचे इंजिन बनविण्याचा कारखाना आहे.या परिसरातील वाहणारे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.अप्पर वैतरणा धरण, भंडारदरा धरण, खोडाळा, सुंदरनारायण गणेश मंदीर याशिवाय कुलंग, अलंग, मदनगड, कळसूबाई, रतनगड या उत्तुंग डोंगररांगा तसेच सांदण दरी, रंधा धबधबा इथे जवळपासची बघण्यासारखी ठिकाणे आहेत.कसाराघाटातील धुके अनुभवणे एक रोमांचकारी अनुभव आहे.इथे डोंगऱ्याच्या पायथ्याशी धम्मगिरी हे विपश्यना केंद्र आहे.इथून जवळ कावनई,त्रिंगलवाडी हे बघण्यासारखे किल्ले आहेत.
 
 
6 पाचगणी-महाराष्ट्रातील साताऱ्या जिल्ह्यातील पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे महाबळेश्वर पासून अवघे 18-20 की.मी.अंतरावर असलेलं हे ठिकाण आहे. तसेच हे ठिकाण पब्लिक स्कुल साठी देखील प्रसिद्ध आहे.इथे जुन्याकाळातील पारशी लोकांनी बांधलेले बंगले देखील बघण्यासारखे आहे.इथे राहण्याची जेवण्याची उत्तम सोय आहे.पांच डोंगराच्या समूहावर असल्यामुळे हे ठिकाण पाचगणी म्हणून ओळखले जाते. खोल दऱ्या धबधबे, कमलगड, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध बघण्यासारखी स्थळे आहेत.
 
 
7 माथेरान- रायगड जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण आहे.हे मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वात जवळची आणि निसर्गाने वेढलेली ही जागा 2600 फुटीच्या उंच पठारावर असलेले माथेरान आहे.इथे शार्लोट लेक, पॅनारोमा पॉईंट,लुईझा पॉईंट,सनसेट पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट अशी अनेक पॉईंट इथे मनाला भुरळ घालण्या सारखी आहे..
 
 
टीप :या सहलीच्या ठिकाणी जाताना स्वतःची आणि इतरांची काळजी अवश्य घ्या.