मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By

शीतल आल्हाददायी कळसूबाई

कळसूबाई म्हटलं की सह्याद्री रांगेतले सर्वात उंच शिखर अशी आपली धारणा होते आणि स्वाभाविकच आहे. अदमासे 1550 मीटर उंच अर्थात 5400 फुटांवर असलेलं हे शिखर. महाराष्ट्रातल्या सर्व ट्रेकर्सला कायम आकर्षित करणारं ठिकाण. तसा कळसूबाई शिखरावर मी चारदा गेलो. पण आठवणीत राहिली ती श्रावणातल्या वनसचेतन शिबिराअंतर्गत केलेली गडगिरी. आम्ही दोन गाड्या करून 150 जण भारती जैन संघटना महाविद्यालयातून 1997 मध्ये कळसूबाईला गेलो होतो. महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. राजन वेळूकर यांनी वनसचेतन ही एक अफलातून संकल्पना मांडली होती.
आम्हाला आलं होतं ते भंडारदरा वन. भंडारदरा करून कळसूबाई करायचं असा सगळा योजनेचा भाग होता. भारती जैन संघटनेचे कर्यवाहक डुंगरवाल आणि आम्ही 150 जण असे कळसूबाईला जायचं ठरलं. त्याप्रमाणे रात्री 11 वाजता पुण्याजवळच वाघोलीहून आम्ही निघालो. पहाटे पोहोचलो. संगमनेरमध्ये आन्हीके उरकलनंतर पहाटे पाच-सव्वापाचला भंडारदर्‍याला पोहोचलो. ठरलं की आधी कळसूबाई करायचं आणि मग मक्कामाच्या ठिकाणी यायचं. त्याप्रमाणे आम्ही कळसूबाई चढायला सुरुवात केली. काहीजण अगोदरच नाही म्हणाले. त्यामुळे 5-6 जणांचा चमू खालीच राहिला. बाकी सगळ्यांनी चढायला सुरुवात केली. श्रावणाचा महिना असल्यामुळे धुक्याचं मधूनच वावटळीसारखं येणं, मध्येच बारीकसा पाण्याचा शिडकावा. थंडीचे दिवस आहेत म्हणून प्रत्येकाने स्वेटर, मफलर अशी पूर्ण तयारी केली होती. तासभर चालल्यानंतर इतकं घामाघूम झालो की आमचं आम्हाला जाणवायला लागलं की, हे आपण उगंच सगळं लटांबर घेतलेलं आहे. मग कुणी स्वेटर काढून कमरेला बांधला. मफलरी टोप्या कधीच काढल्या होत्या. मग असं मजल दरमजल करीत वर चढत होतो. कळसूबाई चढताना काही पायर्‍यात लागतात. या पायर्‍या छातीत धडकी भरणार्‍या आहेत. कारण 30-35 पायर्‍या आहेत पण त्या ढोपराएवढ्या उंचीच्या आहेत. मध्ये आम्ही थांबलो आणि बरोबर जो नाष्टा आणला होता तो खाल्ला, पुढे गेलो. तिथे तीन शिड्या लागतात. पहिल्या शिडीवर चढलो. शिडी ही अत्यंत घट्ट रोवलेली आणि शिडी चढतोय म्हटल्यानंतर सोपं काहीतरी आहे असं वाटलं. जसजशी शिडी चढायला मुलं लागली तसतसे पायात गोळे यायला लागले आणि वर गेल्यानंतर असं लक्षात आलं की हे दिसतं तेवढं सोपं नाही. अशा तिन्ही शिड्या पार केल्या आणि तिसर्‍या शिडीच्या नंतर मधल्या भागात एक विहीर लागते. या विहिरीचं पाणी हातानं घेता येईल इतकं जवळ आहे. विहिरीचं पाणी इतकं थंडगार आहे की आपण बर्फ खातो की काय अशी भावना आपली होते. आणि म्हणूनच अतिशय थंड, शुद्ध, निर्मळ तळ दिसणारं विहिरीचं पाणी अत्यंत गोड चवीचं होतं. असं पाणी पिऊन समोर बघितलं तर माथा अत्यंत जवळ टप्प्यात आल्यासारखा दिसतो अर्थात वळणावळणानं जावं लागतं. थोडा जास्त वेळ लागतो पण गड चढलचा जो आनंद आहे तो असल्यामुळे पाय मी म्हणत असले तरी पायाला गोळे असले तरी आपण भराभर वर चढायला लागतो. कळसूबाईच्या शिखरावर 1000 माणसं बसतील एवढी जागा आहे. परंतु कळसूबाईच्या मंदिरात मात्र 3 ते 4 जण थांबू शकतील अशी व्यवस्था आहे. तिथे अनेक घंटा टांगलेल्या दिसतात. कळसूबाई मंदिराच्या मागच्या बाजूला गेलं आणि जर वातावरण निरभ्र असेल तर पलीकडे अलंग मलंग, त्याच्यापलीकडे रतनगड आणि हरिश्चंद्रगड, साम्रद किंवा इकडे भंडारदर्‍याचा जलाशय असं सगळं बघायला मिळतं.
गडावर गेल्यावर जसं आल्हाददायी प्रसन्न वाटतं, तसंच अतिशय भारावून जाणारं, श्रावण महिना असल्यामुळे सगळीकडे दुलईसारखी मखमली, हिरव्या रंगाची चादर पसरलेली, पृथ्वीने स्वतःला लपेटून घ्यावं असं वातावरण असतं. मधूनच पावसाच्या सरी येतात. खाली उतरल्यानंतर अर्थातच काही प्रश्न उभे राहिले. ते म्हणजे हे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर. पण येथे शिडीचा भरवसा आहेच परंतु आता नव्याने पुन्हा काही शिड्या केलेल्या आहेत. पण तरीसुद्धा वाट अजून जशी ट्रेकर्सला जशी हवी तशी नीटशी नाही. किमान काही ठिकाणी पार करणं गरजेचं आहे. विशेषतः यात्रेचं स्वरूप आल्यामुळे येथे यात्रेचं आपत्ती व्यवस्थापन गरजेचं आहे. वरचा जो माथा आहे त्या माथ्यावर सगळ्याच बाजूने उंच रेलिंग करणं आवाश्यक आहे. या भागात अनेक प्राणी, पक्षी आहेत विशेषतः माकडाचं प्रमाण आहे. येथे बिबट्या बरचदा असतो. वनखात्याच्या सामाजिक वनीकरणाच एका गेस्ट हाऊसमध्ये आमची सोय केलेली होती. आम्ही तेथे सगळे थांबलेलो होतो. आणि मग दुसर्‍या दिवशी भंडारदरच्या नावेमध्ये बसून रतनगडच्या पायथ्याला अमृतेश्वराचं दर्शन घेऊन आलो. अंबरेला फॉल, रंधा फॉल हे सगळं बघितलं. हा परिसर आणखी जास्त चांगला होऊ घातलाय म्हणजे दोन्ही बाजूंनी अमृतेश्वराला गाडीनं आणि नावेनं असं जाता येतं. म्हणजे भंडारदर्‍याला वळसा घालता येतो. काजवा महोत्सव अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हा काजवा महोत्सव म्हणजे छोटे छोटे लुकलुकणारे दिवे आणि लाखोच्या संख्येने या दिवसात तर ते हमखास दिसतात. अतिशय उत्तम जेवणाची व्यवस्था सामाजिक वनीकरण खात्यानं केलेली होती. ती झाल्यानंतर मुलांना उत्साह होता पाण्यामध्ये डुंबायचा. भंडारदरच्या पायथ्याला अतिशय सुंदर जागा आहे तेथे आंघोळी करता येतात. अर्थातच आम्ही सगळ्यांनी तो आनंद घेतला. आणि कळसूबाईचं दर्शन हे माझ्या कायमस्वरूपी मनात कोरलं गेलं. कळसूबाई खरं तर आणखी विकसित व्हायला हवं म्हणजे रोपवे करता येतील का? रोपवे करून मध्ये काही सोय करता येईल का? कळसूबाईला आजही अतिशय गरमागरम भजी मिळतात. एक आजी छान भजी करून देतात किंवा ताकही छान मिळतं पण आणखी काही जेवणाच्या उत्तम सोयी असाव्या लागतात. चला तर ही सगळी देवस्थानांची ठिकाणं विकसित करण्याकडे लक्ष देऊयात. केवळ गडगिरी करायची म्हणून करायची नाही तर प्रदूषण पण करायचं नाही. हेही आपण ठरवायला हवं.
 
डॉ. संजय चाकणे