मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

Mahalaxmi devi Kolhapur
कोल्हापुरातील महालक्ष्मी म्हणजे अंबा बाई, हिचा उल्लेख पुराणात देखील सापडतो. ही साडेतीन शक्तिपीठा पैकी एक आहे. इथे बरीच प्राचीन मंदिरे आहेत. कोकणाचा राजा कर्णदेव कोल्हापुरात आल्यावर ही मूर्ती एका लहानश्या मंदिरात होती. त्याने इथल्या मंदिराच्या बाजूस स्वच्छता करवून मंदिराला प्रकाशात आणले. वास्तुशास्त्राच्या बांधणीनुसार चालुक्य राजवटीत मंदिराचे बांधकाम केले गेले. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले असून या मंदिराला चक्क पाच कळस आहेत. जुन्या मंदिरातील खांबाला ‘गरूड खांब’ म्हणतात.
 
पुराणानुसार ‍आदिशक्तीची एकशे आठ ठिकाणे आहेत. त्यांच्यापैकीच करवीर क्षेत्रास विशेष महत्त्व आहे. येथे इच्छापूर्तीसोबतच मनःशांतीही मिळते. त्यामुळेच उत्तर काशीपेक्षाही ह्या ठिकाणास माहात्म्य आहे, असा भाविकांचा विश्वास आहे. श्री महालक्ष्मी व भगवान विष्णूंचे वास्तव्य करवीर भागात असल्याची श्रद्धा आहे.
 
हे श्री महालक्ष्मीची मूर्ती रत्नजडित खड्यांपासून घडविण्यात आली असून ती जवळपास पाच ते सहा हजार वर्षापूर्वीची असावी, असे बोलले जाते. या मंदिराच्या कोरीव कामामध्ये वेगवेगळे वेद मंत्र कोरले आहेत. या देवीची मूर्ती किमतीच्या दगडाची असून वजनाला 40 किलोग्रॅमची आहे. मूर्ती घडताना हीरक नावाचा धातू मिसळला आहे. हे मंदिर चौकोनी दगडांच्या तुकड्यावर उभारले गेले आहे. या मूर्तीला चार हात असून एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल आहे. उजव्या हातात खालील बाजूस महाळुंग आहे आणि डाव्या हातात पानाचे ताट आहे. डोक्यावर मुकुट असून त्यावर शेषनागाची मूर्ती आहे. 
 
17व्या शतकात या लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंदिराचे तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असतं. देवीची मूर्ती पश्चिममुखी आहे. मंदिराच्या पश्चिमीकडील भिंतीवर छोटीशी खिडकी आहे. या मंदिरात साखर मिश्रित दुधाचा नैवेद्य करून 10 वाजता शेष आरती केली जाते. रात्री देवीच्या गाभाऱ्यात आरती केली जाते. त्या नंतर मुख्य दार आणि इतर दार बंद करतात. एकूण दिवसातून 5 वेळा आरती करतात. दररोज पहाटे 4:30 वाजता काकड आरती केली जाते. यावेळी भूप रागातील धार्मिक गीतगायन होते. मंगला आरतीनंतर सकाळी आठच्या सुमारास महापूजा करण्यात येते. रोज रात्री दहाच्या सुमारास शेजारती होते. यावेळी गोड दुधाचा प्रसाद असतो. गाभार्‍यात आरती करण्यात येते व यावेळी देवीला निद्रा यावी म्हणून विशेष आराधना केली जाते. महाकाली, श्री यंत्र, महागणपती व महासरस्वतीही आरती व नैवेद्य दाखविण्यात येतो. मंदिर परिसरातील सर्व 87 मंदिरांना आरती ओवाळण्यात येते.
 
जर एकांदिवस महापूजा झालेली नसल्यास दुधाने अंघोळ घातली जाते. प्रत्येक शुक्रवारी देवीला विशेष नैवेद्य दाखवला जातो. काही सणासुदीला या मंदिराला वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाशमय केले जाते. दिवाळीच्या कार्तिक महिन्यापासून ते पौर्णिमेपर्यंत वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. 
 
दर वर्षी, वर्षातून दोनदा साजरा होणारा ‘किरणोत्सव’ हा सोहोळा ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. दर वर्षी मार्च आणि नोव्हेंबरमध्ये हा सोहोळा साजरा केला जातो. ठराविक दिवशी उगवित्या सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या पायांशी पडतात. हा सोहोळा पाहण्यासाठी, अनुभविण्यासाठी हजारो भाविक आवर्जून कोल्हापुरामध्ये येत असतात. या शिवाय रथोत्सव, अष्टमी जागर, ग्रहण, गोकुळाष्टमीला विशेष आरती केली जाते.
 
भारतातील महत्त्वाच्या शहरांशी हे शहर जोडले गेले आहेत. शहरातून मंदिरापर्यंतही वाहतुकीची व्यवस्था अगदी उत्तम आहे.
 
कसे पोहोचाल
विमान: कोल्हापूर (उजळाईवाडी) 6 किमी अंतरावरून आहे.
रेल्वे: 3 किमी अंतरावर रेल्वे सेवा उपलब्ध आहे.
रस्ता वाहतूक: शहरातील बससेवा उपलब्ध आहे.