Maharashtra Tourism : महाराष्ट्राला 'संतांची भूमी' म्हटले जाते. इथल्या मातीने समाजाला दिशा देणारे अनेक महान संत दिले आहे, ज्यांनी केवळ भक्तीच शिकवली नाही, तर समता, माणुसकी आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचारही मांडला.
महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. या संतांनी आपल्या विचारांनी आणि भक्तीने समाजाला दिशा दाखवली. महाराष्ट्रातील काही प्रमुख संत आणि त्यांची समाधीस्थळे आज आपण पाहणार आहोत जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात.
महाराष्ट्रातील संत मंडळी आणि समाधीस्थळे
वारकरी संप्रदायाचे प्रमुख संत
संत ज्ञानेश्वर महाराज: यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी भगवद्गीतेवर 'ज्ञानेश्वरी' (भावार्थदीपिका) ही टीका लिहिली आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचला.
आळंदी: संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या २१ व्या वर्षी येथे 'संजीवन समाधी' घेतली होती.
संत नामदेव महाराज: यांनी विठ्ठलभक्तीचा प्रसार पंजाबपर्यंत केला. त्यांचे काही अभंग शीख धर्मीयांच्या 'गुरु ग्रंथ साहिब' मध्येही समाविष्ट आहे.
संत एकनाथ महाराज: यांनी 'एकनाथी भागवत' आणि 'भावार्थ रामायण' लिहिले. त्यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला आणि 'भारूड' या लोककलेतून प्रबोधन केले.
पैठण: संत एकनाथांनी गोदावरी नदीच्या पात्रात जलसमाधी घेतली होती.
संत तुकाराम महाराज: यांच्या 'गाथा' आजही घरोघरी गायल्या जातात. "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले" हा समतेचा विचार त्यांनी मांडला.
संत तुकाराम महाराजांनी 'सदेह वैकुंठगमन' केले होते, त्यामुळे देहू येथे त्यांचे समाधीस्थळ नसून वैकुंठगमन स्थान आहे.
समर्थ रामदास स्वामी: यांनी 'दासबोध' आणि 'मनाचे श्लोक' लिहिले. त्यांनी शक्तीच्या उपासनेसाठी हनुमान मंदिरे उभारली आणि तरुणांना बलोपासनेचा संदेश दिला.
सज्जनगड: समर्थ रामदास स्वामींचे हे समाधीस्थान गडावर असून तेथे दासबोधाचे वाचन आजही अखंड चालते.
संत कवयित्री आणि इतर संत
महाराष्ट्रात महिला संतांनीही मोठे योगदान दिले आहे:
संत मुक्ताबाई (ज्ञानेश्वरांची बहीण)
संत जनाबाई (नामदेवांची शिष्या)
संत सोयराबाई आणि संत निर्मळाबाई (चोखामेळा कुटुंबातील)
संत कान्होपात्रा
संत बहिणाबाई
तसेच संत चोखामेळा, संत सावता माळी, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत सेना न्हावी या संतांनी आपल्या व्यवसायातूनच ईश्वराची भक्ती कशी करावी, याचा आदर्श घालून दिला.
आधुनिक काळातील समाजसुधारक संत
संत गाडगे बाबा: त्यांनी स्वच्छतेचा मंत्र दिला आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज: यांनी 'ग्रामगीता' लिहून ग्रामविकासाचा मार्ग दाखवला.
इतर संत मंडळी समाधीस्थळे
संत नामदेव महाराज पंढरपूर (विठ्ठल मंदिर पायरी)सोलापूर
संत निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर नाशिक
संत सोपानदेव सासवड पुणे
संत चोखामेळा पंढरपूर सोलापूर
संत गोरा कुंभार तेर धाराशिव