शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या आणि या 10 आजारांपासून दूर राहा...

पाण्याला तर जीवन  संबोधलं जातं, म्हणूनच निरोग़ी आरोग्यासाठी  संतुलित आहार, योग्य व्यायाम याचबरोबर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी हेच पाणी सकाळी अनशी पोटी व तांब्याच्या भांड्यात ठेवलेले प्यायल्यास त्याचा अधिक फायदा होतो. काळानुरूप जीवनशैलीत बदल झाले व पारंपारिक वस्तूंची जागा पाश्चात्य संस्कृतीने घेतली. मग पहा तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी का प्यावे ?
आयुर्वेदीक महत्त्व –
आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक (कफ, पित्त, वात) असते. त्यामुळे किमान 8 तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते व आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात सामाविष्ट होतात. तसेच कफाची समस्या असलेल्यांनी या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकावेत.
1)  पचनसंस्थेला चालना मिळते -:
पित्त, अल्सर किंवा पोटात ग़ॅसचा विकार होणार्‍यांसाठी तांब्याच्या भांडात ठेवलेले पाणी पिणे अत्यंत हितकारी आहे. तांब्यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे, पोटातील जिवाणूंचा नाश होतो, जळजळ होण्याची समस्या कमी होते. तसेच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने पचनक्रियेचा मार्ग स्वच्छ होतो, परिणामी पोट स्वच्छ राहण्यास मदत होते. पित्त दूर करण्यासाठी हे 8 पित्तशामक घरगुती उपाय नक्की करून पहा.
2)  वजन कमी करण्यास मदत होते -:
फायबरनी परिपुर्ण भाज्या, फळं आणि वजन कमी करण्याचे इतर सगळे वापरून देखील तुमचे वजन कमी होत नाही ? मग तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नक्की पिऊन पहा. पचनसंस्थेला चालना देण्याबरोबरच हे पाणी शरीरातील अतिरिक्त मेद कमी करण्यास मदत करते. शरीराला आवश्यक मेद शोषून घेतल्यानंतर चरबी वाढवणारे अनावश्यक मेद बाहेर टाकण्यास मदत करते. यामुळे तुमचे वजन काबूत राहण्यास नक्कीच मदत होते.
3)  जखमा भरून काढण्यास मदत होते -:
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अ‍ॅन्टीबॅक्टेरीयल तसेच अ‍ॅन्टीवायरल असल्याने दाह कमी करण्यास मदत होते. तांब्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते, नवीन पेशींची निर्मीती होते. तांब्यामुळे शरीराच्या आतील जखमा विशेषतः पोटातील जखमा लवकर भरण्यास मदत होते.
 4)  चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होतात -:
जर तुम्ही पडणार्‍या अकाली सुरकुत्यांमुळे चितिंत असाल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी आता ही चिंता दूर करेल. कारण या पाण्यातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत  करते. तसेच चेहर्‍यावरील नवीन त्वचा निर्माण करण्यास मदत करते.
5) हृदयरोग व रक्तदाबासारखे आजार आटोक्यात ठेवण्यास मदत करते -:
‘तांबं’ रक्तदाब, हृदयाचे ठोके आटोक्यात ठेवतो तसेच कोलेस्ट्रोल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांमध्ये वाहणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो.
6) कर्करोगाशी सामना करते -:
आधुनिक जीवनशैलीत, आजकाल कर्करोग जडण्याची शक्यता वाढली आहे. अशावेळेस तांब्याच्या अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकांचा, कर्करोग जडण्याचे प्रमुख कारण असणार्‍या शरीरातील फ्री-रॅडिकल्सशी सामना करण्यासाठी मदत होते. ‘अमेरिकन कॅन्सर सोसायटी’च्या मते, तांबं नेमका कॅन्सरशी कसा सामना करतो हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरीही विविध अभ्यासांनुसार तांब्यातील काही घटकांमध्ये कर्करोगाशी सामना करण्याचे  सामर्थ्य असल्याचे सामोरी आले आहे.
7) अ‍ॅनिमियाशी सामना करतो -:
शरीरातील अनेक कार्य सुरळीत करण्यासाठी तांब्याचा उपयोग होतो. अगदी पेशींची निर्मीती करण्यापासुन ते पदार्थांतील आयर्न(लोह) व मिनरल्स शोषून घेण्यासाठी मदत होते. म्हणूनच अ‍ॅनिमियाशी सामना करणार्‍यांनी तांब्याच्या भांड्यातून आवर्जून पाणी प्यावे. तांबे रक्तातील  लोह वाढवतो व रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.
8)  त्वचेचे आरोग्य सुधारते व मेलॅनीनची निर्मिती होते –:
तांबे शरीरात मेलॅनीनच्या निर्मितीमध्ये मदत करते. तसेच त्वचेच्या पेशींच्या निर्मीतीत तांबे प्रमुख भुमिका बजावते. त्यामुळे रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास त्वचेचा पोत व आरोग्य सुधारण्यास मदत होते.
9) सांधेदुखी दुर होते -:
तांब्यात दाह दूर करण्याची क्षमता असल्याने, संधीवाताच्या त्रासामुळे होणारी सांधेदुखी दुर होण्यास मदत होते. याचबरोबर हाडं मजबुतीसाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तांब्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने फायदा होतो.
10) थायरॉईडग्रंथींचे कार्य सुधारते -:
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील थायरॉक्सिन हार्मोन संतुलित राहते. तांब्यातील खनिजं थायरॉईडग्रंथींचे कार्य सुरळीत करण्यास मदत करतात व थायरॉईड्च्या आजारापासुन आराम मिळतो.