Marathi Biodata Maker

श्यामची आई - रात्र पाचवी

Updated: सोमवार, 12 जून 2023 (16:50 IST)
 
'बराच आला आहे का ग ताप?' आईने विचारले.
 
इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला, 'श्यामची आई! माझ्या आईला आला आहे ताप. तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला, तोवर ही चंद्री येत जाईल.'
 
'बरे हं.' आई म्हणाली. शिवराम काम करण्यास निघून गेला. कांडपिणीने भात मोजून घेतले. आई कांडण घालून धुणी घेऊन विहिरीवर गेली.
 
दुपारी बाराएक वाजता आमची घरातील जेवणे झाली. शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला.
 
'गुरांना पाणी घातलेस का, शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का? नाही तर गुरे पायांनी तुडवितील व त्यातच बसतील; गवत घालून ठेव.' आई त्याला सांगत होती. शिवराम म्हणाला, 'सारे केले. आता मी जातो.' 'थांब शिवराम. इकडे ये जरा.' आई घरात गेली व केळीच्या पानावर कढत भात व लिंबाच्या लोणच्याची फोड असे घेऊन आली. एका लहानशा गंजात तिने ताक आणिले. 'शिवराम हे तुझ्या आईला हो. म्हणावं लौकर बरी हो.' असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली. शिवरामाने पानासकट तो भात आपल्या रूमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला.
 
तिन्हीसांजा झाल्या. आमची शाळा सुटली होती. परवचा म्हणत होतो आम्ही. 'गज-ये! ती समई कोंडयाला पुसून नीट लख्ख करून ठेव.' आईने सांगितले. आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे. कांडणाच्या दिवशी समई पुसावयाची असा रिवाज असे. भाताच्या कोंडयाला पुसल्याने समई स्वच्छ होते. गजरी समई पुसू लागली. आई कांडण मोजून घेऊ लागली. कांडपिणीस कण्या, धापट वगैरे देण्यात आले. धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो. कांडपिणी निघून गेल्या.
 
शिवरामाने झाडांना पाणी घातले, गुरांची दुधे काढली. आईने गाईचे दूध काढले. शिवराम घरी जावयास निघाला. सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते. तुळशीत आले पुरले होते. त्यातील आले उकरून काढले. आई शिवरामला म्हणाली, 'शिवराम, हा गवती चहा घेऊन जा. हा आल्याचा तुकडा घे. घरी काढा करा; त्यात चार धने व पिंपळाचे पान टाका व कढत कढत आईला द्या. मग पांघरूण घाला, म्हणजे घाम येईल व मोकळी होईल. थांब हो दोन खडी साखरेचे खडे पण देते.' असे म्हणून आई घरात गेली व खडीसाखर घेऊन आली. शिवराम सारे घेऊन निघाला.
 
मथुरेने शिवरामाला विचारले, 'शिवराम! हे कोणी दिले?'
 
शिवराम म्हणाला, 'श्यामच्या आईने.' मथुरी म्हणाली, 'देवमाणूस आहे माउली. सा-यांची काळजी आहे तिला.' मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला, तरी तिला घाम आला नाही. तिचा ताप निघाला नाही. सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला.
 
'शिवराम! तुझ्या आईचे कसे आहे?' आईने विचारले.
 
'कपाळ लई दुखते, सारखे ठणकते; अक्षी कपाळाला हात लावून बसली आहे. रात्री झोपबी नाही.' त्याने सांगितले.
 
'बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ व सांबरशिंग देईन, ते उगाळून तिच्या कपाळास चांगला लेप द्या, म्हणजे बरे वाटेल.' आई म्हणाली.
 
तो जो आपल्या कामात दंग झाला. शिवराम गोठा झाडू लागला. शेणाच्या गोव-या घालू लागला. आई भाजी वगैरे चिरू लागली.
 
दोन प्रहर झाले. शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्याएवढा भात, लोणच्याची फोड घेऊन निघाला. सुंठ व सांबरशिंग आईने त्याच्याजवळ दिले. सांबराचे शिंग औषधी असते असे म्हणतात. सुंठ, वेखंड, सांबरशिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते. इतरही कोठे दुखत असेल तर याचा लेप देतात.
 
काही दिवसांनी मथुरी बरी झाली. ती फारच खंगली होती. अशक्त झाली होती; परंतु ती कामावर येऊ लागली. पंधरावीस दिवस ती कामावर आली नव्हती. ती कांडावयाला आलेली पाहून आई म्हणाली, 'मथु-ये! किती ग वाळलीस तू ! कांडण होईल का तुझ्याकडून?'
 
मथुरी म्हणाली, 'बसत उठत करू कांडण. इतके दिवस अंथरूणावर पडून खाल्ले, पुरे आता; हिंडती फिरती आता झाली आहे. चार दिवसांनी होईन धडधाकट ! तुमची माया असली म्हणजे काय उणे आहे आम्हाला ?'
 
आई म्हणाली, 'अग सारी देवाची कृपा. आम्ही किती एकमेकांना पुरणार! बरे पण, मुलांचा भात झाला आहे. तूही चार घास खा त्यांच्याबरोबर, म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल. दुपारी आज येथेच जेव पोटभर, ऐकलेस ना?'
 
त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरीही सकाळचे जेवली. मथुरीच्या तोंडावर त्या वेळेस केवढी कृतज्ञता होती!
 
ती मथुरी आता म्हातारी झाली आहे. मी एखादे वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटावयाला जातो. तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत. तरीही एक प्रकारची प्रसन्नता व वत्सलता तिच्या तोंडावर दिसते. मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते, 'अरे हे काय श्याम!' तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते, 'श्याम! तुझी आई असती तर तुला असा सडाफटिंग न राहू देती. तुला लगीन करावयाला लावलं असतं तिनं. मेली बिचारी लौकर. सा-यांवर तिचा लोभ.'
 
अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

Hair Care Tips: दह्यात हे ४ पदार्थ मिसळून लावा, केस होतील लांब, दाट आणि मजबूत

वारंवार गॅस-आम्लपित्त? हे पोटाच्या गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

Parenting Tips: मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे प्रश्न कधीच विचारू नका

पंचतंत्र : घोडा आणि गाढव, धोबी

Perimenopause vs Menopause पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉजमध्ये काय फरक असतो?

पुढील लेख
Show comments