शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जुलै 2021 (14:27 IST)

प्रार्थनेची आगाध शक्ती......

एक गरीब, वृद्ध महिला एका भाजीवाल्याच्या दुकानात गेली. तिच्यापाशी भाजी विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. तिने दुकानदाराला विनंती केली. तिच्यापाशी पैसे नसल्याने त्याने तिला आज उधारीवर भाजी द्यावी. पण दुकानदार काही या साठी तयार झाला नाही. तिने त्याला अनेक वेळा उधारीवर भाजी देण्यासाठी विनंती केली. शेवटी चिडून तो म्हणाला, "ए म्हातारे, तुझ्यापाशी पैसे नसतील तर मग तुझ्याजवळील अशी एखादी किंमती वस्तू तराजूत टाक की जिच्या मोबदल्यात मी तुला त्या वस्तूच्या वजनाइतकी भाजी देईन." 
 
ती वृद्ध महिला थोडी विचारात पडली. तिच्यापाशी देण्यासारखे काही नव्हतेच तर ती बिचारी देणार तरी कुठून ? थोड्या वेळाने तिने तिच्याजवळील एक कोरा, चुरगाळलेला कागदाचा तुकडा काढला, त्यावर काहीतरी खरडले आणि तो तुकडाच तिने तराजूच्या पारड्यात टाकला. हे पाहून दुकानदाराला हसू आले. त्याने थोडी भाजी हाती घेऊन तराजूच्या दुसऱ्या पारड्यात टाकली आणि नवलच घडले. कागदाचा कपटा टाकलेले पारडे वजनाने खाली गेले होते आणि भाजीचे पारडे वर उचलल्या गेले. हे पाहून त्याने आणखी काही भाजी पारड्यात टाकली तरी ते पारडे वरच. कितीही भाजी त्या पारड्यात टाकली तरी भाजीचे पारडे वरच राहिलेले पाहून दुकानदार गोंधळला. शेवटी तो चुरगळलेला कागद हाती घेऊन त्याने तो उलगडून बघितला आणि त्यावर त्या वृद्धेने काय लिहिलेले आहे ते बघितले. त्या कागदावर तिने लिहिले होते, "ईश्वरा, तूच सर्वज्ञ आहेस. आता माझी लाज तुझ्याच हाती आहे."
 
दुकानदाराचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्याने पारड्यातली सगळी भाजी त्या वृद्धेला देऊन दिली. जवळच उभा असलेला एक ग्राहक त्या दुकानदाराला बोलला, "मित्रा, यांत काहीच नवल घडलेलं नाही. प्रार्थनेचं मोल काय हे तो एक ईश्वरच जाणे.खरोखर, प्रार्थनेत विलक्षण शक्ती असते, मग ती प्रार्थना एका तासाची असो वा एका मिनिटाची. ईश्वराची प्रार्थना जर मनापासून केलेली असेल तर तो नक्कीच वेळेला धावून येतो यात शंका नाही. पण बहुतेक वेळा आपण आपल्यापाशी वेळ नसल्याचं कारण सांगून त्याची प्रार्थना करीतच नाही, पण विश्वास ठेवा, ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी कुठली वेळ, कुठलाही प्रसंग चालतो.

प्रार्थनेमुळे मनातील विकार दूर होतात आणि मनात एका सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ लागतो आणि जीवनातील कुठल्याही कठीण परिस्थितीला सामोरे जायचे बळ मिळते. काही मागण्यासाठीच ईश्वराची प्रार्थना करायची असते असे नाही. त्याने आपल्याला जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार आपण प्रार्थनेद्वारे मानू शकतो. यामुळे हे सारे वैभव आपण आपल्या बळावर मिळवले आहे असा आपल्या मनातील अहंकार नाहीसा होईल आणि आपले व्यक्तित्व आणखीनच विकसित होऊ शकेल.

प्रार्थना करते वेळी आपल्या मनाला ईर्ष्या, द्वेष, क्रोध, घृणा या सारख्या विकारांपासून आपण दूर ठेवू शकतो. अशी ही प्रार्थना आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भागच बनली पाहिजे. अशा प्रार्थनेमुळे मनाचे सामर्थ्य तर वाढेलच आणि शिवाय कुणाची निंदा करण्याची वाईट सवय व करू नये ते काम करण्याची, करून पाहण्याची इच्छा समुळ नाहीशी होईल.
 
- सोशल मीडिया