गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 29 जून 2022 (15:15 IST)

पावसाळ्यातील आपत्ती टाळण्यासाठी…मार्गदर्शक सूचना( विशेष लेख )

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडून नागरी/शहरी पूर आपत्ती प्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधक उपाययोजनांबाबत पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत –
 
*  प्रत्येक राज्यांमध्ये उच्चतम पूर पातळी ठरविणे.
 
*  प्रत्येक शहरामध्ये तांत्रिकदृष्ट्या सक्षम समन्वय अधिकाऱ्यासह (नोडल ऑफिसर) नागरी पूर/पूर व्यवस्थापन यंत्रणा स्थापित करणे.
 
*  प्रत्येक शहराने खालील परिस्थिती विचारात घेऊन नागरी पूर व्यवस्थापन आणि उपक्षमन यासाठी प्रमाणित कार्यपध्दती (SOP) लागू करावी. i) किनारवर्ती शहरे, ii) मुख्य / मोठ्या नदी किनान्यावरील शहरे, iii) धरणांजवळील/जलाशयांजवळील शहरे, iv) अंतर्गत शहरे,  डोंगराळ प्रदेशातील शहरे, शहरांना वरीलप्रमाणे एक किंवा अनेक वैशिष्ट्ये असू शकतात.
 
*  नागरी पूर व्यवस्थापनासाठी सर्व भागीदारांची क्षमता बांधणी व उत्तम समन्वयासाठी मान्सूनपूर्व कार्यशाळेचे आयोजन करणे,
 
*  माहिती जनसंपर्क आणि शिक्षण, प्रत्येक शहराने पूर्वतयारीसह स्थानिक कल्याणकारी प्राधिकारी किंवा अन्य समाजगटांची प्रभागनिहाय यादी तयार ठेवावी व संपूर्ण शहरासाठी त्याचे सहाय्य घेणे.
 
* मान्सूनचे आगमन होण्याच्या बऱ्याच कालावधीपूर्वी शहारातील जलाशयांच्या पाण्याचे शुध्दीकरण तसेच गटारांमधील गाळ प्रभावीपणे काढण्याची कार्यवाही पूर्ण करणे.
 
*   प्रत्येक शहरातील पाण्याच्या साठ्यांच्या स्थितीचे व मालकी हक्काचे सूचीकरण व मॅपिंग (Mapping) करणे.
 
*   शहरातील पूर परिस्थितीजन्य भागातील पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसविणे.
 
* विमानतळ असणाऱ्या शहराच्या समन्वय अधिकाऱ्याने पावसाच्या सद्य:स्थिती व भाकितासंबंधीच्या स्थितीबरोबरच चक्रीवादळ व अतिवृष्टीची माहिती भारतीय हवामान विभागाकडून (IMD) घेणे आवश्यक आहे. ही माहिती METARS या संस्थेकडून दर 30 मिनिटांनी अद्ययावत करण्यात येते. जेव्हा चक्रीवादळ व अतिवृष्टीची स्थिती असते, तेव्हा ही माहिती महानगरपालिकेच्या आयुक्तांना तातडीने कळविणे गरजेचे असते, जेणेकरून ते सावधानता बाळगून त्यावर प्रतिबंधक उपाययोजना करतील. उदा. पूरग्रस्त व अतिवृष्टी क्षेत्रातील शाळा बंद करणे.
 
*   जलाशयातून/धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय जागेवर घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक शहरासाठी पुरेसे अधिकार असणाऱ्या उच्चस्तरीय तज्ञ समितीची स्थापना करणे. या समितीला,अतिवृष्टीच्यावेळी पाण्याच्या विसर्गाच्या भाकिताचा आढावा घेऊन जलाशयाची/धरणाची द्वारे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याचे अंतिम अधिकार राहील.
 
*  जलाशयातून/धरणातून पाण्याचा विसर्ग केला असता शेजारील राज्यांना ती माहिती त्याच वेळी (Real Time Basis) देणे.
 
*  प्रत्येक राज्य/जिल्हा प्राधिकरणाने धोका नकाशा (Vulnerable Area) तयार करणे गरजेचे आहे जेणेकरून उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करता येईल.
 
*  पूराच्या मुख्य कारणांमध्ये अतिवृष्टी व बर्फ वितळणे यांचा समावेश होतो. त्यामुळे बर्फ वितळणे, ढगफुटीमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीत धरणातून केला जाणारा पाण्याचा विसर्ग यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
 
*  आपत्तीच्या परिस्थितीचा पुर्वानुमान बांधून आपत्तीमध्ये लागणाऱ्या मूलभूत बाबी म्हणजे पाणीपुरवठा, अन्नपुरवठा, वैद्यकीय सोयी, स्वच्छतेच्या सोयी इत्यादीची माहिती राज्य शासनाने संग्रहित करून ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून आपत्तीच्या वेळी मदत पोहोचविणे सहज शक्य होईल.
 
*  आपत्ती संबंधातील माहिती त्याचवेळी (Real Time Basis) मिळण्यासाठी राज्याने पूरनियंत्रण सॉफ्टवेअर विकसित करणे.
 
*   राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला आपत्ती सरावासाठी (Mock Drills) 01 लाख रुपये राखून ठेवावे. राज्याने या निधीचा विनियोग विचारपूर्वक पध्दतीने करणे.
 
*  आपत्तीमध्ये काय करावे व काय करू नये याबाबतची माहिती जाहिरातीद्वारे स्थानिक भाषेत देणे.
 
* राज्याने हवामानाच्या वृत्तांतासाठी प्रादेशिक भारतीय हवामान विभागाच्या (IMD) संपर्कात रहावे.
 
*  राज्याने पुराच्या अंदाजासाठी केंद्रीय जल आयोगाच्या संपर्कात रहाणे.
 
*  किनारपट्टीच्या भागामध्ये RCC छत नसलेल्या घरांच्या सुरक्षेसाठी U आकाराच्या गळाचा (Hooks) वापर करणे.
 
*   झाडांची नियमित छाटणी योग्य प्रकारे होते की नाही, तसेच जनजागृतीचे / जाहिरातीचे फलक सुस्थितीत आहेत की नाही याची खात्री करणे.
 
वज्राघात झाल्यास काय करावे व काय करू नये
 
सतर्कतेची/चेतावणी चिन्हे: अतिवेगवान वारे, अतिपर्जन्य आणि काळे ढग, घोंघावणारे गडगडाटी वादळ, जवळचे झंझावात, जास्त किंवा अधिक जास्त प्रमाणात मेघगर्जना.
 
वस्तुस्थिती:- वीज ही सामान्यपणे उंच वस्तूंवर पडते, कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही परंतु, काही स्थाने इतर ठिकाणापेक्षा सुरक्षित आहेत, मोठी बांधकामे छोट्या किंवा खुल्या बांधकामांपेक्षा जास्त सुरक्षित असतात, जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही वज्राघात होऊ शकतो (16 कि.मी.), वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो, अशा परिस्थितीत सामान्यतः बाहेर पडलेल्या व्यक्तीच वज्राघातामुळे जखमी किंवा मृत्यू पावतात, वज्राघात बाधीत/जखमी व्यक्तीस तुम्ही मदत करू शकता, त्याच्या शरीरात कुठल्याही प्रकारचा विद्युत प्रवाह सुरु नसतो. त्या व्यक्तीस तात्काळ/त्वरीत मदत करावी.
 
काय करावे
 
पूर्वतयारी
 
Ø  वज्राघातापासून बचावासाठी भित्तीचित्रे / भित्तीपत्रके प्रदर्शित करा. आपल्या भागातील स्थानिक हवामानाविषयी अंदाजाची व सतर्कतेच्या माहितीचे निरीक्षण करा.
 
Ø  स्वतःसाठी व कुटुंबासाठी वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेसंदर्भात तसेच स्थानिक प्रशासकीय यंत्रणेसंदर्भात संपर्क करण्यासाठीचा आराखडा तयार करा.
 
Ø  वैद्यकीय व स्थानिक आपात्कालीन सेवांचे संपर्क तपशील तयार करणे.
 
Ø  आपत्कालीन साधने (Emergency Kit) तयार ठेवा.
 
Ø  जर गडगडाटी वादळाचा/अतिवेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांचा अंदाज असेल तर घराबाहेर/घराबाहेरील क्रिया पुढे ढकलणे.
 
Ø  वीजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वातानूकुलित यंत्रे बंद ठेवावे.
 
Ø  आपल्या घराच्या आजूबाजूच्या वाळलेले झाडे किंवा मृत झाडे फांद्या काढून टाकणे.
 
तुमच्या परिसरात वादळी वारे वाहत असल्यास /विजा चमकत असल्यास
 
घरात असल्यास: घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवा, घराच्या दरवाजे, खिडक्या, कुंपणापासून दूर राहावे, मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनिटे घराच्या आतच राहावे.
 
घराबाहेर असल्यास : त्वरित सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाणाकडे (मजबूत इमारतीकडे) प्रस्थान करावे, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल, सायकल यांच्यापासून दूर राहा, गाडी चालवत असल्यास, सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा व गाडी सुरक्षित ठिकाणी लावताना मोठया झाडांपासून तसेच पूराचे पाणी येत असल्यास अशी ठिकाणी वगळून लावाव्यात, खुल्या ठिकाणांपेक्षा सामान्यतः खिडक्या बंद असलेल्या धातूपासून तयार झालेली वाहने (बस मोटार) चांगली आश्रयस्थळे होऊ शकतात, उघड्यावर असल्यास, शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे, जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा,  मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर रहा, जंगलामध्ये दाट, लहान झाडांखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा, इतर खुल्या जागेवर दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा. (परंतु अचानक येणाऱ्या पूरापासून सावध राहा), जर जमिनीच्या वर पाणी आल्यास ताबडतोब सुरक्षित निवारा शोधून काढा.
 
वीज पडल्यास / वज्राघात झाल्यास: त्वरीत रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत बोलवा. वज्राघात बाधित व्यक्तीस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्या. त्याला हात लावण्यास धोका नाही. ओल्या व थंड परिस्थितीत, इजळाला (बाधित व्यक्ति) व जमिनीच्या मध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा. जेणेकरून हायपोथरमीयाचा (hypothermiya / शरीराचे अति कमी तापमान) धोका कमी होईल.
 
इजा झालेल्या इसमास पुढीलप्रमाणे हाताळा:
 
श्वसन बंद असल्यास:- तोंडावाटे पुनरुत्थान (Mouth-to-Mouth) प्रक्रिया अवलंबावी. हृदयाचे ठोके बंद असल्यास:- कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदय गती CPR करुन सुरु ठेवा. इजाळाची / रुग्णाचा श्वास व नाडी सुरु असल्यास इतर दुखापतींसाठी/आघातांसाठी (भाजणे/ऐकू न येणे/ न दिसणे) तयारी
 
काय करू नये
तयारी:- गडगडाटीचे वादळ आल्यास, उंच जागांवर, टेकडीवर, मोकळया जागांवर समुद्र किनारी, स्वतंत्र झाडे, रेल्वे/ बस/सहलीची आश्रयस्थाने, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/ दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी जागी जाणे, या जागांजवळ उभे राहणे टाळावे.
 
घरात असल्यास: वायरद्वारे जोडले गेलले फोन/मोबाईल व इतर इलेक्ट्रीक/इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये, (अशा आपत्कालीन वेळी कॉर्डलेस व वायरलेस फोनचा वापर करावा परंतु ते भिंतीला जोडलेले नसावे). गडगडीच्या वादळादरम्यान व वीजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नये. या दरम्यान आंघोळ करणे, हात धुणे, भांडी धुणे, कपडे धुणे, ही कार्य करु नयेत. काँक्रिटच्या (ठोस) जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये. प्रवाहकीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावा (धातूची दारे, खिडक्यांची तावदाने, वायरिंग व प्लंबिंग/नळ).
 
 घराबाहेर असल्यास: मेघगर्जनेच्या वेळी वीजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वाहनांच्या धातू किंवा वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या केबल्स पासून लांब राहावे.
येणारी नैसर्गिक आपत्ती कदाचित रोखली जावू शकत नाही, मात्र योग्य उपाययोजना आखून प्रशासन देत असलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून मनुष्यहानी आणि वित्तहानी निश्चितच कमी केली जावू शकते किंवा पूर्णत: रोखलीही जाऊ शकते. म्हणून नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी पावसाळ्याच्या दिवसात प्रशासनाकडून जारी केल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपत्तीशी सामना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.