गुरूवार, 5 मार्च 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जानेवारी 2026 (18:58 IST)

बापरे: निपाह विषाणूच्या रुग्णांची नोंद

Patient
भारतात पश्चिम बंगालमध्ये निपाह विषाणूचे संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमधील कल्याणी येथील AIIMS मध्ये निपाह विषाणूचे दोन संशयित रुग्ण आढळले आहे. हे दोन्ही रुग्ण आरोग्य कर्मचारी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. तसेच केंद्र सरकारने तज्ज्ञांचे एक पथक पश्चिम बंगालमध्ये पाठवले आहे. उत्तर २४ परगणा आणि नदिया या जिल्ह्यांमध्ये विशेष देखरेख वाढवण्यात आली आहे. तसेच पश्चिम बंगालच्या शेजारील राज्य असलेल्या झारखंडमध्येही खबरदारीचा उपाय म्हणून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२०२५ मध्ये देखील केरळ राज्यामध्ये निपाहच्या काही रुग्णांची नोंद झाली होती. केरळमधील मलप्पुरम आणि कोझिकोड जिल्ह्यांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव झाला होता, ज्यात काही मृत्यूंचीही नोंद झाली होती. सुदैवाने, वेळेवर घेतलेल्या प्रतिबंधात्मक उपायांमुळे तो प्रसार मर्यादित राहिला.
 
निपाह विषाणू कसा पसरतो?
हा एक 'झुनोटिक' (Zoonotic) विषाणू आहे, जो प्राण्यांकडून माणसांकडे आणि नंतर माणसांकडून माणसांकडे पसरतो.
 
नैसर्गिक वाहक
'फ्रूट बॅट्स' (फळे खाणारी वटवाघळे) या विषाणूचे मुख्य वाहक असतात.
 
दूषित फळे
वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे किंवा पक्ष्यांची विष्ठा/लाळ लागलेली फळे खाल्ल्याने संसर्ग होऊ शकतो.
 
प्राण्यांशी संपर्क
संसर्ग झालेल्या डुकरांच्या संपर्कात आल्यानेही हा आजार पसरतो.
 
मानवी संपर्क
संसर्ग झालेल्या रुग्णाच्या लाळ किंवा मूत्राच्या संपर्कात आल्यास इतर व्यक्तींना लागण होऊ शकते.
 
प्रमुख लक्षणे
निपाहची लक्षणे सामान्यतः संसर्ग झाल्यापासून ४ ते १४ दिवसांत दिसू लागतात. 
 
तीव्र ताप आणि डोकेदुखी.
खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे.
स्नायू दुखणे आणि उलट्या होणे.
गंभीर परिस्थितीत एन्सेफलायटीस (मेंदूला सूज येणे), ज्यामुळे चक्कर येणे किंवा कोमात जाण्याची शक्यता असते.
 
प्रतिबंधात्मक उपाय
सध्या यावर कोणतीही विशिष्ट लस उपलब्ध नसल्याने खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय आहे. 
 
फळे धुवून खा
झाडावरून पडलेली किंवा अर्धवट खाल्लेली फळे खाऊ नका.
 
हात स्वच्छ धुवा
प्राण्यांच्या किंवा आजारी व्यक्तीच्या संपर्कात आल्यास साबणाने हात स्वच्छ धुवा.
 
वटवाघळांपासून दूर राहा
वटवाघळांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांपासून लांब राहा.
 
मास्कचा वापर
संसर्गजन्य भागात मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करा.
Edited By- Dhanashri Naik