1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार

शरद पवार यांना राजकारणात हरवण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार आहे. पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणात कालही सूर्य होते, आजही आहेत व उद्याही कायम असतील, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी ट्विट करून भाजपला लगावला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला धक्का देत भाजपानं सत्तास्थापनेचा दावा केला आणि सकाळीच शपथविधी उरकला. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात फक्त सरकार कधी स्थापन होणार याचीच चर्चा सुरु आहे. तर नेत्यांमध्ये ट्वीटर युद्ध सुरु झाले आहे.
 
राज्यात सत्तेचे महानाट्य सुरु असून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष एकत्र आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शह देण्यासाठी भाजपने रणनिती आखत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना आपल्या बाजूने केले. यानंतर सुरु झालेल्या या महानाट्याच्या प्रयोगानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अखेर हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचल आहे. त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष आहे.